शुक्रवार, 23 जनवरी 2015

फणीश्वरनाथ रेणु अंतर्नाद ऑक्टोबर २००१

1 Dec 2000
फणीश्वरनाथ रेणू
(जन्म १९२९ , मृत्यू १९७७)
नित्यलीला चा लेखक
                          
                अंतर्नादच्या १९९७ च्या दिवाळी अंकात मी अनूवाद   केलेली 'नित्यलीला' ही कथा  प्रसिद्ध  झाली,  तेव्हापासून  माझ्या  मनात होते, की  कधीतरी  या कथेच्या  लेखकाचा परिचय  मराठी वाचकांना करून दिला पाहिजे . लेखक   म्हणजे पद्यश्री फणीश्वरनाथ रेणू. हिंदी साहित्यजगातले एक महत्तवाचे नाव.
            खरे तर फणीश्वरनाथ रेणू यांचा परिचय  मराठी वाचकाला अजिबात असणार  नाही,  असे नाही,  राज कपूरची  प्रसिद्ध फिल्म 'तिसरी कसम ' चे कथा लेखक  रेणू  होते.  पण  हे फार कदाचित  फार कमी  लोकांना माहित असणार. कारण  भारतीय  फिम्मजगतात कथालेखकाला फारसे मानाचे स्थान दिले जात नाही, गाजावाजा तर फारसा  होतच नाही. शिवाय मुंबई -पुणे   यांच्यासारख्या  औद्योगिक वातावरणातल्या  वाचकाला (किंवा  सिनेमा प्रक्षेकाला)  'तिसरी कसम " मधले  खास  "गावाकडचे " वातावरण - ते देखील बिहारमधल्या मिथिलासारख्या पक्क्या ग्रामीण  भागातले  वातावरण -समजेल  किंवा भावेल,  असेही नाही.माझ्या  माहितीप्रमाणे फणीश्वरनाथांच्या कथा, कादंब-या किंवा  कवितांचा मराठीत अनुवादही झालेला नाही. हिंदी साहित्य जगात मात्र त्यांना  अत्यंत मानाचे स्थान असून  त्यांची  गाजलेली कादंबरी  "मैला आंचल " ही  प्रेमचंदांच्या 'गोदान'  नंतरची  त्या  तोडीची अस्सल ग्रामीण  कादंबरी  मानली  जाते.  भारतीय ग्रामीण  पार्श्वभूमीचे  चित्रण  अत्यंत समर्थपणे त्यांच्या  साहित्यामध्ये  दिसून  येते.
          बिहारमधील उत्तर -पूर्व टोकावरचा अररिया जिल्हा. त्या  काळात हा पूर्णिया या मोठ्या जिल्ह्याचा एक भाग होता.  उत्तरेला  लागून  नेपाळचा विराटनगर हा जिल्हा, तर पुर्वेकडे लागून  बंगाल.  पूर्णिया जिल्ह्याची भाषा मैथिली.
          फक्त अठ्ठेचाळीस वर्षांचे आय़ुष्य  लाभलेल्या  रेणू  यांनी  आपल्या  जीवनकाळात दोन कादंब-या , पाच,  लघू-कादंब-या, साठ-सत्तर कथा, शंभराच्या  आसपास रिपोर्टस आणि पन्नास  व्यक्तिचित्रे   लिहिली . थोड्याफार कविता लिहिल्या , काही इतर  छोटी-मोठी पत्रे, गोष्टी , निबंध वगैरे लिहिले.
         पण या सर्वांपेक्षा विशेष म्हणजे विराटनगरच्या कोईराला परिवाराबरोबर त्यांचे  घनिष्ठ  संबंध  होते. लहानपणी घरातून पळून  जाऊन  ते  कोईरालांकडे  राहिले होते.  त्याच बांधवांबरोबर बनारसला येऊन त्यांनी  कॉलेजशिक्षण घेतले. साम्यवाद आणि  समाजवाद शिकले, बेचाळीसच्या  आंदोलनात भाग घेतला. त्याआधी त्यांचा विराटनगरमधील जूट  मिल्स  आणि कॉटन मिल्स  युनियनच्या  संघटनेत  आणि क्रांतीत  सहभाग  होता.  तसाच पुढे  १९५१ साली नेपाळच्या प्रजातंत्राची  स्थापना झाली,  त्या सशस्त्र क्रांतीतही त्यांनी  भाग घेतला. एकीकडे  सशस्त्र हल्ल्यांमध्ये  भाग घेणे , दुसरीकडे  रेडिओ  ट्रान्समिशनची जबाबदारी संभाळणे  आणि  त्यांचे  रिपोर्टिंगदेखील  बिहारमधल्या  वर्तमानपत्रांतून करणे, या  सगळ्यांमुळे  त्यांना  क्रांतीचे  वाल्टेयर म्हटले  जाते. नेपाळमध्ये  प्रजातंत्राची स्थापना झाल्यानंतर  रेणू  पुढे पूर्णिया आणि पटना  येथेच राहिले. एव्हाना समाजवाद्यांबाबत त्यांचा मनोभंग  झाला, होता. ते पूर्ण  लेखनाकडे वळले. मात्र आणिबाणी लागू झाली.  तसे ते  पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आणि जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर त्यांनी बिहारच्या  छात्र आंदोलनात भाग  घेऊन  कैदही भोगली.  या काळात त्यांनी  पद्यश्री हा सन्मान आणि  स्वतंत्र्यसैनिक पेन्शनही सरकारला परत केले. पुढे निवडणुका झाल्या . जनता सरकार  आले.  पंतप्रधानांच्या  निवडीच्या मानापमानाचे नाटक  झाले. त्याच दिवशी सकाळी  त्यांनी  स्वतःच्या ऑपरेशनसाठी  परवानगी  दिली होती. आधी तीन महिन्यांपासून  चाललेल्या डॉक्टरांच्या आग्रहाला ते नाकारत होते.  निवडणुकिचा  निकाल त्यांना पाहायचा होता. मात्र ऑपरेशन टेबलावरूनच ते उठलेच नाहीत. काही दिवस बेशुद्धावस्थेत राहून  त्यातच  त्यांची  जीवनलीला संपली.
            अशा त-हेचे अनुभवसमृद्ध जीवन ज्याचे  असेल, जो स्वतः शेतकरीही असेल, किंबहुना शेती हेच  त्याच्या  भाजी-भाकरीचे  साधन असेल, पण तरीही जो एक  संवेदनशील लेखक , एक आदर्शवाही , एक  विद्रोही  आणि रामकृष्ण परमहंसांचा भक्त असेल, अशा  लेखकाचे लेखन काय तोडीचे आणि कशा  प्रकारचे असेल,  याचा  आपल्याला अंदाज येऊ शकतो.
            रेणूंच्या कथांची पात्रे सगळी  त्यांच्या  रोजच्या वावरायच्या  समाजातली, त्यांच्या  व इतरांच्याही  परिचयाची अशी  असत. इतकी की,  त्यांची नवीन गोष्ट  किंवा कादंबरी प्रसिद्ध  झाल्यावर  लोक एखाद्या व्यक्तीकडे  बोट दाखवून म्हणत- 'रेणूंच्या अमक्या कथेतला तो अमूक  ना! तो हा! त्यामुळे  त्यांच्या  साहित्यातून एका परीने  बिहारमधल्या दारिद्रयाने उलगडला जातो आणि आपण  म्हणून जातो.- 'हे  कदाचित आपल्या जवळपास कुठे  भोर , कुठे  पिंपरी   खुर्दमध्येही घडलेले असू  शकते.'
             साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू  यांचे  मूल्यांकन ब-याच  इतर साहित्यिकांनी केले . बोकारो येथील भारत यायावर यांनी  एकंदर पाच खंडात त्यांचे  समग्र  साहित्य  संकलित करण्याचा प्रयत्न  केला आणि 'राजकमल ' या हिंदीतील अग्रणी  प्रकाशम संस्थेने हे खंड प्रकाशित  केले . तरीपण  त्यांचे  काही  लेखन अजूनही अप्रकाशित किंवा आता दुर्मिळ  झालेले असल्याने ते या  खंडात येऊ  शकले नाही.  इतरांनीही त्यांच्या  साहित्याबद्दल  बरेच  काही लिहिले . पण एक  राजकारणी किंवा  समाजकारणी  व्यक्ती  म्हणून रेणू  यांच्या जीवनाबाबात फारसे कुणी  लिहिलेले दिसत  नाही.  त्या अर्थाने त्यांचे  मुल्यमापन  राहून  गेलेले आहे. हे मी  भारत  यायावर तसेच फणीश्वरनाथ यांचे  चिरंजीव  पद्यपराग  रेणू  यांच्याकडे  बोलूनही  दाखवेल. पण  असले  लेखन  करायला  अशी  व्यक्ती  हवी की,  जिची स्वतःची  सामाजिक व राजकीय विवेचनाची   जाण प्रगल्भ  असेल. हिंदी लेखकजगाला माझे  हे म्हणणे कितपत रुचेल कुणास ठाऊक!                     -लीना मेहेंदळे -- अंतर्नाद ऑक्टोबर २००१  
------------------------------------------------------------------------------  
   

शनिवार, 17 जनवरी 2015

खिंडिच्या पलिकडे -- भाषांतर करतांना (अपूर्ण)

28 March 2008- 5 April 2008 (Diary pages)
    मूळ इंग्लिशमधील या कादंबरीचा मराठी अनुवाद करतांना दोन भिन्न भाषांमधील शब्द वैशिष्ट्यांचा वेगळेपणा जाणवतो. त्याच बरोबर लेखकाचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व देखील लक्षांत येते. त्यांनी चार शब्दांचा जसा चपखल उपयोग केला आहे तसा तो मराठीत उतरवणे खूप अवघड होते. आम्ही दोघे मिळून या कादंबरीचा हिन्दी अनुवाद करायचे ठरले तेंव्हा देखील मी त्यांना या शब्दांविषयी बजावून ठेवले आहे. Questioning, knowing, game playing, आणि nothing हे ते चार शब्द.
     “Mother always encouraged me to ask questions. “ Children should ask, That is how they learn.” She said. But I was not asking questions, I was questioning. I was questioning their answers.
     यातील पहिले question हे माहिती करून घेण्यासाठी आहे तर दुसरे विद्रोहाच्या धाटणीवर आहे.
    Understand आणि know हे असेच दोन समानार्थी शब्द. कादंबरीत पराशर यांनी understand हा शब्द  खोलात खोलात शिरत माहिती घेणे या अर्थाने वापरला तर know हा शब्द खोलात न शिरताच जाणीवेत उतरणे या अर्थाने वापरला आहे. त्यांच्यासाठी मला मराठीत समजणे व उमजणे असे दोन वेगळ्या छटा असलेले शब्द योग्य वाटले.
     एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठलेही प्रयत्न मागे ठेवले नाहीत असा अर्थ हवा असेल तर इंग्रजीत आपण म्हणू Did not spare any TIME to understand किंवा TIME च्या जागी आपण EFFORTS, MONEY या सारखे शब्द वापरू. पण पराशर यांनी एक फार सुंदर वाक्य रचना वापरली आहे- Naturally, he did not spare space for understanding things like time. But he knew when it was time to go. Like the birds. They do not keep watches and calendars. But they know when it is time to go.
     पराशर यांनी अशाच प्रकारचे शब्द कौशल्य games बाबत वापरले आहे. “Did the travellers play any games of their own - now that they did not have to play games of referees?” या प्रश्नाला म्हातारा आजोबा उत्तर देतो. “Did they! I did not see them. In any case, why would anyone who is happy, play games?”
     या शेवटच्या ओळीत play games या शब्दामधे छळ-कपट, जिंकणे-हरणे, असूया इत्यादी सर्व भाव समाविष्ट आहेत. यांचे मराठी अनुवाद करतांना नेमके शब्द पकडणे कठिण होते.
     लेखकाने सर्वांत जास्त मजा केली आहे nothing या शब्दाबरोबर.
    In the valley of peace, people do not play any games. But they play. Some play with water, some with wind. Some play with clouds, and rainbows and birds and animals. Some play with nothing.
    अशा प्रकारे nothing या शब्दाला एक व्याक्तिमत्व वहाल केल.
    मुलगा विचारतो-
    “With nothing! How do you play with nothing? What is nothing?”
    “Nothing is the only thing you have everywhere at all times. But it will be sometime before you know about it. When travellers are playing, no one knows. So playing is sort of invisible- like nothing… Travellers become particles, of dust, of water, of air. They become free sounds, they become thoughts. They are on way to becoming nothing.”
     This nothing was turning to be mysterious something to attain and I would not know yet. But my mother used it to show disdain- “You just sit there doing nothing, just brooding all the time- this way you would grow up to be nothing. Look at the boys of your age they are on way to become something.
     अशा प्रसंगी पुष्कळदा मी अनुभवला की पराशर यांचे तत्वज्ञान समजणे एक वेळ सोपे, पण त्यांच्या शब्दांना मराठीत मार्मिक शब्द निवडणे फार कठिण आणि अनुवाद करतांना एखादा शब्द किंवा कल्पना फार फैलावून लिहिण्यात कांही मजा नसते.
     या कादंबरीतील तत्वज्ञान पाहिले तर सोपेच आहे. माणसाने स्वतःला बिल्ले लावून घ्यायची गरज नाही- काम्पिटीशन टाळणे सहज शक्य आहे. नेहमी जय- पराजयासाठीच खेळायची गरज आहे कां? लहान मुलांनी मोठेपणी काय व्हाव हे ठरवतांना त्या मुलांच्या मताला किंमत असावी की नाही?
    पण खरे तर त्यांचे तत्वज्ञान एवढेही मोठे  नाही. याहूनही सोपे आहे -माणसाने मुक्त असावे- मुक्त बागडावे- आपल्या विचारांना मुक्त ठेवावे- बस!  आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा प्रवास वेगवेगळ्या द-या आणि खिंडीतून होत असतांना आपण मुक्त होतो तेंव्हा शेवटची खिंड ओलांडतो.
     पण प्रवास तिथे संपत नाही. तर मग “त्या” प्रवासात कांय असते? याचे उत्तर वाचकावर सोपवले होते.
मला ईशावस्योपनिबदामधला एक श्लोक आठवतो-
विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदोsभयं सह ।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाsमृतमश्नुते ।।
     याचा मला कळलेला अर्थ असा- अविद्येच्या जोरावर मृत्युला पार केल्यानंतर पुढील प्रवासात विद्येंच्या साथीने तुम्हाला अमृतत्वापर्यंत जाता येते. थोडक्यांत मृत्युला पार जाणे म्हणजे अमृतत्व नसून मृत्युला तरूण जाणे ही फक्त नव्या प्रवासाची सुरुवात आहे- अमृतत्वाचा टप्पा- अजूनही खूप पुढे आहे.
      पण पराशर यांच्याबरोबर ही चर्चा केलेली नाही- कारण ते म्हणणार पहा, स्वतःला कांय जाणवले त्याचे महत्व न मानता तुम्ही पुनः एकदा पूर्वापार आलेल्या उपनिषदांना उद्धृत करता!
     खिंडीच्या पलीकडे ही कादंबरी नाशिक लोकमत च्या दिवाळी .... च्या अंकात येऊन गेलेली आहे. त्यासाठी अपर्णा वेलणकर यांचे आभार. आता ही पुस्तक रूपाने प्रसिध्द होत आहे. त्यासाठी इंडिया प्रिंट चे योगेश पालकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच मुखपृष्ठ  व आतली चित्रे काढणा-या श्री मुधोळकर व श्री ... यांची मी आभारी आहे. माझी मैत्रिण रोहिणी कुळकर्णी यांनी सुंदर रसग्रहणात्मक प्रतिसाद लिहून दिला त्याबद्दल त्यांचेही आभार. माझी मुले आदित्य, हृषीकेश. बहिणीचा मुलगा क्षितिज आणि भावची मुलगी सृष्टी यांनी माझ्या आग्रहावरून ही कादंबरी वाचली व नंतर मलाच तिची एवढी भरभरून वर्णन ऐकवली जणू कांही त्यांच्याच आग्रहावरून मी कादंबरी वाचली. पण त्यामुळेच मी कादंबरीचा मराठी अनुवाद करायचे ठरवले. म्हणून त्यांचेही आभार.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
   
   
 
 

गुरुवार, 11 दिसंबर 2014

सेई महावर्षार राङ्गा जल

सेई महावर्षार राङ्गा जल

सेई महावर्षार रांगा जल 
लेखक- विभूति भूषण दास गुप्त
(आधी बिहारमधे वास्तव्य असलेले  श्री विभूतिभूषण दास गुप्त स्वातंत्र्यानंतर बंगाल मधे जाऊन राहिले. तिथेच कंपास या बंगाली मासिकाच्या  शारदीय अंकात १९७५ मधे हा लेख प्रसिद्ध झाला. पुढे  श्री नंदकिशोर शुक्ला यांनी त्यांचे पुस्तक "The Trial of Vaikunth Sukul" या पुस्तकात या लेखाचा अनुवाद समाविष्ट केला आहे. )

आमि जाबो जेथा तव तरी रोय
ओ गो मरण, हे मोर मरण
जेथा अकूल होईते वायु बोय,
     कोरि अंधारेर अनुसरण।
जदि देखी घनघोर मेघोदय
दूर इशानेर कोने आकाशे
जदि विद्युत्फणी ज्वालामय
तार उद्यत फणी विकासे।
आमि फिरबोना कोरि मिथ्य़ा भय
आमि कोरिबो नीरवे तरण
सेई महावर्षार रांगा जल
ओ गो मरण, हे मोर मरण
                          (रवीन्द्रनाथ ठाकुर)

    ओ मरणा, माझ्या प्रिय मरणा, मी जिथे जाईन तिथे तुझी नौका माझ्या बरोबर असू दे. जिथे घटाटोप अंधाराचे अनुसरण करीत कूलहीन (किनारा नसलेला ) वायु या नौकेला घेऊन चालेल।सुदूर ईशान्य कोपऱ्यात घनघोर ढगांमधे विद्युत्सर्प आपला ज्वालामयी फणा उभारून माझ्या प्रति उद्यत झालेला असेल। तरी मी परत फिरणार नाही. कुठल्याही खोट्या भयाने मी मागे वळणार नाही. महावर्षा होत असेल. त्या रक्तिम जळामधे मौन, नीरव होऊन तुझ्या नौकातून मी पार होईन- ओ माझ्या प्रिय मरणा!

    ते १९३० साल असेल. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे १९२९ मधेच आम्हां कांही जणांना दोन-दोन वर्षांची कैद झालेली होती. ज्या कलमांखाली शिक्षा झाली ती सर्व अहिंसेशी संबंधित कलम होती- उदाहरणार्थ कलम १०८ (त्या काळातील भारतीय दंड संहितेचे कलम) आणि अशीच कांहीतरी. गांधीजींची दांडी यात्रा सुरु झाली तेंव्हा आमच्या बंदिवासाचे कांही दिवस उलटून गेलेले होते.
    
आम्हाला तृतीय श्रेणीची कैद दिलेली होती त्यामुळे ज्या त्या जेलर किंवा सुपरिटेंण्डंटच्या मर्जीप्रमाणे आमची गणना कधी राजकीय तर कधी सामान्य कैद्यांमधे म्हणजे “जर्नली” (जनरल चा अपभ्रंश) या नावाने होत असे.यामुळे जेल कामगार आणि जेल व्यवस्थापना बरोबर नेहमीच आमचे भांडण तंटे होत असत. माझ्या “हिस्ट्री रेकॉर्ड” वरून मी “खतरनाक कैदी” होतो- म्हणून साधारणपणे तीन महिन्यांच्या वर मला एका जेल मधे ठेवत नसत.
    
यामुळेच मला आधी पुरुलिया मग मुजफ्फरपूर, तिथून दूर बालेश्वर, तिथून पुनः पुरुलिया आणि तिथून पटण्याजवळ फुलवारी शरीफ कॅम्प जेल मधे पाठवण्यां आल! एव्हाना दांडी यात्रा संपलेली होती, गांधीजी अटकेत गेले होते आणि ब्रिटिश सरकारने सर्व देशभर लाठी, काठी, जेल असे कठोर दमन- चक्र चालू केले होते.
  
  त्या काळांत बिहार आणि ओरिसा एकाच प्रांतात होते. त्या काळातील कैद्यांना शरीर झाकण्यासाठी एक जांघ्या आणि अंगरखा दिला जायचा. शिवाय एक लोखंडी पत्र्याचा थाळा आणि एक वाटी पण दिली जायची.

मुक्काम- पटना कॅम्प जेल
त्या काळात कैदेत राहूनच बिहारमधील जन आंदोलनाचे स्वरूप समजू शकले असते. ठेलेवाले, टमटम चालवणारे, शेतकरी, शेतमजूर, निम्न आणि मध्यम वर्गीय ग्रामीण किंवा निम्न- मध्य वर्गीय शहरी- पंच्याण्णव टक्के हेच लोक जन आंदोलनात शामिल होते. काँग्रेस नेता किंवा दोन-तीन मजली घरांचे मालक लोक यांना हजारीबाग जेल मधे ठेवत. कैम्प जेलच्या कैद्यांपैकी ऐंशी टक्के तरी निरक्षरच असत.
    माझे इतर सहकारी एव्हाना विखरून गेले होते. कुणी बालेश्वर जेल मधे होते तर कुणी कटक जेल मधे. आमच्या ग्रुपपैकी पटना कॅम्प जेल मधे मी एकटाच!
    इथे “स्वराजी” कैदी पाच हजाराहून जास्त होते. तारेच कम्पाऊंड टाकलेल एक विशाल क्षेत्र होत- त्याच्या एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्याची माणस अशी छोटी- छोटी दिसायची. मधे मधे विटांच्या भिंती आणि पत्र्याची छपर असलेली कांही घर एका रांगेत एखाद्या आ बसलेल्या भीमकाय दैत्याप्रमाणे दिसायची. एकेका घरांत शंभर- सव्वाशे कैदी एकाला एक चिकटून दोन रांगा करून झोपेत असत. इथे ब्राह्मण आणि चांभार असा भेदभाव नव्हता. भूमिहार, राजपूत, कायस्थ, कहार, दुसाध, धनी- निर्धन सगळ्यांसाठी एकच व्यवस्था होती. इथे कुणाच्या गुणावगुणांची ओळखदेख नव्हती. थोडक्यांत सांगायच तर माओ-त्से-तुंग चे कम्यूनच ते होते.

    जेल सुपरिंटेण्डंट होते मिस्टर परेरा, आय्. एम्. एस्. कैदेत अनुशासन कायम ठेवण्याला अद्भभुत आणि चपखल अस हे व्यक्तिमत्व होत. त्यांच्या काळात अनुशासनासाठी वेताने फोडून काढण्याचा कांही घटना झालेल्या होत्या. डुमराँव च्या सहा फुटी उंचापुऱ्या चौबेजींना जेंव्हा पंचवीस वेत मारल्यानंतर टिकटिकी वरुन खाली उतरवल (दगडी- लादी जिच्यावर झोपवून कैद्यांना वेताचे फटके मारीत) तेंव्हा दोन्हीं ढुंगणावरुन रक्ताची धार लागली असतानाही नंग्या शरीरानेच त्यांनी दोन- चार दंड बैठका काढल्या आणि ताल ठोकून परेराला ललकारल- “ये साल्या, डुकराची औलाद, मार अजून किती फटके मारायचे ते।”  तेंव्हापासून परेराने अनुशासनासाठी इतर शिक्षा दिल्या असतील, पण कुणाला टिकटिकीवर नाही चढवल.

    परेरा आंग्ल- मद्रासी होता. “स्वराजी” कैद्यांना कठोर दंड द्यायचा. पण ते आजारी पडले तर तितक्याच प्राणपणाने त्यांना वाचवायचा प्रयत्न करायचा. एवढ्या मोठ्या कैदेत औषधाला सुध्दा माशी सापडली नसती. “पंचवीस माशा असल्या तर एक दिवस दंडवाढ” यामुळे हजारो मीठ- सत्याग्रही स्वराजी लोकांनी तारेच्या जाळ्या वापरून संपूर्ण माशीवंशाचा उच्छेद करून टाकला होता.
    
कामे सगळ्यांना वेगवेगळी होती. आधी घाणीला जुंपून तेल काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण घाणीच्या लोखंडी दांडीने कुणी कैदी कुण्या जमादाराच डोक फोडेल म्हणून एकेक करून सगळ्या घाण्या काढून टाकल्या होत्या. जेवणाची व्यवस्था आम्हीच करायचो. एकेका वॉर्डर वर एकेका दिवसाची रसद आणायची, स्वयंपाक करण्याची आणि पाच- साडे पाच हजार कैद्यांना जेऊ घालण्याची जबाबदारी होती. जेल कर्मचारी फक्त सकाळी वॉर्ड उघडतांना आणि रात्री बंद होतांना संख्या पुरी भरली की नाही एवढेच बघत. संपूर्ण जेलमधे, लेखन- वाचन असले प्रकार नव्हतेच. दंड-बैठका, कुस्ती-आखाडा हेच चर्चेचे प्रिय विषय होते. मधूनच पागल घंटी वाजणे, मग लाठीचार्ज, कैद्यांची डोकी फुटणे, मग वॉर्डात जायला नकार, एक- दोन दिवसांचे उपोषण--  एकसुरीपणा घालवायला या गोष्टी होत्याच.
    
माझ्याकडे देखील लिहा-वाचायला फारशी पुस्तक नव्हती. रवींद्रनाथांची “चयनिका” आणि    “गीतांजली”  ठेवायची परवानगी मिळाली होती. मी कधी मनांत तर कधी जोरजोरात कविता वाचन करायचो. कवित पाठ पण झाल्या होत्या, त्या मी तन्मय होऊन गात असे. त्यातील छंद- झंकारांनी प्रभावित होऊन कित्येक बिहारी तरुण मला अर्थ विचारायला यायचे. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. पटण्याचा एक अशिक्षित ठेलेवाला मुग्ध होऊन ऐकायचा - “मरण रे, तुहूँ मम श्याम समान।”

        व्याख्या करतांना माझ्या बुध्दिनुसार मी त्याला राजकीय संदर्भ द्यायचो- “जशी राधिका कृष्णाच्या प्रेमात विभोर होऊन मृत्यला देखील श्यामस्वरुपच समजते, तसच आपणही देशाच्या संदर्भात मरणाला किंवा लाठी- काठी, गोळ्या, फाशी यांना त्याच भावनेने बघायला शिकल पाहिजे”  इत्यादि!

    कळो अगर न कळो, पण रवींद्रनाथांच्या कवितेतील छंद- माधुर्यच हृदयाला विभोर करून टाकत असे. या दृष्टीने रवींद्र- साहित्याची छाननी आणि रसग्रहण कुण्या शोधकर्त्याने केल असत तर किती बर झाल असत- पण ते होणे नाही असो.

    एक दिवस रवींद्रनाथांची “मरण- मिलन” ही कविता वाचत होतो. काशी विद्यापीठाचे कांही विद्यार्थी पण तिथे बसले होते- त्यांना थोड फार बंगाली समजत असे. मी वाचत होतो आणि अर्थ सांगत होतो- आपली तयारी अशी असली पाहिजे कि आपलं आलिंगन करतांना मृत्यूलाच स्वतःची धन्यता वाटेल.

    एक दिवस त्यांच्या मागे बसलेला एक युवक मैथिली मिश्रित हिंदीमधून लाजत- लाजत मला म्हणाला- ही कविता तुम्हीं मला देवनागरीत लिहून द्याल तर कृपा होईल- मला ती पाठ करायची आहे.
    
आकर्षक गौरवर्णी चेहरा, कुरळे केस, एकदम नितळ आणि निष्पाप दृष्टि! मी म्हटल- तुला आधी कधी नाही बघितल! तो म्हणाला- मी दोनच दिवसांपूर्वी आलोय्. मी विचारल- घर कुठे आहे- “मुजफ्फरपूरला”। “तुझ नांव कांय?” – “बैकुंठ शुक्ल”!

     त्यानंतर बरेचदा इतर कुणी नाही अस बघून वैकुंठ माझ्या जवळ येऊन बसायचा. मिथिलावासी- खासकरुन शिक्षित असतील तर त्यांना बंगाली बऱ्यापैकी येत असते. वैकुंठ शुक्ल येऊन चयनिका वाचत बसायचा. मधेच बरच कांही विचारायचा.
    
एक दिवस तो मोठ्याने वाचत होता-
“सेई महावर्षार रांगा जल,
ओ गो मरण, हे मोर मरण,....
आणि त्याने पुढची ओळ म्हटली-
“आमि कोरिबो नीरव तरण”
मी विचारल- कांही समजले ?
तो म्हणाला- “तरण” हा शब्द आम्ही पण वापरतो.
मी म्हटल- मग असच तरुन जाऊ शकशील ना?
    वैकुंठ शुक्लच्या मुखमंडलावर एक सलज्ज स्मित पसरल!
--------------------------------------------------------------------------------------------------------
   
सन् १९३२.   
मागच्या वर्षी गांधी इरविन पॅक्ट प्रमाणे माझी पटना जेल मधून  सुटका झालेली होती पण पोलिसांचा ससेमिरा चुकला नव्हता. दामोदर नदीच्या किनाऱ्यावर रघुनाथपुर पोलिस चौकीच्या तीक्ष्ण नाकाखालीच करगली गांवात कांग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक शिक्षण शिबिर भरल होत. माझे वडील आणि काका तिथेच रहात. वडील त्यावेळी बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपसभापति होते आणि डॉ. राजेंद्र प्रसाद सभापति।
    
शिक्षण शिबिर धूम धडाक्याच चालू असतानाच एक दिवस राजेंद्रबाबूंची पटण्याहून तार आल्याने वडील आणि काका तिकडे रवाना झाले. एव्हाना राजनैतिक आकाशात पुनः विजा चमकू लागल्या होत्या. कधीही वज्रपात होऊ शकेल अशी अवस्था!

    हठात् एक दिवस दोन प्रहरी पुरुलिया वरून जीमूतदा आले आणि म्हणाले- सगळ सामान आवरा आणि पसार व्हा. पोलिसांनी सगळ्यांना गिरफ्तार करायच ठरवल आहे.
    
मुळात करगली गांवच पुरुलिया पासून तीन मैल. त्यातून आमच शिबिर करगली पासून एक मैल पुढे एका निर्जन डाक बंगल्यात. इथे जिल्हा बोर्डाच ऑफिस होत आणि जीमूतदा बहुधा जिल्हा बोर्डाचे व्हाइस चेअरमन होते. म्हणूनच ते धावपळ करून आम्हाला सावध करायला आले होते. मी रस्त्यावर दोन बाजूला दोन माणस निगराणीसाठी ठेवली. दोन- तीन तासात दोन बैलगाड्यांवर सगळ सामान लादल. रामचंद्र अधिकारी यांना गाडीवान नेमून आणि सर्व जबाबदारी समजावून सांगून आम्ही सर्व अज्ञात मार्गावर रवाना झालो.

    नंतर समजल- आम्ही गेल्यानंतर सुमारे दोनच तासांनी पोलिस आले होते- पांच- सहा ट्रक भरून सशस्त्र पोलिस! पण शिबिरांत फक्त एक बिन झेंड्याचा ध्वजदंड आणि त्याच्या आजूबाजूला अजून धुमसत असलेली कांही गोवरीची कांड- आमच्या अस्तित्वाचा तेवढाच पुरावा पाहून पोलिस अत्यंत चिडले होते, आणि त्यांना अपमानित वाटल होत.

    अशा प्रकारे कांही दिवस मी फरार राहिलो. त्याकाळाच्या क्रांतिकारी भाषेत- ऍबस्कॉंडिंग आणी आजच्या साम्यवादी  भाषेत अंडरग्राऊंड। त्याकाळाचे काँग्रेस किंवा गांधीवादी तत्वज्ञान अशा फरारी होण्याचे समर्थन करीत नसे. म्हणूनच बिहारच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख मिस्टर पार्किन माझा संबंध कांही हिंसात्मक घटनांशी जोडून त्या आधारे मला गिरफ्तार करू बघत होता. पण पुरुलिया शहरांतील प्रत्येक परिवाराशी माझे चांगले संबंध होते. गांवात शिरताच जसे मीठ पाण्यात विरघळते तसा मी मिसळून जात असे. पोलिसांची तगमग वाढतच होती.

    शेवटी एकदाचा नोआगढ बाजारात आयोजित केलेल्या खुल्या सार्वजनिक सभेमधे भाषण देतांना त्यांनी मला पकडल। इतर कित्येक लोक पकडले गेले.

    जेल मधेच सुनवाई झाली. आधी मला माहीतच नव्हत कोणत्या कलमाखाली मला पकडलय् ते. मग पाहिल- कलम १२० पासून ते कित्येक अन्य “खतरनाक” कलमांसाठी पोलिस मला शोधत होते.

    पहिल्याच दिवशी मी मॅजिस्ट्रेटला सांगितल -- "तुम्हाला जे कांही करायचय् ते आजच करा. उद्यापासून मी कोर्टात येणार नाही. मला मुसक्या बांधून, ओढत, फरफटत आणाव लागेल." ते म्हणाले- "तर मग उद्याची तारीख देतोय. आला नाहीस तर या सर्व कलमांखेरीज न्यायालयाच्या मानहानीचा आरोप पण ठेऊ."   मी म्हटल- "ठीक तर। तुमची नाटकं- प्रहसनं चालू देत. काय ते मला माझ्या वार्ड मधे कळवून टाका."   रागाने मॅजिस्ट्रेटच तोंड काळवंडल. पण एक दिवस थांबण त्याला भाग होत.

    दुसऱ्या दिवशी जेल-ऑफिसातच सुनावणीसाठी मला बोलवायला जमादार आणि जेलर दोघे आले. थोडा उपदेश, थोडी विनंति, थोडी माझ्या संकटाबद्दलची काळजी दाखवली. पण मी अडून बसलो- मॅजिस्ट्रेटला इथेच पाठवा. काय असेल ते असो. त्यांनी मला त्याच्यासमोर नेण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या परोक्षच वेगवेगळ्या कलमांखाली चार वर्ष सश्रम कैद आणी कोर्टाच्या अवमाननेसाठी सहा महिने साधी कैद ठोठावण्यात आली. मला तृतीय श्रेणीचा कैदी ठरवल. नंतर काही दिवस मी पुरुलिया कैदेतच होतो. माझ्या कन्व्हिक्ट हिस्ट्री तिकिटावर पाहिल तर लाल शाईने P लिहिलेल होत- म्हणजेच मला पोलिटिकल कैदी ठरवून माझी प्रतिष्ठा वाढवली होती.

    एका सायंकाळी एक पोलिस इन्स्पेक्टर आणि त्याचे कित्येक रायफलधारी शिपाई मला बेड्या घालून आणि कमरेत दोरखंड बांधून, ट्रेन मधे बसवून निघाले. ते मला गया सेंट्रल जेल मधे घेऊन जात होते. सबंध प्रवासभर त्यांनी माझ्या बेड्या किंवा दोरखंड काढला नाही- पण इतर त्रास मात्र दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास मला गया जेलच्या गेटवर सुपर्द करून ते परत गेले.
-----------------------------------------------------------------------------------------------------
    आधी गया सेंट्रल जेल आणि इथल्या वातावरणाबद्दल कांही सांगायला हव.
    देशातील सर्व सेंट्रल जेल्स मधे गया जेलच एक वेगळ स्थान आहे. गया शहरातून निघून एक मोठा रस्ता ग्रॅण्ड ट्रंक रोडला जाऊन मिळतो. शहरातून बाहेर निघाल्यावर त्याच रस्त्यावर आजूबाजूच्या परिसराला आव्हान देत गया सेंट्रल जेलच्या विस्तीर्ण लांबच लांब आणि उंच भिंती उभ्या आहेत. रस्त्याच्या एका अंगाला जेल आणि दुसऱ्या अंगाला तशीच उंच आणि अवघड टेकडी.

    मी इथे येण्याच्या काही काळ आधी अंदमानचा कुख्यात जेलर बर्कले हिल इथे बदलून आला होता. ब्रह्मवैवर्त पुराणात वर्णन केलेले नरकांचे शहाऐंशी प्रकार आणि बौद्ध ग्रंथांतले महानरकांचे आठ प्रकार- सगळे चौऱ्याण्णव प्रकार बर्कलेच्या कृपेने गया जेल मधे उपलब्ध होते अस म्हटल तर अतिशयोक्ति होणार नाही.

    कैदेचा दोषी पहिल्या प्रथम जेल मधे आणला की त्याला दहा दिवस क्वारंटाइन करत. मग त्याला दवाखान्यात पाठवून तपासून घेत. मग शारीरिक क्षमतेप्रमाणे त्याच्यासाठी हाय, मिडियम किंवा लाइट कमान- म्हणजे काम ठरवले जाई. स्वतः वर्कले याची देखरेख करायचा.

    बर्कलेच्या आदेशाप्रमाणे कैद्याला देण्याच्या कामाबद्दल पत्र मिळवण्यासाठी दवाखान्यात नेतांना त्याला एकदम नंगा करून नेत. कैद्याला त्याच डोक पार गुडद्यापर्यंत वाकवायला लावत. त्यानंतर बर्कले त्याच्या गुह्यांगावर थुंकून अट्टहास करीत असे. हा त्याच्या नीचतेचा एक नमूनाच होता. अशा प्रकारच्या कसोट्या लावून कैद्याची क्षमता तपासली जात असे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे पण बर्कले सुपरिटेंण्डेंट होता तोपर्यंत हेच होत असे.

    त्या काळात एक इंग्रज अधिकारी मोक्रे हा बिहारच्या जेल्ससाठी आय्.जी म्हणून नेमून आला.  बर्कले बाबत वेगवेगळ्या बातम्या, विशेषतः राजकीय कैद्यांबरोबर त्याचा व्यवहार मोक्रेच्या कानांवर गेला असणार. एक दिवस कुणालाही कल्पना न देता तो अचानक इन्सपेक्शन साठी आला. जेलच्या बाहेर गाडी उभी करून आला आणी गेटवरील जेलरला घेऊन सरळ आत शिरला. त्यावेळी गया जिल्ह्यातील एका मुसलमान जमीनदाराच्या मुलाला इतरांच्या जमीनीवर बेकायदा कब्जा करण्याच्या आणि त्यासाठी दहशत पसरवण्याच्या गुन्हाच्या नांवाखाली कैदेत ठेवल होत. त्याला नंगा करून, त्याचे दोन्हीं हात मागे बांधून बेड्या लावल्या होत्या दोन बाजूंनी संतरी त्याचे कान धरून त्याला जेलच्या पूर्ण पटांगणात फिरवत होते. त्याचा अपराध हा होता कि त्या दिवशी त्याने चक्की चालवायला नकार दिला होता.

    आय् जी आल्यानंतर जेलरला इतरांना सावध करायचा वेळ मिळालाच नाही. मोक्रेने सगळा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. बर्कले त्यावेळी जेलमधे नव्हता. मोक्रे सरळ त्याच्या बंगल्यावर गेला. तिथे दोघांमधे कांय बोलण झाल ते कळायला मार्ग नाही. पण त्याच रात्री बर्कलेने आत्महत्या केली. त्याच्या सगळ्या कुकर्मामध्ये जेलर, हेड जमादार किसन लाल, आणि त्याचा पर्सनल अर्दली  रासबिहारी सहभागी होते. कैदी त्यांना क्रमशः पिशाच, प्रेत आणि राक्षस म्हणत असत.

    मला गया जेल मधे आणल त्याआधीच बर्कलेने आत्महत्या केलेली होती. तरीही या तिघांचे व्यवहार पूर्ववत् चालू राहिले. नंतर मात्र एक पारशी सुपरिंटेण्डट आला. तो थोड्या वेगवेगळ्या स्वभावाचा होता म्हणून या तिघांच्या क्रूरतेला आळा बसला.
----------------------------------------------------------------------------------------------------------
    रेलवे प्रवासाने मी दमून गेलो होतो. पटकन् हात पाय पसरून झोपाव ही इच्छा होती.

    जेलच्या गेट ऑफिस मधे मला भर्ती करून नवीन बंगाली जेलरने हेड जमादाराला सांगितले  “घेऊन जा- पंधरा नंबर!”  हेड जमादार मला घेऊन पंधरा नंबर वार्ड मधे आला आणि तिथल्या ड्यूटी जमादार, ड्यूटी वार्डर आणि पहारेकऱ्याच्या सुपूर्द करून म्हणाला- “बाबूजी, शांततेने रहा, ही गया जेल आहे।”

    पंधरा नंबर वार्ड! नीट पाहून घेतल- त्यात दहा सॉलिटरी- किंवा बऱ्याच जणांच्या भाषेत  “कंडेम्ड”  सेल होते. ज्यांना तिथे रहाव लागल नसेल त्यांना कल्पनाच करता येणार नाही कि हा कांय प्रकार असतो.

    प्रत्येक सेलची लांबी सुमारे दोन माणसांची आणि रूंदी दीड माणसाची! सेल मधे जाण्यासाठी संपूर्ण रूंदीइतक जाड गजांच विशाल “सिंहव्दार” होत. अगदी मागच्या भिंतीवर छताला लागून जाड लोखंडी गज असलेली छोटीशी खिडकी होती. दाराच्या उजव्या हाताला भिंतीला लागूनच सिमेंटचा एक मोठा चौथरा होता- त्यावर कैद्याला गहू किंवा डाळ दळायला देत असत. सेलच्या बाहेर सेलच्याच उंचीची मजबूत दगडी भिंत होती, जिला मजबूत लाकडी दार होत. त्याला एक छोट भोक होत- त्यातूनच बाहेरचा माणूस सेलच्या आतल्या कैद्याला बघू शकत होता. सेलच्या आतून बघितल्यावर समोरची भिंत आणि आकाशाचा एक छोटा तुकडा एवढच दिसत असे.

    सेल रिकामा असेल तरी त्याच दार उघड ठेवत नसत. जमादाराने माझ्यासाठी एकदम टोकावरील दहा नंबरच्या सेलच दार उघडून दिल. पुरुलियाहून मी तिथला जांघिया कुडता घालून आलो होतो. तो घेऊन मला इथल्या जेलचा जांघिया- कुडता देण्यात आले. शिवाय लोखंडी थाळा, वाटी, आणि घोंगडी. सफाईवाल्याला बोलावून विधी करण्यासाठी एक टोपली आणि पाणक्याला एक बादली पाणी तसच दुसऱ्या एका माणसाला माझ्यासाठी नाश्ता आणायला पाठवल.

    मला कळेना की माझ्यासारख्या तृतीय श्रेणी कैद्यासाठी इतकी व्यवस्था? नंतर मला सांगण्यात आल की पंधरा नंबर वार्डचा कैदी नेहमीच सम्माननीय असतो. सरकार ज्याला  “खतरनाक”  समजते त्यालाच या वॉर्डात पाठवतात. अशा कैद्याला इथे आणल्यापासून तो त्याच्या सुटकेच्या रात्रीपर्यंत या एकाच कोठीत रहाव लागत.

    पाणक्या पाण्याबरोबरच एक दातवण पण घेऊन आला. त्याच्याच भांड्यातून पाणी घेऊन हात तोंड
धुवून सेलच्या भिंतीच्या जवळ येऊन उभा राहिलो तोच पाहिल की जेलचा पायजमा, वर पंजाबी कुडता आणि पायात चप्पल असा एक कैदी बाहेरून पंधरा नंबरच्या वार्डात दाखल झाला. आश्चर्य वाटून थोड पुढे येऊन पाहिल तर सात नंबर सेल मधे एक खाट, मच्छरदाणी, शेजारी टेबल- खुर्ची असा सर्व सरंजाम होता. आगंतुकाचा चेहरा निरखून पाहिला तो तोंडावर देवीचे वण, वय जास्त नाही, बऱ्यापैकी गुबगुबीत चेहरेपट्टी - तो सेल मधे जाऊन पुनः बाहेर आला आणी मला विचारल-  तुम्हीं आजच आलात कांय?
“हो!”
“कुठून?”
“पुरुलियाहून”
“पोलिटिकल कैदी?”
“हो!”
“आपल नांव कांय?”
  मी माझ नांव सांगितल
“शिक्षा?”
तेही सांगितल. तो अजून कांही विचारणार त्या आधी मीच विचारल-
“तुम्हाला या सेलमधे ठेवलय्?”
“हो, माझी बी डिव्हिजन आहे!”
लक्षात आल. पण म्हणून एवढ्या सोई?
मी पुनः म्हटल- तुमच नांव समजेल कां? थोड थांबून तो म्हणाला- हजारीलाल!
    
याला कधी पाहिल नसेल- पण नांव मात्र अपरिचित नव्हत. एव्हाना मी कदाचित उत्तेजित झालो असेन. म्हटल- “अच्छा, हजारीलाल! म्हणजे तुम्हीच लाहौर षड्यंत्र केस मध्ये किंग्ज विटनेस (सरकारी साक्षीदार) होता!
मी तावातावाने बोललो, त्याने तो हतबुध्द झाला। तरी थोडा निर्ढावून म्हणाला-
“हो होतो- मग कांय?”
एव्हाना मी रागाने थरथरत होतो.
त्याच्या गादी, मच्छरदाणी कडे बोट दाखवून बोललो  "कांय कांय? यू.. ट्रेटर ! भगतसिंगाला फासावर चढवून आणि यतीनदासला उपोषणात मरण आणून तू इंग्रजांकडून हे इनाम मिळवलस? देशाच दुर्दैव दॅट यू आर स्टिल अलाइव्ह!”

    रात्रभर ट्रेन मधे झोप झाली नव्हती. आंघोळही अजून केली नव्हती. जागरणाने डोके लाल झाले असावेत. अशा तऱ्हेच्या चर्चेत शांति, प्रेमाची स्निग्धता वाणीमधे येऊ शकत नाही. हजारीलालने कांय अर्थ लावला कुणास ठाऊक, पण वेगाने निघून तो वार्डाच्या बाहेर पडला.

    वार्डर माझ्यासाठी कपडे आणि पाणी घेऊन आला. आंघोळ करून जरा बरं वाटलं. तेवढ्यांत नाश्त्यासाठी भनसियाने (स्वयंपाक्याने) खिचडी आणि तळलेल्या मिरच्या आणल्या. माझी लोखंडी थाळी अजून स्वच्छ केली नव्हती पहारेकऱ्याच्याच थाळीत खिचडी घेऊन मी खायला बसलो.

    अर्ध खाणं होतय् तोच हेड जमादार आला आणि म्हणाला- बाबूजी, नाश्ता चालू आहे कां? मी म्हटल हो, तुमची व्यवस्था चांगली आहे. त्याने पहारेकऱ्याला बोलवून विचारल- बाबूजींच सामान आणल कां? त्याने सलाम ठोकून सांगितल- "चट्टी (अंथरायला पेंढा भरून केलेल पोत्याच बिछावन) सोडून सगळ आणलय!"  थोड्या संकोचाने हेड जमादार म्हणाला- बाबूजी तुम्हाला दुसऱ्या वार्डात जावं लागेल. “कशासाठी?”  निःस्पृह भावनेने तो उत्तरला- मला आत्ताच ऑर्डर मिळाली आहे. मी विचारल- कुठे जाव लागेल?  “सात नम्बर वॉर्डात!”
    त्याने पहारेकऱ्याकडे वळून हुकूम सोडला- बाबूजींच सगळ सामान सात नंबर मधे घेऊन चल.

     सात नंबर मधे फाशीच्या कैद्यांना ठेवत असत. म्हणजे असे कैदी ज्यांना फांशीची शिक्षा मुक्रर झालेली आहे- त्यांना फांशी होईपर्यंत,  किंवा फाशी विरुध्द अपील केल असल्यास अपीलाचा निकाल लागेपर्यंत.

    पंधरा नंबरच्या बाहेर पडल्या पडल्या हेड जमादाराने विचारल- बाबूजी, बी डिविजनच्या बाबूशी कांय खटपट केलीत?
    मी उत्तर दिल- गद्दाराला गद्दार म्हटल!  बस्स!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    सात नंबर वॉर्ड!
    पंधरा नंबरचा वॉर्ड  गया जेलच्या एका टोकाला तर सात नंबर वॉर्ड जेलच्या मध्यभागी आहे. इथे सहा सेल होते. ते सर्व पाच-सहा फुट उंचीवर होते. तीन- चार पायऱ्या चढून सेलचा दरवाजा येई. इथे दळायला चक्की नव्हती. इथेही समोरच्या थोड्या मोकळ्या जागेनंतर मोठी दगडी भिंत होती आणि सेलमधे जाण्यासाठी आ वासलेले लोखंडी सिंहद्वार इथेही होते.

    फांशीची शिक्षा झालेला कैदी रात्रंदिवस वॉर्डातच बंद असतो. दिवसा दोन वॉर्डर , एक मेट आणि एक पहारेकरी “सावधान” पोझिशन मधे उभे असतात, पण रात्री फक्त जेल वॉर्डर असतो. इथले नियम-कानून-निषेध- कशालाच कांही सीमा नसते. सकाळी खिचडीचा नाश्ता देतांना, दुपारी आंघोळीला आणि जेवणाला फक्त दार उघडत असे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तीन घोंगड्या कशा मिळतील एवढे एकच दिवास्वप्न बघत किंवा रात्री अशाच कांही कल्पनातीत गोष्टींची आराधना करत जागरणात वेळ जायचा.

    इतक्या कडक पहाऱ्यात रहायची कधी कल्पना तरी मी केली होती?  कृष्णाचा एक पळ विरह देखील राधेला व्याकुळ करीत असे!  पण या सेल मधील व्याकुळता कदाचित तिच्या व्याकुळतेपेक्षाही तीव्र होती.
   
 सात नंबर मधे आधीच एक फाशीचा कैदी होता- त्याच्या शेजारच्याच सेल मधे मला ठेवल - लक्ष ठेवायला सोप जावं म्हणून!  त्याच वय असेल वीस बावीस वर्ष. काळा कभिन्न सतेज देह-  जणू कांही काळ्या पाषाणातून कोरून काढलेला. त्या नयनाभिराम जिवंत मूर्तिकडे पाहून पटेना की हा फांशीचा कैदी आहे. राँची जिल्ह्यातला कुणी आदिवासी होता- कोल जातीचा असेल नाहीतर मुण्डा तरी! जमादार आणि वॉर्डर स्वतः समोर बसून त्याच्या जेवणावर देखरेख करीत- डॉक्टर त्याच्या जेवणाची रोज तपासणी करीत. पण हा पठ्ठा, ज्याला आज नाहीतर उद्या फांशी होणार- तो एकदम निर्विकार आणि उदासीन भावनेने वागत होता. सर्वांशी हसून बोलायचा. पंधरा दिवसांनी त्याच वजनही वाढलेलं असायच. मला हे विचित्रच होत. मनांत कांहीही आदर्श नसतांना मृत्यू सामोरा आला- मग तो स्वतःचा असेल अगर दुसऱ्याचा असेल-  तरी त्याला कांय हा साधारण गोष्ट मानीत होता? आपल्या मनांत मृत्यूभय नेहमी असतं. ते घालवायला आपण एखादा आदर्श मनांत बाळगतो- त्याच्याच आधाराने मृत्यूभयावर विजय मिळवायचा प्रयत्न करतो. या गया जेल मधेच पुढे मी असेही कैदी बघितले होते- जे आदर्शवादी नसून अगदी हॅबिच्युअल क्रिमिनल होते- आणि तेही ताल ठोकून फांशीच्या तख्तावर चढत. मला वाटत भयाधिक्यामुळेच ते ताल ठोकत असावेत- भयाचा अस्वीकार करण्याचा प्रयत्न म्हणून.

    पण या कैद्याची निर्विकरिता पाहिल्यावर वाटायच की त्याला मृत्यूच  भय अजिबात नव्हत. किंवा कदाचित त्याला भय कशाला म्हणतात तेच माहित नव्हत. त्याच अपील चालू होत. अजून फैसला व्हायचा होता. त्यामुळे त्याच्यावर विशेष लक्ष ठेवल जात असे.

    असे दिवस जात असतानाच आणि आपल्या तीनच घोंगड्यांमधे आपले थंडीचे दिवस कसे निभतील अशा एकाच विवंचनेत मी स्वतःला अडकवून घेतल असतानाच एक उत्पात झाला, ज्यामुळे आमचे आधीच कठिण असलेले जीवन अजून कठिण झाले. मोठ्या शिक्षेचे तीन कैदी एका रात्री जनरल वॉर्डचे गज कापून काढून पहरेकऱ्यांच्या नाकावर टिच्चून पळून गेले. संध्याकाळी वॉर्ड बंद झाल्यावर आणि रात्री नऊ वाजता ड्यूटी बदलण्याच्या आधी रहस्यपूर्ण रीत्या हे पलायन कांड झाल.

    त्या सुमारास जेल मधले जवळ जवळ सगळेच कैदी चट्टी आणि घोंगड अंथरून जेलचे सगळे नियम धाब्यावर बसवून नशाखोरी करत होते. जेलचे नियम- कानून कितीही कडक असोत, पण शेवटी या सेंट्रल जेलमधे मोठी शिक्षा किंवा आजन्म करावास भोगणारे किंवा बी श्रेणीचे कैदीच जास्त असत. एक बाई सोडली तर दारू पासून तर हर तऱ्हेचे मादक द्रव्य या कैद्यांना उपलब्ध होते. कैदी आणि शिपाई एकत्र बसून जुगार खेळत.

    पगली घंटी वाजल्याबरोबर जेलच्या आत आणि बाहेर, ड्यूटीवर किंवा ड्यूटी संपवलेले जेवढे म्हणून वॉर्डर आणि जमादार होते ते सर्व लाठ्या, मशाली आणि टॉर्च घेऊन आले आणि त्यांनी जेल दणाणून सोडली. रात्रभर वारंवार कैद्यांची संख्या मोजत होते, तरी तीन कैदी कमीच भरत होते. पळणारे कैदी खूप आधीच पसार झाले होते. त्यातला एक होता ईश्वर दयाल- हा बिहारच्या एका क्रांतिकारी संघटनेचा सदस्य होता पण त्याला साधारण श्रेणीतच ठेवण्याची चूक बहुतेक जेलरने केली होती.

    ती रात्र जागरणातच गेली. दुसऱ्या दिवसापासून कैद्यांवर पहारा जास्त कडक झाला. जुने मेट आणि पहारेकरी पण शंकेच्या भोवऱ्यात सापडले. आधी वरच्या खुल्या आकाशाकडे तरी पाहू द्यायचे. आता त्याच्यावरही टाच आणायचे प्रयत्न होऊ लागले.

    अशा विषम काळातच भागलपुर जेलमधून काढून बसावन सिंह यांना गया जेलमधे आणल. संध्याकाळ होत होती. सेलची दार उघडली होती आणी मी माझ्या थाळी-वाट्या  रेती-भरल्या मातीने रगडून रगडून स्वच्छ करीत बसलो होतो.  तोच बेड्यांचा झणत्कार ऐकून वर पाहिल- तर एक विशालकाय पुरुष बेड्या साखळ्या पांघरून आमच्या सात नंबर वार्डात प्रविष्ट होत होता। सहा फूट उंच शरीर! हृदयातली सगळी आग डोळ्यांत उतरलेली. बिहारचे सुप्रसिध्द क्रांतिकारी आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख योगेंद्र शुक्ल यांचे घनिष्ठ सहकारी - बसावन सिंह!

    आम्हीं एकमेकांना परोक्ष रूपाने ओळखत होतो. एका षडयंत्राच्या केस मधे त्यांना दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. त्या काळांत सन १९३० मधे ते  पटण्याजवळील बांकीपुर जेलची भिंत ओलांडून पळाले होते. पुनः पकडले गेले तेंव्हा त्यांची शिक्षा दोन वर्ष वाढवण्यांत आली, आणि भागलपुर जेलमधे ठेवल.

    असा कैदी जेल मधे आल्यावर तो किंवा जेलचे अधिकारी स्वस्थ कसे बसणार? कांहीतरी झाल आणि त्यांनी उपोषण केल. दहा दिवस झाले. अत्याचार वाढत गेले तसे इतर कैद्यांनीही उपोषणाचा मार्ग धरला. (त्या काळांत बसावन सिंह यांनी सत्तावन दिवसांच उपोषण केल होतं- बसावन सिंह १९९० च्या  सुमारास वारले - अनुवादक) त्यामुळे चिडून सरकारने त्यांना गया जेल मधे पाठवल. पण माझ्या शेजारील सेल मधे ते फक्त एक दिवस राहिले. नंतर त्यांना जेलच्याच दवाखान्यांत हलवल! माझ हृदय शोकाकुल झाल. अमानुष वागणुकीच्या विरुध्द प्राणोत्सर्ग करण्याचा संकल्प ज्याने घेतला आहे त्याचा संग्राम आणि त्याच मरण आपल्याला निरपेक्ष, मौन राहून बघाव लागणार हे शल्य मनाला टोचू लागला.

    या आधी तीन घोंगड्यांच्या जमापूंजीच्या आधारेच जेल अधिकाऱ्यांशी भांडणं विकत घेत दिवसामागून दिवस पार पडत होते. पण बसावन सिंह आल्याने परिस्थिती आमूलाग्र बदलली. दिवसभर एकट्याने बसून तऱ्हेतऱ्हेचे विचार मनांत येऊ लागले. कुंठा, निराशा, आक्रोश!

    रोज बातम्या येत होत्या- बसाबनचे उपोषण चालू होते. त्याला जबर्दस्तीने अन्न भरवण्याचे प्रयत्न विफल होत होते. एक एक दिवस सरकत होता. मृत्यूवर विजयाचा एक-एक दिवस! जेल मधे उत्तेजना वाढत होती. लोक व्यग्र होऊ लागले. असं वाटू लागल की मृत्यूला आलींगन करू पहाणारी एक अदम्य इच्छाशक्ति या जेलच्या वातावरणांत भरून गेली आहे आणि जेलची सर्व सत्ता तिच्यापुढे तुच्छ आणि हेय आहे. जेलचे गर्वोन्नत मस्तक रोज जास्त जास्त झुकत चालल आहे.

    मी ठरवल- आपणही उपोषण करायच. याला सहानुभूतिदर्शक उपोषण म्हणता आल असत. हेड जमादाराने येऊन विचारल- तुम्हाला कांय त्रास आहे? मी म्हटल- मलाच नाही सगळ्यांनाच त्रास आहे.

    माझ्या उपोषणाला सुरुवात झाल्याच्या तीन दिवसांतच मला सात नंबर मधून काढून पुनः पंधरा नंबर वॉर्ड मधे आणल. यावेळी हजारीलाल तिथे नव्हता. कळल की त्याची कैदेतून सुटका झाली होती. तिथे आता चार पोलिटिकल कैदी होते. भागलपुरचे रासबिहारी लाल आणि मुजफ्फरपुरचे नरनारायण बाबू सविनय कायदेभंग चळवळीत शिक्षा होऊन आले होते तर त्रिभुवन आणि पाण्डेयजी हे दोन ब्राह्मण छपरा षडयंत्र केसमधले आरोपी होते.
    
मला दहा नंबरच्या सेल मधे ठेवल. खाण्यापिण्याचा प्रश्नच नव्हता. पहारेकरी रोज माझ्या थाळीत डाळ-भात-पोळ्या ठेऊन जायचा. सफाईवाला आल्यावर ते अन्न उचलून घेऊन जायचा.

    पण या वॉर्डात एक बरं होत. आम्ही सेलच्या बाहेर मोकळ्या अंगणात येऊन बसू शकत होतो. एकमेकांशी गप्पा करत होतो. एक दिवस दुपारी पहारेकरी बातमी घेऊन आला- आज बसावनची आई त्याला भेटायला येणार आहे. पंधरा नंबर वॉर्डाशेजारूनच जेल दवाखान्याचा रस्ता जात होता. आम्ही सगळेच वॉर्डाच्या फाटकापाशी येऊन थांबलो. थोड्या वेळाने पाहिल- एक शोकमग्ना वृध्दा आणि जेलचे अधिकारी, जमादार हळू हळू जेलच्या फाटकाकडे जात होते. आई आपल्या उपोषण-व्रती मुलाला भेटून परत निघाली होती. बरोबर एक अत्यंत सुंदर किशोर! आम्हाला पाहून त्याने नमस्कार केला. बोलण्याची सोय नाही. शेजारी उभे असलेले रासबिहारी म्हणाले- मुलाला ओळखलं का दादा?  दोन वर्षांपूर्वी पाहिलेला सुंदर हसमुख चेहरा माझ्या नजरेसमोर नाचू लागला. मी म्हटल- "हो, ओळखल. पटना कॅम्प जेल मधे हा होता. आत्ता बसावनच्या आईला घेऊन आला आहे!”
    दोघांच्या तोंडून अभिवितपणे नाव निघालं-  “बैकुंठ सुकुल!”
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१९३४ --      
माणसाच्या जीवनांत दिनांक महिने आणि इस्वीसनांच महत्व कितीसे असणार? जेंव्हा आकाशाच्या एखाद्या चतकोर तुकड्यावरच आयुष्याची तहान भागवायची असते तेंव्हा दिवस, महिने, वर्ष यांचा हिशोब अप्रासंगिक आहे! बसावनच्या आई बरोबर पाहिलेला  “आजाद”  वैकुंठ शुक्ल दोन वर्षानंतर  पुनः गया जेलमधे आला तो कैदी म्हणूनच! बेतिया मधे फणींद्र घोषची हत्या केल्याचा आरोपाखाली त्याला फांशीची शिक्षा आणि त्याचा सहकारी चंद्रमा सिंहला दहा वर्षांची कैद ठोठावली होती (अपीलात चंद्रमा सिंहची शिक्षा रद्द झाली). फाशीच्या तारखेची वाट बघत त्याला साखळदंडाने बांधून गया जेलच्या सात नंबर वॉर्ड मधे ठेवण्यांत आल. बसावनच्या आईला गया जेलमधे घेऊन येतांना देखील वैकुंठवर फणींद्र घोषच्या हत्येसाठी पकड वॉरंट होतच. पण अतीव साहसाने त्याने ही भेट घडवून आणली होती.

    आता एवढ्या वर्षांनंतर इतिहासाच्या बंद पुस्तकाचे एखादे पान उलगडून जगाला दाखवायला कांहीच हरकत नाही. लाहोर षडयंत्र केस मधे भगत सिंग, राजगुरु, सुखदेव यांना फाशी झाली आणि लाहोर जेल मधेच उपोषण करीत यतीन दासला ऐतिहासिक वीरमरण आल. क्रांतिकारी भाषेत ज्याला “इनर मॅन” म्हणत तसा फणी घोष हा रिपब्लिकन पक्षाचा “इनर मॅन”  होता. लाहोर षडयंत्र केस मधील अभियुक्तांच्या संदर्भात बोलायच झाल तर लाला लाजपतरायांचा हत्यारा सॅण्डर्स वर गोळ्या झाडण्यापासून दिल्ली असेंबली मधे बॉम्ब फेकण्यापर्यंत आणि ब्रिटिश सरकार विरुध्द युध्दाचा कट करण्यापर्यंत आरोप त्याच्यावर होते. इतरांप्रमाणेच तोही सक्रिय क्रांतिकारी होता आणि कित्येक लहान मोठ्या ऍक्शन्स मधे त्याचा सहभाग होता. त्याला देखील कठोर शिक्षा होणार हे अटळ होत. पण त्याने आपल्यावरील आरोप मान्य केले एवढेच नाही तर माफीचा साक्षीदार होऊन सर्वनाश घडवून आणाला. आतापर्यंत पकडले न गेलेले जे कित्येक क्रांतिकारी होते, त्यांनी गद्दारांच्या यादीत फणी घोषच नांव पहिल्या क्रमांकावर टाकल आणि नांवापुढे फुली मारली.

     त्या काळातील बिहार मधे गाजलेले पुढारी क्रांतिकारी म्हणजे रामविनोद सिंह. हे विप्लवी दलाचे नेता होते. सन् १९२९ मधे गांधीजींनी असहयोग आन्दोलन पुकारल तेंव्हा पासून त्यांनी खादी वापरायला सुरुवात केली. त्यांच्या नंतर विप्लवी दलाचे प्रबळ नेता म्हणून योगेन्द्र शुक्ल समोर आले. हे मुजफ्फरपुर जिल्ह्याचे होते आणि रिपब्लिकन पार्टीचे आधारस्तंभ मानले जात. त्यांचे धनिष्ठ मित्र बसावन सिंह आणि वैकुंठ शुक्ल पण त्यांच्याच गांवाचे होते. अशा प्रकारे मुजफ्फरपुर जिल्ह्याने बिहारच्या स्वातंत्र्यलढयाला कित्येक क्रांतिकारी पुरवले आहेत. जणू कांही खुदीरामला इथल्या जेलमधे फांशी झाल्यामुळे त्याच्या रक्तसिंचनाने जमीन उर्वरा झाली आणि क्रांतिकारी सैनिक निपजू लागली. वैकुंठचा मित्र चंद्रमा सिंह आरा जिल्ह्याचा होता. त्याचे वडील- त्यांना आम्ही रामदत्त भाई म्हणत असू- आधी पोलिस इन्स्पेक्टर होते. पण १९२९ मधे त्यांनी देखील नोकरी सोडली. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्या मधे सामील झाल्याने त्यांचं उरलेल आयुष्य जेलमधे एका लंगोटीवर दंड-बैठका काढण्यांतच गेल. आम्हा सगळ्यांपेक्षा ज्येष्ठ, विधुर, उदारमना रामदत्तना जेल मधील कर्मचारी भिऊन असत. त्यामुळे आम्हांला ते वटवृक्षाप्रमाणे सांवली आणि आधार देत.

    त्यांचाच मुलगा चंद्रमा सिंह - मातृविहीन. इकडे वडील चरख्यावर सूत काढीत, तिकडे मुलगा गोळ्या झाडण्याची प्रॅक्टीस करीत असे.  कैदेत रामदत्त म्हणत- पहा, मी गांधींच काम करतोय आणी माझा मुलगा क्रांतीच. कस कां होईना - देशाला स्वतंत्र करायच आहे. त्याच्या क्रांतिवादी विचारसरणीच मला दुःख नाही, फक्त----! मग हसून म्हणत, तो फांशीवर चढेल आणि आमचा वंशही खुंटेल. म्हणजे त्यांना चंद्रमाच्या फाशीची काळजी नव्हती- निर्वंश होईल याच वाईट वाटत होत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    बेतिया मधे फणींद्र घोष राहायला लागला त्याला बराच काळ लोटला. लोक विसरले होते कि भगतसिंगला फाशी झाली होती किंवा यतीन दास उपोषणात मरण पावले होते. त्यांच्यासाठी कोण रडत होत? ज्या फणींद्रच्या साक्षीमुळे हे घडल तो सरकारी छत्रछायेत इथेच रहात आहे, याचही बेतियाच्या लोकांना कांही वाटेनास झाल. सरकारने त्याला पुरवलेली सुरक्षा पण कमी केली. छोटे-मोठे सगळेच पुढारी कैदेत होते. फणी देखील बराचसा निश्चिंत झाला असावा.

    पण एक दिवस अमृतसरच्या क्रांतिकाऱ्यांकडून पत्र आल - बिहारच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीच्या कार्यालयात- "हा कलंक तुम्हीं बाळगणार की धुवून काढणार- “इस कलंक को ढोओगे कि धोओगे?”   या पत्राच्या रूपाने फणींद्रचा काळ जवळ आला होता.

    एके दिवशी दुपारी दिवानिद्रा संपवून मित्राच्या दुकानावर बसलेला असतांना फणीला कुणीतरी हाक मारली- दादा, आहात कां? बिहार आणि उत्तर प्रदेश मधे बंगाली कार्यकर्त्यांना दादा म्हणायची पद्धत होती. फणी निश्चिंत होता. त्याला वाटल एखादा दोस्त असेल. त्याला ओरडायचा कसला- श्वास घ्यायचा वेळही मिळाला नाही. दोन जणांनी भुजालीने त्याच्या डोक्यांत वार केले, आणि निर्विकारभावाने बाजारातून पसार झाले. एकही माणूस त्यांना पकडायला धावला नाही.

    मग पोलिसांची धावपळ सुरु झाली. सुराग मिळत नव्हता. बेतियाच्या कुणाही माणसाकडून पोलिसांना माहिती मिळत नव्हती. पण वैकुंठ आणि चंद्रमाच्या मित्रांकडूनच सुराग मिळाले. दोघेही एवढे नगण्य होते की पोलिसांकडे त्यांच्या फोटो किंवा वर्णन, कांहीच नव्हते. पोलिस आणि त्यातल्या त्यांत गुप्तहेर खात्याची झोप उडाली. कुणीही सुदर्शन आणि मजबूत अंगकाठीचा युवक दिसला कि पोलिस त्यांना पकडत. शेवटी एकदाचे दोघेही सापडले. कसे?

    बिहार मधील सोनपुर मेला प्रसिध्द आहे. तिथेच दोघे गुप्तपणाने रहात होते. एका सायंकाळी अंधारलेलं असतांना सोनपुर पुलावरुन वैकुंठ जात असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडल. इतक्या वेगाने हालचाली झाल्या की वैकुंठला नदीत उडी टाकायचा अवकाश देखील मिळाला नाही. दोस्त मंडळींनी नेमकी जागा आणि वेळ पोलिसांना अचूक सांगितली होती.

    पुढे मागे कधी बंगाल आणि भारतवर्षाच्या स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास विस्ताराने लिहिला गेला (मला तरी याची शक्यता शून्य दिसते) तर एक बाब स्पष्टपणे दिसून येईल. एका बाजूला आपल्याला दिसेल अतूट देशप्रेम, कल्पनातीत साहस आणि पराक्रम तर दुसरीकडे दिसेल घोर विश्वासघात आणि कुटिल व्यवहार! कबूल की कांही मंडळी घोर यातना, दुःख, अमानवीय शारिरिक आणि मानसिक ळ या सगळ्यांना घाबरून मोडून जातात.  पण आपल्या देशाइतकी कारण-अकारण सहजगत्या विश्वासघात करण्याची वृत्ति इतरत्र क्वचितच मिळेल.

पृथ्वीराजाच्या आधीचा काळ सोडून देऊ या. पण अगदी त्याच्यापासून सुरुवात केली किंवा अगदी स्वातंत्र्ययुद्धाचच बघितल तर कन्हाईलालची फाशी, सूर्यलालची फांशी- अशा कित्येक घटना सांगता येतील जिथे आपल्या राष्ट्रीय चरित्राचा हा विश्वासघातकी, घृणास्पद भाग उघडा पडतो. आजही ही मोठी विरोधाभास आणि दुःखाची गोष्ट आहे की असे विश्वासघातकी किंवा स्वार्थी पुढारीच सत्तेच्या शीर्षस्थ आसनांवर बसलेले आहेत. असो.

     तर वॉर्ड नंबर पंधरा. सेल नंबर दहा. इथे मी होतो. तिकडे सात नंबर वॉर्डमधे फाशीचे कैदी ठेवले जात. मात्र त्यांना फांशी देण्याच्या आदल्या रात्री पंधरा नंबर वॉर्डाच्या सेल नंबर एक मधे आणून ठेवीत. एक नंबर आणि दहा नंबर मधे अंतर असेल सुमारे तीनशे फूट. या वॉर्डात दाखल होण्यासाठी दगडी भिंतीत जे लाकडी दार केलेल होत, ते दहा नंबरच्या समोरच होत त्यामुळे कोण आल, कोण गेल ते सगळ्यांत आधी मलाच कळत असे.

    गया जेल मधे असतांना माझ्या समोर एकूण पंचेचाळीस व्यक्तिंना फासावर चढवण्यांत आल. अशा कैद्याला संध्याकाळी सेल नंबर एक मधे आणून सोडल की आम्ही त्याच्याशी गप्पा गोष्टी करीत असू. मला ज्योतिष आणि हस्तसामुद्रिकाची थोडी आवड होती. मी त्यांच्या हातावरील रेषा बघत असे. एक गोष्ट मला जाणवायची. बहुतेक कैद्यांना विश्वास वाटत नसे की दुसऱ्या पहाटे त्यांचे आयुष्य खरच संपून जाणार आहे. त्यांना वाटायच की कांही तरी चमत्कार घडेल आणि त्यांचे प्राण वाचतील. फासावर जाणाऱ्या या लोकांचा अपराध वृत्तांत पण विचित्र असायचा. त्यांच्या अपराध आणि हत्येचे वेगवेगळे पैलू स्तब्ध करणारे होते. शेवटच्या रात्री सगळ्यांची वागणूक वेगवेगळी व्हायची. कुणी रात्रभर रामनामाचा जप करीत असे तर कुणी तार स्वरात रडत असे. सकाळी पाच वाजता सुपरिंटेण्डंट सदलबल त्यांना घेऊन जायला येत तेंव्हा हृदय विदारक दृश्य उत्पन्न व्हायच. साहेब, मला सोडून द्या, मी निर्दोष आहे! सोडा मला साहेब, तुमच्या पाया पडतो- अशा सारखा आर्तनाद म्हणजे सामान्य घटनाच होती. कोणाकोणाला फरफटत न्याव लागत असे. सेलच्या आतून ते दिसत नसल तरी मनश्चक्षूंपुढे सगळ दृश्य सामोरं होत असे. सुरवातीला अस झाल की कित्येक दिवस मन उद्विग्न होत असे. रात्री झोप येत नसे. पण आश्चर्य म्हणजे पुढे याचं कांही वाटेनास झाल. आता आम्ही चलबिचल किंवा उद्विग्न  होत नव्हतो. तिकडे फाशीचा कैदी रात्रभर मोठ्याने गळा काढून रडायचा तरी इकडे आम्हांला शांत झोप लागायची. कदाचित हे देखील संपूर्णरीत्या अनैसर्गिक नव्हत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
    बातमी आली कि वैकुठच्या फाशीचा दिवस मुक्रर झालेला आहे. थंडीचे दिवस होते- तेही गयेची थंडी- हाडांपर्यंत शिरून त्यांना गोठवून टाकणारी! पंधरा नंबर वॉर्डात आम्ही चौघ होतो- मी, बसावन सिंह, रघुनाथ पांडेय आणि त्रिभुवन आजाद! एक दिवस जेल अधिकारी अचानक आले आणि बसावन सिंहना घेऊन गेले. त्यांना हजारिबाग जेल मधे पाठवून दिल. सतर्कता म्हणून ही व्यवस्था करण्यांत आली होती. एव्हाना जुन्या पारशी सुपरिंटेण्डंट ची बदली झाली होती आणि पुनः एकदा परेरा- तोच तो पटना कॅम्प जेलचा सुपरिंटेण्डंट आता इथे आलेला होता.

    दिवस पटकन् निघून गेले. शेवटी तो ही दिवस उजाडला. वैकुंठ शुक्ल बरोबर एक संध्याकाळ का होईना, भेट होण्याची आम्ही सर्वच वाट पाहात होतो. पण हेड जमादार आज आधीच आला. म्हणाला- आज तुम्हाला लौकर बंद व्हावे लागेल. ह्या नंतरच शुक्लांना आत आणण्यांत येईल.

    शेवटच दर्शन तरी करू द्या अशी विनंति करायची सुध्दा किळस वाटली. कांय मिळणार आहे त्याला पहाण्यासाठी या जल्लांदांची मनधरणी करून? आम्ही आपापल्या सेल मधे निघून गेलो.

    त्या दिवशी फक्त आम्हालाच लौकर बंद केल अस नाही. जेल मधल्या सगळ्या कैद्यांना बंद करून मगच वैकुंठला पंधरा नंबर वॉर्डात आणल.

    अजून संध्याकाळ झालेली नव्हती. आज ती हळू हळू येणार होती. थोडासा उजेड होता. मी कुरता आणि एक घोंगडी पांघरून सेलच्या गजांना धरून उभा होतो.

    बेड्या आणि साखळदंड झंकारले! त्यांच्या नादाहून ऊंच स्वरांत हांक आली- दादा, येऊन पोचलो मी.  आजूबाजूच्या तीनही सेलमधून आम्ही तिघ म्हणालो-  वंदे, मातरम्!

     भारीभरकम बुटांचा खाडखाड आवाज येत होता. जेलर, डिप्टी जेलर, हेड जमादार, इतर जमादार, वॉर्डर, असे कित्येक लोक उगीचच आपली सतर्कता दाखवत फिरत होते. मी गप्प उभा होतो. समोर म्लान आकाशाचा एक छोटा तुकडाच दिसत होता आणि मी निरुद्देश त्याच्या कडेच बघत होतो. हृदयांत खूप रितं-रितं जाणवत होत. सारख्या कवितेच्या ओळी आठवत होत्या-- जबे विवाहे चलिला विलोचन, ओ गो मरण, हे मोर मरण, ताँर कोतो मोतो छिलो आयोजन, छिलो कोतो शत उपकरण!

    एक नंबर सेल मधे आणतांना फाशीच्या कैद्याची बेडी आणि साखळदंड कापून टाकत. पण वैकुंठ शुक्लाची नाही कापली. ते कुठलाही गाफिलपणा राहू देऊ शकत नव्हते. हळू हळू त्यांच्या बुटांचे आवाज दूर गेले. रात्रीचा अंधार दाटून आला. आता आकाशाच्या तुकड्यांत कांही चांदण्या लुकलुकत होत्या. वैकुंठ शुक्ल त्याच्या वॉर्डर आणि पहरेकऱ्याशी बोलत होता. ते आवाज मधूनच कानावर येत. अंतर तरी अस कितीस होत? एका नंबर पासून दहा नंबराच असेल एवढच. मागे एकदा सगळ्या दाही सेल्स मधे आम्ही सगळे स्वराजी होतो तेंव्हा जोरजोरात एकमेकांशी बोलत असू- एकत्र गात असू!

    टन् टन्... घंटी वाजली. म्हणजे संध्याकळची मोजणी पूर्ण झाली- आलबेल! आता वॉर्डर्सची ड्यूटी बदलेल. सध्याकाळच्या ड्यूटीचा वेळ फक्त तीन तासांचा होता- सहा ते नऊ. त्या वेळात वॉर्डरांप्रमाणे हवालदार देखील
राऊंड घ्यायचा.

    मी गजांना धरून उभा होतो. कांहीही करायच मनात येत नव्हत. शेजारच्या सेल मधे रघुनाथ आणि त्याच्या पलीकडच्या सेलमधे त्रिभुवन! सगळे गप्प होते. नीरवता भयाण होत चालली.

    बुटांचा आवाज ऐकून मान वर केली. बदली वॉर्डर हातात कंदील घेऊन समोरच्या अंगणात आलेला होता. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने विचारल- बाबूजी, बरं आहे ना? पण मी त्याला उत्तर दिल नाही. एरवी नेहमी तो उभ्या उभ्याच कांही गप्पा करायचा. कारण या वॉर्डात माझीच कुलूप तपासणी सगळ्यांत शेवटी असायची. पण आज माझा मूड नाहीसा बघून त्याने कुलूप ओढून खात्री केली आणि गुपचुप निघून गेला.

    आमच्या सेलच्या समोरच्या त्या अंगणाने आणि पलीकडील भिंतीने आम्हाला बाकी जगापासून तोडून ठेवलेलं होत. इथे जो माणूस रहायला यायचा त्याचा एकटेपणाच सर्वात भयावह असायचा. म्हणूनच साधारण कैदी या सॉलिटरी सेल्सना घाबरायचे.

    या नीरव एकान्तात आम्हीं दिवस आणि महिनेच नाही तर वर्षामागून वर्ष घालवली तरीही वेडे झालो नाही- ती एक वेगळी कहाणी आहे. एरवी या एकाकीपणाला आम्हीं सरावलो होतो. पण आज एकाकीपणासोबत आमची असहाय्य अवस्था आम्हाला व्याकुळ करत होती. आम्हीं इतर कैद्यांबरोबर असतो तर कदाचित या मानसिक यातना आणि क्षोभ थोडे कमी झाले असते. पण या नीरव एकाकीपणात ही असहाय्य अवस्था फारच वाईट होती. दुःख आणि ग्लानीमुळे आम्हाला स्वतःची शुद्ध उरली नव्हती. विचार मनांत यायला नकार देत होते. उभ्या उभ्या समोर किंवा आजूबाजूला दृष्टि फिरवली की ती दगडांवर आपटून परत फिरे. म्हणूनच मी आकाशाच्या त्या निर्बंध, स्वच्छ, मुक्त तुकड्याकडे पहात होतो.

    वॉर्डाच्या दगडी भिंतीतल दार वाजल. ते उघडून हवालदार आत येत होता. एकाच जेलमधे, तेही एकाच सेल मधे बराच काळ कैदी राहिला तर सगळ्या हवालदार, जमादारांशी त्याची दोस्ती होते. जो कुणी ड्यूटीवर येई तो मला एकट पाहून चार गोष्टी करण्यासाठी थांबायचा. कधी कधी त्यांच्या घरातील सुख-दुःखाच्या गप्पा तर कधी कांही समस्या वाटली तर तिची चर्चा. दुपारचा ड्यूटी वार्डर तर आल्या आल्या बाबूजी, जरा लक्ष असू द्या म्हणत डोक्याचा मुंडासा सोडून तिथे गार दगडावरच झोपी जायचा।

    हवालदार सायंकाळच्या ड्यूटी नंतर राऊंड वर आला की दहा पंधरा मिनिट गप्पा करायचा. हे ही जणू त्याच्या कामांत सामिल होत. प्रौढ वयाचा, गोरापान, मेंदी लावल्याने बदामी रंगातली  नीट विंचरलेली दाढी, मिशा. हा होता उत्तर प्रदेशचा एक मुस्लिम पठाण! त्याच्या वागणुकीवरुन आणि भाषेवरून त्याची अस्सल खानदानी अदब दिसून यायची.

    कंदील खाली ठेऊन तो माझ्या सेलच्या गजांना टेकून बसला. मग उजव्या हाताच्या मुठीतली फुल माझ्यासमोर धरीत म्हणाल- शुक्लाजींनी पाठवली आहेत. ती फुलं घेऊन मी माझ्या लोखंडी थाळीत ठेऊन दिली.

    त्याने दिव्याची वात जरा मंद केली आणि हलक्या  आवाजात म्हणाला- बाबूजी, कांय विचार आहे? मी त्याचा चेहरा पाहिला. मनात आक्रोश दडला होता. म्हटल- कांय विचार असणार?

    आता त्याच्या स्वरांत आर्जव होत. म्हणाला, बाबूजी, इथल्या लाटसाहेबांच्याही वर इंग्लंड मधे राजा आहे, त्याच्या दरबारात अपील करून शुक्लाजींना वाचवता येणार नाही कां?

    मी अवाक् होऊन त्या पठाण पहारेकऱ्याकडे बघतच राहिलो- हा कांय बोलतोय?
    त्याच बोलण चालूच होत. बाबूजी, मी मोठे मोठे बहादुर सुरमा बघितलेत, पण असा हिम्मतवाला नाही पाहिला. मागच्या महायुध्दात मी जॉर्डन आणि मेसोपोटॅमिया मधे लढलो आहे! कित्येकांना मारल, कित्येकांना भरतांना पाहिल मारतांना पाहिल. पण याचा सारखा बहाद्दर हाच.

    तो थोडा थांबला. मला कळल- याला बोलायच आहे. तो जे बोलत होता ते तो घरी, दारी, मित्रमंडळी- कुणाकडेही बोलू शकत नव्हता. असल्या गोष्टी बोलण तर सोडाच, नुसता विचार करण्यानेही तो मोठा अपराध करत होता. फक्त माझ्याजवळच तो मोकळ्या मनाने त्याची कल्पना, त्याची व्यथा, सगळ कांही बोलू शकला असता।

    जरा वेळाने तोच म्हणाला- "जेंव्हापासून त्यांना फांशीची सजा सुनवली तेंव्हापासून त्यांचा गोरापान रंग गुलाबी होत चालला आहे."  आता तो ऊर्दुचा आश्रय घेत होता- एखाद लाल- गुलाबी फूल उमलाव तस त्यांच शरीर सुर्ख होत चाललय्. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आश्चर्य वाटत. एवढा हसमुख आणि प्रसन्न चेहरा? अलीकडे तर त्यांच हास्य जास्तच मुखर झालेल आहे. म्हणून म्हणतो- एवढा हिंमतबहाद्दर दुसरा कोणी नसेल. प्रसन्नता आणि मंदस्मित जणू कांही त्यांच्या हृदयातून प्रस्फुटित होऊन बाहेर पडतेय. एवढ लहान वय, आणि ही हिंमत!

    त्याचा आवाज कापरा झाला म्हणून मी दिव्याच्या उजेडात निरखून बघितल तो त्याच्या डोळ्यातून आश्रुधारा वहात होत्या. त्या कठोर, कर्तव्यदक्ष चेहऱ्यामागे  जे हृदय लपल होत- ते अस वेदना-व्याकुळ होऊन वहात होत. म्हणाला- बाबूजी, कोणताच उपाय, कोणताच कायदा नाही कां? आज तर मला स्वतःचा जीव देऊन शुक्लाजींचा जीव वाचवता आला तरी मी समजेन अल्लाच मोठ काम केल.

      मी मनात विचार करत होतो- हा काय भावुक होऊन हे सगळ बोलतोय? माझ्या डोक्यांत एक योजना रुजत
होती. तिची निष्फळता एकीकडे जाणवत होती तर दुसरीकडे एक वेडी आशा पण होती- की हे होऊ शकेल. माणसाची आशा ही अशी चीज आहे कि साक्षात् मृत्यू समोर असतांनाही माणूस अमृत शोधून आणू शकतो. मला आशेचा एक किरण दिसत होता- आपल्याकडे शक्ति आहे, बुद्धि आहे, पुढे कांय होईल त्याची चिंता नाहीये. मग एकदा प्रयत्न तरी करावा.

    दृढ, निश्चयी आवाजात मी म्हटल- शुक्लांना वाचवायचा उपाय आहे.

आता अवाक्  होण्याची पाळी त्याची होती. आधीच बंगाली माणसाच्या विशेष बुद्धिबाबत, त्यांतून त्यांच्या मंत्र-तंत्र शक्तिबाबत इतरांना धाक वाटत असतो. त्यातून जर तो बंगाली बॉम्बच्या केस मधे शिक्षा होऊन आला असेल तर कांय विचाराव! तरी पण त्याच्या डोळ्यांत थोडी फार शंका उमटलीच- त्याने विचारल “कस?”
    मी म्हटल- तू मनावर घेतलस तर हे होऊ शकत!
    कस?

    मी इतर प्रस्तावनेत न शिरता सरळ उपाय सांगितला- तू मला सेलच्या बाहेर काढ आणि शुक्लाला देखील. माझ्या खांद्यावर बसून तो या भिंतीच्या पलीकडे पोचू शकेल. तिथे गेल्यावर मधला मोठा रस्ता तो कसाही ओलांडेल तेवढी हुशारी त्याच्याकडे आहे- कि पुढे ती छोटी टेकडी आणि त्यावरील घनदाट जंगल, शुक्ला तिथे पळाला की सुटला समज.

    हवालदाराची घोर निराशा झाली. असेल माझ्या बुद्धिवर विश्वास, पण इतका वेडा सल्ला मी देईन अस त्याला वाटल नव्हत. त्याने देखील इतर प्रस्तावना न करता सरळ सांगितले- "हे अशक्य आहे!"  मग मला बाहेरच्या परिस्थितीची जाणीव नाही हे उमजून त्याने पुढे म्हटल- "ज्या दिवशी शुक्लांना गया जेल मधे आणल आहे त्या दिवसापासून जेलच्या बाहेर चारी बाजूंनी हत्यारबंद शिपायांचा कडक पहारा असतो - रात्री तो अजून कडक असतो. आज तर दर दहा फुटावर एक एक संतरी आहे. या पंधरा नंबर वॉर्डच्या चारी भोवती पहारा आहे. जेलच्या फाटकांवर पहारा आहे आणि शुक्लांच्या सेलच्या बाहेर एका स्पेशल वॉर्डरचा पहारा आहे. आज जेलच्या सर्व किल्ल्या सुपरिंटेण्डंटच्या अलमारीत बंद आहेत आणि शुक्लांच्या सेलच्या किल्लीची जबाबदारी वैयाक्तिक त्यांच्यावर आहे. आज सकाळपासून आय जी पोलिस आणि आय जी जेल हे दोघेही इथे ठाण मांडून बसले आहेत. उद्या सकाळी फाशीची कारवाई पूर्ण होईपर्यंत थांबणार आहेत. बाबूजी, मी मनात आणल तरी हे होणार नाहीये. शिवाय आज शुक्लांच्या हातापायांच्या बेड्या काढलेल्या नाहीत!

    हवालदाराच्या भारी बुटांचे आवाज कमी होत गेले तशी वैकुंठ ने हाक मारली- विभूती दा!”
    मी उत्तर दिल. बसलो होतो ते उठून उभा राहिलो. खिडकीच्या गजांचा आधार घेतला.

    निस्तब्ध रात्रीत बोललेल स्पष्ट ऐकू जात होत. फक्त आमचेच आवाज!

    वैकुंठने आपल्या दमदार, खोल आवाजात तोडक्या मोडक्या बंगालीत म्हटलं -"एकदा ते खुदीरामच फाशीवर जाण्याआधीच गाण म्हणा ना- तेच ते- हासि हासि परबो फासी (हसत हसत फासावर जाईन)"

     मी गाणी म्हणायचो. सगळी स्वातंत्र्य गीतं मी गात असे. मुजफ्फरपुर जेल मधे जिथे खुदीरामला फाशी दिल, त्या जेलमधे बसून मी गायल होत. आरा जेल मधे  “नही रखनी सरकार”  गात गात मी प्रवेश केला होता आणि तिथून बाहेर निघतांना इतर स्वराजी कैद्यांनी हेच गाण गाऊन मला निरोप दिला होता. तिथून बालेश्वर जेल मधे नेतांना रेलवे प्लॅटफॉर्म वर असलेल्या सर्वांनी माझ्या बरोबर हे गाण म्हटल होत आणि ट्रेन आल्यानंतर आग्रह धरला होता की गाण संपल्यावरच मला ट्रेन मधे चढवण्यांत येईल. बालेश्वर जेलच्या फाशीच्या चौथऱ्यावर आम्ही तिघांनी कलकत्त्याच्या वीरेन भद्र बरोबर बसून गायल आहे. काव्य विशारद कालीप्रसन्न, असहयोग आंदोलनाचे विक्रमपुरचे अध्यक्ष अविनाश दास, मुकुन्ददास, कवि नजरूल यांच्या स्वातंत्र्य गीतांच विशाल भंडार माझ्याकडे होत. शिवाय बिहार मधे राहिल्याने हिंदी आणि ऊर्दू गीतं देखील मी गात असे. त्या काळात कुठल्याही जेलमधे हेच गाणी जास्त लोकप्रिय होत-  हासि हासि परबो फासी। पटना कॅम्प जेल मधे वैकुंठने माझ्या तोंडून कितीदा हे गाण ऐकल असेल. त्यावेळी नामपाडाचा क्षेपा देखील माझ्याबरोबर गायचा. इतर बिहारी बांधव त्यांच्या लोखंडी थाळीवर ताल देत आणि गाऊन संपल्यावर वारंवार वन्स मोअर होत असे. ते सगळ झर्रकन आठवल.

    मी उभ्या उभ्या गाण सुरु केल. गजांना धरून आकाशाच्या साक्षीने. मी विभोर होऊन गात होतो कारण दुसरा खुदीराम आज पहिल्या खुदीरामच गाण ऐकायला मागत होता. हासी हासी परबो फासी, माँ, देखबे भारतवासी (सगळे भारतवासी पहातील)। गाण संपल्यावर वैकुंठ म्हणाला- दादा, एक बार और। मधून मधून त्याचाही कंठस्वर ऐकू यायचा. तो देखील माझ्या बरोबर गात होता.

    मग तो म्हणाला- दादा, आता एकदा बासरी वाजवा!  बासरी- म्हणजे काड्योपेटीची रिकामी पेटी आणि त्यावरचा पातळ कागद- हीच तर माझी बासरी, तीच मी तोंडाने वाजवत असे. हीच वाजवतांना एकदा जेलर पळत आला होता- कोण वाजवतय बासरी, कुठून आली? मी म्हटल होत - घ्या पहा, हीच आहे माझी बासरी! जेलर म्हणाला होता- ठीक आहे,  इतर गोलमाल करू नका. पंधरा नंबर वॉर्ड हा जेल कर्मचाऱ्यांची डोकेदुखी होता. रात्री जेऊन खाऊन आम्हीं नेटकेपणाने सेलमधे जाऊन बसायचे म्हणून त्यांचे नियम कानून चांगले पार पडत होते. मग माझी बासरी साधना सुरु व्हायची ती रात्री उशीरा पर्यंत चालायची.

      थोडा वेळ शुक्ल बासरी ऐकत होता. मग म्हणाला चाल ओळखीची वाटते. मी उत्तरलो- हो, ही बिस्मिल च्या सरफरोशी ची चाल आहे. शुक्ल उत्तेजित झाला. ओरडून विचारल -- तुम्हाला येत हे गाण? मी म्हटल- तेच गातो!

      काकोरी रेल्वे कांडातील प्रसिद्ध क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांनी फासावर जाण्यापूर्वी हे गीत रचल आणि गायल होत. शुद्ध ऊर्दू मधे असूनही सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांमधे लोकप्रिय होत. ते जितके मुग्ध होऊन “विदाय दे माँ, फिरे आसी”  (हे भारत माते, आता मला निरोप दे, मी पुनः इथेच येईन!) ऐकत तितक्याच आवेगाने हे ही गाण ऐकत. प्राणोत्सर्गाने भारलेल्या गीतांना भाषेची फारशी आडकाठी येत नसते, किंवा त्यांची व्याख्या करण्याची गरजही नसते. असे गीत कोणत्याही भाषेत असो, ते आपल्या हृदय-वीणेच्या तारांना झंकृत करणारच.

      बिस्मिलच ते अमर गाण! आज देशवासी बिस्मिल आणि वैकुंठला विसरलेत- तसे या गीतांना पण विसरलेत. मलाही आता सगळ आठवत नाही जेवढ आठवतय ते अस-

 सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
 देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है।
 रहबरे-राहे-मुहब्बत, रह न जाना राह में
 लज्जते- सेहराओ-गर्दी  दूरिए- मंजिल में है।
 वक्त आने पर बना देंगे तुझे ऐ आसमाँ
 हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है।
 आज  मकतल से वो कातिल कह रहा है बारबार
 क्या तमन्ना-ए-शहादत भी किसी के दिल में है।
 अब न अगले वलवले हैं और न अरमानों की भीड
 सिर्फ मर मिटने की हसरत अब दिले-बिस्मिल में हैं।

     समोरच्या आकाशातल्या चांदण्या लुप्त झाल्या होत्या, त्या जागी दिसत होता  उत्तर प्रदेशातल्या कुठल्याशा जेलमधे बंद असलेल्या बिस्मिलचा चेहरा आणि त्याच्या जोडीने एक नंबर मधे बंद असलेल्या वैकुंठचा चेहरा! माझ्या बरोबर तोही मनःपूर्वक गात होता- “दिले-सुकुल में हैं,  दिले-सुकुल में है।”

    माझी पूंजी ती कितीशी? पण जेवढी गाणी आणि सूर मला आठवत होते, सगळे मी अविराम गतिने एक एक करून गात होतो. कारण शुक्ल ऐकत होता. आजच्या रात्रीचा एक एक पळ मला सुरांनी भरून टाकायचा होता कारण दुसऱ्या पहाटे शुक्ल सुरांपलीकडे जाणार होता.

    बदली ड्यूटीचा वॉर्डर आज रोजच्या सारख फक्त कुलूप तपासून गेला नाही. “बाबूजी, तुम्हीं तर उभ्या उभ्याच रात्र काढीत आहा! तिकडे एक नंबर मधे शुक्ल देखील उभेच आहेत. त्रिभुवनजी, पाण्डेयजी पण! 
शुक्ल तर तुमचे साथी आहेत. पण गारद मधेही कोणी झोपलेला नाही. कदाचित कैदेतला कोणीही कैदी झोपलेला नाही. कसा झोपणार? तुमच्या गाण्यांचा आवाज गारदपर्यंत पोचतोय्. तुम्हीं कांय रात्रभर गात रहाणार?

     मी विचारले किती वाजले? तो म्हणाला एक वाजून गेला.
     तो जात असतांना बुटांचा खाडखाड आवाज येत नव्हता. आमची लय तुटू नये म्हणून तो अगदी सावकाश आवाज न होऊ देता निघून गेला.

    मी विचार करत होतो - आता कोणत गाण म्हणाव. तेवढ्यांत वैकुंठचा स्वर कानावर पडला- दादा, आता ते गीत म्हणा.
कोणता गीत?
तेच, रवींद्रनाथांच- मरण, हे मोर मरण!
पण ते तर गीत (चाल लावलेल) नाही. ती नुसती कविता आहे.
नाही, नाही, तेच म्हणा!
"मरण- मिलन" कविता मला तोंडपाठ होती. आजही आहे. पण प्रश्न हा होता कि तिला कोणत्या सुरात बांधायच आणि कस गायच?
       “दादा, म्हणा ना!”

आता प्रश्नच नव्हता. महाप्रस्थानाची वेळ जवळ येत होती. कुठून कसे कळल नाही- सुर आपोआप माझ्या कंठातून उतरले- जणू आत्ताच कुणी माझ्या गळ्यात भरून टाकले होते. मी दरबारी कानडा मधे गाण सुरू केल-
एतो चुपीचुपी केनो कथा कोओ,
ओ गो मरण, हे मोर मरण।

मला माहित नाही एखादा माणूस कसा हरवतो! त्या रात्री मी हरवलो होतो. ती रात्र नव्हती, सेल नव्हता, आकाश नव्हती. डोळे मिटले गेले होते आणि गळ्यातून गाण प्रस्फुटित होत होत-

अमि जाबो जेथा तब तोरि रोय,
ओ गो मरण, हे मोर मरण
जेथा अकूल होते हवा बोय
कोरि अंधारेर अनुसरण!

     त्या दिवशी जे मी गायल ते कधीही कुणी गायल नसेल. मला माहीत नाही ही कविता कधी कुणी गायली आहे की नाही. मी आधी कधी गाईली नव्हती आणि पुनः कधीही गाऊ शकणार नाही. दरबारी कानडाचा अंतरा निस्सीम गगनात झेपावत होता आणि त्याचे स्वर खाली येऊन मृत्युचे आलिंगन करण्यासाठी कटिबद्ध  झालेल्या वीर पुरुषाचा हृदय-स्पर्श करून पुनः परत जात होते. कुणी मृत्युशी अभिसार करण्यासाठी अशा प्रकारे हे गाणं ऐकल आहे? पण आज कुणीतरी मरणाला आलिंगन देत हे गाण ऐकत होत --
तुमि कोरे करिओना दृक्पात
आमि निजे लेबो तव शरण
यदि गौरवे मोरे लोये जाओ,
ओ गो  मरण, हे मोर मरण!

रवींद्रनाथांच्या कुठल्याही कवितेला, गीताला. अशी अपूर्व सार्थकता कुणी दिली असेल कां? पण त्या रात्री इतकं सार्थक दुसर कांही नव्हत. मृत्यूला गळाभेट देण्यासाठी आसुसलेल्या एका हृदयाने हे गाण ऐकायच ठरवल होत- गाणारा त्याच्यासाठी गात होता- नव्हे तो गीत होऊनच गात होता.

    चार कधी वाजले, कळल नाही! शुक्लानेच मला थांबवल- दादा, वेळ संपली. शेवटच वंदेमातरम् म्हणा!
    एक नंबर, आठ नंबर, नऊ नंबर आणि दहा नंबर! आम्ही एकत्र गात होतो- वंदेमातरम्। त्या दिवशी हे फक्त भारतमातेच गौरवगान नव्हत. थोड्या वेळाने जी महापूजा घडणार होती, तिच मंगलाचरण होत.

    जेलगेट ने पाच टोले दिले. शीतकालीत उषा अजूनही अंधकाराच्छन्न होती. एकदम कित्येक बुटांचे भारी आवाज पंधरा नंबरात प्रविष्ट झाले. वैकुंठ शुक्लने पुनः हाक मारली - दादा, आता निघायची वेळ आली. मला एकच सांगायचय. जेलमधून सुटाल तेंव्हा बिहार मधे जी बाल-विवाहाची पद्धत आहे ती बंद करण्याचा प्रयत्न करा. नक्की करा.

    [वैकुंठ शुक्ल विवाहित होते. त्यांचा बाल- विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी राधिका देवी अगदी थोडा काळ त्यांच्याबरोबर राहू शकल्या. नंतर घरातून पळून जाऊन असहयोग आंदोलनात उतरल्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्यानंतर शिक्षिकेची नोकरी केली आणि एकाकी आयुष्य कंठीले. सन् 2000 च्या आसपास विभूतिदांची स्मरणकथा हिंदीतून प्रसिद्ध झाल्यानंतर राँची  येथील प्रभातखबर दैनिकाने त्यांच्यावर मुलाखतपर लेख छापला होता. त्यानंतर लौकरच त्या वारल्या - अनुवादक]

    सगळीकडे निस्तब्धता पसरली. त्याच्या सेलच कुलूप उघडल्याचा आवाज आला- मग त्याच्या बेड्या काढल्याचा. मग त्याने सांगितल  “मी तयार आहे।” मग कानावर जोरदार आवाज येतात- त्याला सदल-बदल बाहेर नेण्याचे. फाशीच्या अभियुक्ताला घेऊन जातांना त्याचे दोन्हीं हात मागे नेऊन त्यात हातकड्या घातल्या जातात.

    वॉर्डातून बाहेर पडण्यापूर्वी शुक्ल म्हणाला- दादा, येतो मी- देश तर अजूनही स्वतंत्र झालेला नाही- वंदे मातरम्!
    आम्ही तिघ एकदमच म्हणालो- वंदे मातरम्.  पुनः एकदा निस्तब्धतेच साम्राज्य पसरल- मृत्युकालीन अभिसाराची निस्तब्धता! पण वैकुंठ शुक्लचा आवाज अजूनही कानावर येत होता- वंदेमातरम्-- भारतमाता की जय! मग अखेरचे शब्द आले भारतमाताकी---। संपूर्ण जेल मधे प्रतिध्वनी उमटली--- र---म्! आणि सगळ संपल!

     पुढे कांय झाल ते सांगितल्याखेरीज कहाणी संपत नाही! शुक्लच्या शेवटच्या घोषानंतर आमचे तिघांचे घोष मुखर झाले। त्याचा मृतदेह जेलच्या बाहेर नेल्याखेरीज सेलचे दार उघडणार नाही या निर्णयाविरुद्ध बंद सेलच्या गजांवर धडका देत आम्हीं नारे देत होते- वंदेमातरम्, भारतमात की जय, वैकुंठ शुक्ल की जय, भगत सिंग की जय, खुदीराम की जय-- फाशी गेलेल्या जेवढ्या क्रांतिकाऱ्यांची नाव आठवली त्यांच्या नांवाने आमचा जयजयकार चालू होता.

    अचानक पुनः बुटांचे भारी आवाज जवळ आले. जेलचा आय जी सगळ्या फौजेनिशी इकडेच येत होता- चुप रहा, गप्प व्हा! आधी आठ नंबर आणि शेवटी माझ्या दहा नंबर सेल मधे तो आला! रात्रभर जांघिया, कुरता आणि एक घोंगडी एवढ्याच कपड्यानिशी जागरण केल्याने आमचा थकवा, क्षोभ, दुःख या सर्वांचा परिपाक म्हणून उत्तेजना होतीच. आम्ही आता बेपर्वा झालो होतो. आमचे ते निर्विकार चेहरे बघून आणि नारे ऐकून तो रागाने वेडा झाला होता. तो जितका ओरडून म्हणायचा शट अप, त्यापेक्षा जोरात आम्ही म्हणायचो वैकुंठ शुक्ल की जय! रघुनाथ पाण्डेय जोरात म्हणाला- अरे जल्लादा थांब, तुला पण फासावर चढवतील!

    रागाने पाय आपटत तो म्हणाला- तुम्हाला वेताची शिक्षा मिळेल- you will be flogged.
    त्रिभुवन पण गरजला- माझ्या मित्राला फाशी दिलीत! आता जा, तुमच्याकडे असतील तेवढे सगळे वेत घेऊन या. अंग्रेजी राज मुर्दाबाद, शुक्लाजी की जय, वंदेमातरम्!
    आय जी शिव्यांची लखोली वहात निघून गेला-- बेंत लगाएगा, बेंत लगाएगा!
    
सेलचे दरवाजे उघडले. आम्ही एकत्र एक नंबर सेलकडे जाऊ लागलो. तेवढ्यात हेड जमादार येऊन म्हणाला- पाण्डेयजी, त्रिभुवनजी, चला!
    मी विचारल- टिकटिकी तयार झाली? दोघांनाच कां? मला का नाही? जमादार म्हणाला- तस नाही! हुकुम झाला आहे - यांना दुस-या वॉर्डात ठेवण्याचा।

    त्या दोघांना घेऊन गेले. बाहेर अंगणात मी एकटाच फे-या मारत होतो. एक नंबर सेलला धुऊन-पुसून साफ केल होत. भनसिया एका बादलीत नाश्त्याची खिचडी घेऊन आला- त्याला मी परत पाठवल. तो एक शब्द न बोलता निघून गेला.

    थोड्या वेळाने परेरा एकटाच पंधरा नंबर मधे दाखल झाला. माझ्याजवळ येऊन म्हणाला- “तुम्हीं नाश्ता परत पाठवला।”
    मी म्हटल- साहेब, उपोषण नाहीये करत। पण आता खायची इच्छा नाही. मला थोडा वेळ एकटं सोडा. माझ्या साथीदारांना तर तुम्ही नेलच आहे वेताचे फटके मारायला- मी कांय त्याही लायकीच्या नाही- not fit for flogging?”

     तो माझ्याजवळ आला. म्हणाला- “don’t mind! तुला माहित आहे- मी ही काल रात्रभर झोपलेलो नाही. I felt for the boy the day I saw him first. No, no he can’t kill a man. मी सुट्टी घेण्याचा प्रयत्न केला होता. फाशीच्या वेळी मला थांबायच नव्हत. I did not, I could not.  त्याचा गळा भरून आला होता. त्याला जे सांगायच होत, ते तो सांगू शकणार नव्हता. मी स्तब्ध झालो. खिशातून रुमाल काढून परेराने नाक शिंकरल. थोड सावरुन तो म्हणाला- oh, he was such a brave boy!

    तो निघून गेला. थोड्या वेळाने हेड जमादार त्रिभुवन आणी पाण्डेयला घेऊन आला. मी विचारल- आता कांय झाल? तो म्हणाला - हुकुम, साहेबाचा हुकुम - घेऊन जा, आत्ता लगेच परत घेऊन जा-  त्याच डोक ठिकाणावर नाहीये बाबूजी!”

    १९३० च्या पटना कॅम्प जेलचा सुपरिंटेण्डंट परेरा. तिथेही त्याला पगला साहेबच म्हणायचे.

    जमादारने माहिती दिली- काल अख्खी रात्र ऑफिसच्या खुर्चीत बसून होता. आय जी पण बराच वेळ होते. तुमच गाण ऐकून म्हणाले- कोण ओरडतय्- वैकुंठ शुक्ल?

    त्यावर परेरा ने उत्तर दिल होत- नाही, पंधरा नंबर मधे एक बंगाली कैदी आहे- तो गातोय्. He is singing  for the condemned prisoner.” आयजी म्हणाला- त्याला गप्प रहायला सांग- त्याला गप्प कर.

    पण परेरा म्हणाला- गाऊ दे सर, त्याने कांय नुकसान होणार?
    जेल सुपरिंटेण्डंटची अनिच्छा बघून आय जी गप्प बसला.

    दुपारी आम्हीं तिघे उन्हांत शेकत बसलो होतो. क्वचित बोलत होतो. बारा वाजले. ड्यूटी बदलली आणि दुसरा वॉर्डर आला.
    मी विचारल- तू तर फाशीच्या वेळी तिथेच होतास. तो म्हणाला- हो होतो. शुक्लांजींच्या घरचे लोक आले होते.
    इतरही लोक होते. पण शुक्लाजींचा देह त्यांना दिला नाही. आम्हीच आपापसात पैसे गोळा करून त्यांना खांद्यावरून नेल आणि दाहसंस्कार करून आलो. आज संपूर्ण गारदेमधे कोणी जेवायला गेला नाही। कोणीही जेवला नाही- कुणीही रडल्याशिवाय राहिला नाही!

    बूट न काढताच तो सिमेंटच्या एका चौथऱ्यावर उकीडवा बसला आणी सांगू लागला- मी फाशीच्या वेळी हजर होतो. तिथेच माझी ड्यूटी होती. आय जी साहेब, परेरा साहेब, जेलर, सगळे होते. फासावर चढण्याआधी जेंव्हा शुक्लाजींच्या चेहऱ्यावर काळं कापड बांधत  होते- तेंव्हा त्यांनी मनाई केली. मग परेरा म्हणाला- ठीक आहे, राहू द्या. साहेब रुमाल फडकावून इशारा करत होते, पण जल्लाद लीव्हर ओढायला कचरत होता. शेवटी शुक्लाजीच म्हणाले- उशीर का करताय्?

माझ्या डोळ्यांपुढे होती 1930 मधली पटना कॅम्प जेल! पत्र्याच्या छताखाली कैद्यांनी रहायच्या भलामोठ्या खोलीत जमीनीवर चट्टी आणि घोंगडी टाकून एक सुंदर किशोर 'चयनिका' उघडून जोर जोरात पण अडखळत वाचत होता-

सेई महावर्षार रांगा जल,
ओ गो मरण, ओ मोर मरण।

त्याने पुढल्या ओळी वाचल्या-
आमि फिरिबोना कोरि मिथ्या भय
आमि कोरिबो नीरव तरण!

मी विचारल होत- अर्थ समजला?
शुक्ला उत्तरला होता- "तरण" शब्द आम्ही पण वापरतो..।
मी विचारल होत- वेळ येईल तेंव्हा असाच तरून जाशील ना?
वैकुंठ शुक्लच्या मुखमंडलावर एक सलज्ज स्मित पसरल होत!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[प्रथम प्रकाशन- १९७५ बंगाली मासिक कंपास च्या शारदीय विशेषांकात]
  भारतीय स्वतंत्र्य लढ्याचा इतिहास बहुविध अंगांनी लिहीला न जाणं, कुणी कुणी काय, कस आणि किती सोसलं, त्याची देशाला माहीती नसणं हे आपल दुर्दैवच मानावं लागेल. निव्वळ राजकीय मतभेदांच्या कारणांनी सुभाषचंद्र बोस, सावरकर यांच्यासारखी मोठी माणसं देखील मागे ठेवली गेली, तर इतराच्या काय कथा। म्हणूनच बिहार, बंगाल, पंजाबमधील क्रांतीकारी मंडळींच्या शौर्याच्या गाथा मराठीतून लिहील्या जात नाहीत आणि महाराष्ट्राच्या क्रांतीकारकांवरील पुस्तक इतर भाषांमध्ये जात नाहीत.
 स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्याजवळील खेड्यासारख्या खेडेगावातून एक तरूण - राजगुरू - उत्तरेकडे जातो, भगतसिंहबरोबर क्रातीलढ्यात लढतो आणि त्यांच्याबरोबर फासावर जातो. कुठे पुणे कुठे दिल्ली, लखनऊ किंवा लाहोर। पण त्याही काळात हे घडुन गेलं. एवढच नाहीतर आजुनही खूपसं. त्यातीलच एक कथा वैकुंठ शुक्ल या बिहारी युवकाची.
 असेंब्लीत बाँम्ब फोडल्यानंतर भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी पळून जाण्याएवजी पकडून घेणं जास्त पसंत केलं तो इतिहास सर्वांना माहीत आहेच. आपल्यावर खटला भरला जाईल, त्याची माहीती जनतेसमोर जाईल, जनतेला स्वातंत्र्यलढा काय आहे ते समजेल, त्यातले मुद्दे कळतील ही त्या मागची भावना होती.
 त्या दोघांच्या पाठोपाठ हिंदुस्तान  सोशँलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे इतर सदस्य ही पकडले गेले. फक्त चंद्रशेखर आझाद यांनीच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने ते पोलिसांच्या कचाट्यातून वाचले. खटला सुरू झाला तेव्हा क्रांतीमध्ये सामिल असलेला त्याचाच एक सहकारी फणीन्द्रनाथ माफीचा साक्षीदार झाला. या केस मध्ये ललित मुखर्जी आणि मनमोहन बँनर्जींसारखे इतरही कमी महत्वाचे साक्षीदार होते पण निव्वळ त्यांच्या साक्षीने खटला उभा राहू शकला नसता.
 भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना फाशी दिल्यानंतर फणीन्द्रनाथ घोष बिहार मधील आपल्या मूळ गावी बेतिया येथे जाऊन राहू लागला. सरकारने त्याच्यासाठी दिवस-रात्र खास अंगरक्षक तैनात केलेला होता. एव्हाना १९३२ साल उजाडलेलं होतं. हिंदुस्तान  सोशँलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची एक छोटी शाखा बिहारमध्येही होती. त्यांच्याकडे पंजाबमधून सांकेतीक भाषेत एक संदेश आला की, हा कलंक तुंम्ही धुवून काढणार की बाळगनार? 'कलंकको ढोओगे की धोओगे?' त्यानंतर संस्थेतील सहा वरीष्ट कार्यकर्त्याची गुप्त बैठक झाली तेव्हा एक मुखाने उत्तर ठरलं -- धुवून काढणार! आणि प्रत्येकाने हे काम करण्याची तैयारी दाखवली. शेवटी चिठ्ठ्या टाकून या कामासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये वैकुंठ शुल्क यांच नाव निघालं. त्यावेळी त्याचं वयं होतं निव्वळ सत्तावीस वर्ष!
 वैकुंठ शुक्ल(मैथिली व बिहारी उच्चारन सुकुल) आणि त्याचे घनिष्ठ मित्र चंद्रमा सिंह यांनी फणींद्रनाथ घोषला ठार मारण्याची योजना तयार केली. पटण्याशेजारील हाजीपूर येथून सायकल ने प्रवास करीत उत्तर बिहार मधील दरभंगा या छोट्या शहरात ते पोचले. इथे त्यांच्याच गावाचा गोपाल नारायन सुकुल दरभंगा मेडीकल काँलेजमध्ये शिकत होता. त्याच्याकडून धोतर, शेविंग रेझर, चाकू इत्यादी सामान घेऊन पुढे सायकलनेच मोतीहारी व तिथून बेतियाला पोचले. बेतियामध्ये फणीन्द्रनाथ सोबत अंगरक्षक होता. तरी पण एका संध्याकाळी फणीन्द्रनाथ आपल्या मित्राच्या दुकानावर बसून गप्पा मारत असताना वैकुंठ आणि चंद्रमा यांनी त्याच्या डोक्यावर भुजालीनं(कोयत्यासासख एक विशिष्ठ हत्यार) प्रहार करून जखमी केलं. आठव्या दिवशी फणीन्द्र मरण पावला.
 त्याच्या हत्येच राजकीय महत्व महीत असलेल्या ब्रिटीश शासनाने सगळीकडे धरपकड तसेच पैशाची लालूच दाखवणं सुरू केलं. शेवटी चंद्रमा सिंहला कानपूरमध्ये तर वैकुंठला हाजीपूरमध्ये फितुरीने पकडण्यात आले. खटल्यात आणि आपीलातही वैकुंठवर दोषारोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा झाली, मात्र चंद्रमा सिंहलरील दोश सिद्ध न झाल्यामुळे तो सुटला. वैकुठला १९३४ मध्ये गया जेलमधे फाशी देण्यात आली.
 याचवेळी गया जेलमध्ये वैकुंठबरोबर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विभूतीभूषण दासगुप्त पण होते आणि त्यांच्यावरील खटल्यात त्यांना देखील फाशी होण्याची शक्यता होती. वैकुंठबरोबर त्याचा झालेला परिचय  आणि त्याच्या फाशी जाण्याच्या रात्रीची वीर कथा विभूतीभूषण यांनी त्याच्या बंगाली पुस्तकात - 'सेई महावर्षार रांगा जल' मध्ये सांगीतली आहे.
 वैकुंठ सुकुलच्या पूर्ण खटल्याचे कागद एकत्र गोळा करून तसेच इतर सेनानींची त्याबद्दलची संस्मरणं घेऊन, दासगुप्त यांच्या पुस्तकाचा अनुवाद व हिंदुस्तान  सोशँलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे काही दप्तरएवज रिकामे करून भारतीय स्वातंत्र्याच्या पंन्नासाव्या वर्षी एक इंग्रजी पुस्तक नंदकिशोर शुल्क यांनी संपादीत केलं होतं. आता पाच वर्षानंतर त्याचं हिंदी भाषांतर 'स्वातंत्र्यसेनानी क्रांतीकारी वैकुंठ सुकुल का मुकदमा'  या नावाने राजकमल ने नुकतंच प्रकाशीत केले आहे.
-लीना मेहेंदळे




प्रोफेशन -- इसाक असिमोव्ह

जॉर्ज प्लॅटेनच्या आयुष्याची पहिली अठरा वर्ष छान मजेत गेली होती त्या काळात त्याच एकमेव ध्येय ठरलेली होत आपल्याला रजिस्टर्ड कम्प्युटर प्रोग्रॅमवर व्हायच आहे . त्याच्या मित्रमंडळीत कुणी स्पेशनॉटिक्स तर कुणी रेफ्रिजरेशन टेक्नॉल़ॉजी बद्दल बोलत असे . कुणाला ट्रान्सपोर्टेशन मध्ये तर कुणाला ऑडमिनिस्ट्रेशन मध्ये पण जायच होत . जॉर्जचा इरादा मात्र पक्का होता . आपल्या आवडत्या विषयाबद्दल तो तळमळीने बोलायचा . जसजसा शिक्षण -दिवस जवळ येऊ लागला ,तसतसे चर्चेला उधाण येउ लागले शिक्षण दिवसाचे सरकारी कॅलेंडर ठरलेले होते. वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर येणारा पहिला एक नोव्हेंबरचा दिवस 


कम्यूनिकेशन वर किंवा ग्रॅनिटिक्स वर खास करून गेली चार पाच वर्ष -नवीन ग्रॅव्हिटिक पॉवर इंजिनचा शोध लागल्यापासून ग्रॅव्हिटिक हा चर्चेचा विषय झाला होता . मुल आपापसात चर्चा करीत की जो कोणताही ग्रह एखाद्या खुज्या ता-यापासुन दहा प्रकाश वर्षापेक्षा कमी अंतरावर असेल , तिथले लोक रजिस्टर्ड ग्रॅव्हिटिक इंजिनियर साठी रांगा लावतील ,
पण जॉर्जला त्यांचा मुद्दा कधीच पटला नव्हता ठिक आहे -आज रांगा लावतील .पण मग मागे एका नव्या तंत्रज्ञानाबाबत झाल तेच होईल -सुधारीत आणि सोप्या आवृत्या निघू लागतील दर वर्षी येणारी नवी मुल नव्या सुधारीत तंत्रज्ञानाचा आणि नव्या मॉडेल्सचा वापर करतील मग आजची ही मुल त्यांच्या तुलनेने आऊट डेट होतील पण तुम्ही जर कम्प्युटर प्रोगॅमवर असाल तर दर नवीन सुधारणेसाठी नवीन प्रोग्रॅमिंग लागणारच एरवी आऊट डेट झालेल्या तंत्रज्ञानाचा कुठल्या तरी कमी प्रतीच्या अकुशल कामगार म्हणून रठार लागू शकत 


कम्प्युटर प्रोग्रॅमर्सला खुप जोरदार मागणी पण सातत्याने मागणी असायची अगदी सुरवातीलाच त्यांना प्रगत ग्रहांवर बाब मिळणार नाही , पण आयुष्यात ते नेहमी प्रगति करत रहाणार आणि मध्यम वयांत येईपर्यंत नक्की कुठल्या तरी प्रगत ग्रहावर त्यांना स्थिरावता य़ेणार . हा पॅटर्न जार्जला जास्त पसंत होता . मुल्य म्हणजे कम्प्युटर प्रोग्रॅमिंग मधे सतत नवीन आव्हान , नवीनमुद्दे हातालायला मिळणार
स्टबी ट्रेबेलन बरोबर त्यांची याच विषयावर नेहमी खडाजंगी चर्चा व्हायची स्टबी त्याच्याच वयाचा ,त्याचा सगळयांत जवळचा शेजारी होता ते एकमेकांचे सर्वात जवळचे मित्र होते की सर्वात जवळचे शत्रु ते कोणी सांगु शकले नसते . त्यांना एकमेकांचे मुद्दे कधीच पटत नसत आणि तरीही प्रत्येक प्रश्नांनवर त्यांची एकमेकांशी चर्चा होत असे स्टबील रजिस्टर्ड मेटॅलर्जिस्ट व्हायचे होते . त्याचे वडीलही मेटॅलर्जिस्ट नेते आणि कधी काळी एका परकिय ग्रहावर त्यांनी नोकरी मिळवली होती त्यांचे आजोबा पण रजिस्टर्ड मेटॅलर्जिस्ट होते स्टरबीला पण मेटॅलर्जिस्ट होणे हा जन्मसिद्ध 

अधिकार वाटत होता आणि इतर कुठलाही व्यवसाय तुलनेत जरा तरी कमी प्रतीचा वाटायचा
जगाच्या पाठीवर कुठेही धातुंना तोटा नाही त्यांची वेगवेगळी मिश्रण करण आणि त्यांचे वेगळे गुणधर्म तपासण हे किती मजेच काम आहे कम्प्युटर प्रोगॅमवरकाय करणार ,तर एखाद्या मैलभा लांबीच्या कम्प्युटच्या एका छोटयाशा कोडा जवळ दिवसेंदिवस बसून डाटाफिडींग करत राहणार .
सतरा वर्षाचा असून सुद्धा जॉर्ज जास्त व्यवहारीक होता दरवर्षी निदान दहा लाख मुल तरी मेटॅलर्जी मधे जातात कारण हा व्यवसायच तसा आहे सगळयांत चांगला पण तिथे तू दहा लाखातला एक असणार रांगेत लांब कुठेतरी कुठल्याही ग्रहावरचे सरकार स्वतःच्या शैक्षणिक टेप्स वापरुन स्वतःचे मेटॅलर्जिष्ट निर्माण करु शकते पृथ्वीवर जी थोडीफार नवीन मॉडेल्स बनवली जातात ,त्यांच्यासाठी पण मोठी बाजारपेठ नाहीये . आणि मुख्य बाजारपेठ लहान ग्रहांवरच आहे ए रेटिंगच्या ग्रहासाठी तुण घेतली जाण्याची शक्याता किती आहे ... मी त्यांची आरोळी पाहीली काम पक्के म्हणजे


आठातला एकच तिकडे जाऊ शकतो . कदाचित तुला पृथ्वीवरच रहाव लागेल . ती शक्यता चार टक्के आहे
ट्रेबेलन आदर्शवाद दाखवत म्हणाला ठीक आहे , पृथ्वीवर रहाण देखील सन्माननीयच आहे . इथेही चांगल्या मेटॅलर्जिस्टची गरज आहे .आजोबा पण पृथ्वीवरच राहीले होते.
जॉर्जचे वडील आणि इतर पूर्वज पृथ्वीवरच राहीले होते . त्यामुळे त्याने मिलायाच्या सुरांत म्हटले मला कुणाच्या बुद्धिचा अधिक्षेप करायचा नाही तरी पण -एखाद्या ए ग्रेड च्या ग्रहावर राहायला मिळाल तर बर की नाही? आता प्रोग्रामर्सच बघ ए क्लास ग्रहांवर नवे -नवे कम्प्युटर्स येत राहाणार आणि त्यांना चांगल्या प्रोगॅमर्सची गरज भासत रहाणार प्रोग्रॅमावर शिक्षणाच्या टेप्सही कमी आणि गुंतागुंतीच्या आहेत त्यामुळे खुप मुल त्यांना सुटही होत नाहीत त्याच गणितही मी बघितलय साधारण दहा लाख मुलांमधुन एखादा फस्ट क्लास कम्प्युटर प्रोग्रामर निघतो ए क्लास ग्रहांना त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने जेवढे प्रोग्रॅमर्स तिथल्या तिथे मिळत असतील ,त्याहुन जास्त लागतात ..
मग ते पृथ्वीवरच येतात.
तुला सांगु गेल्या वर्षी पृथ्वीवरचे किती रजिस्टर्ड कम्प्युटर प्रोग्रामर्स ए-ग्रेड च्या ग्रहांवर गेले?अगदी शेवटच्या सकट सगळे कळल महाएज ?
ट्रेबेलनचा चेहरा पडला पण लगेच उजळल -जर दहा लाखातला एखादा मुलगाच कम्प्युटर प्रोग्रामिंसाठी योग्य ठरत असेल तर तू योग्य ठरशील कशावरुन ?
मी योग्य ठरेन जॉर्जने सावधपणे म्हटले जॉर्जने हे गुपित जपून ठेवल होत . ट्रेबेलन काय आपत्या आई-वडिलांना देखील त्याने सांगितल नव्हत की त्याला आपण योग्य ठरू अस काय वाटत होत (आता इथे त्याच आठवणी त्याल सगळ्यांत त्रासदायक ठरत होत्या .)पण एखादा अठरा वर्षाचा मुलगा ज्या आला विश्वासाने भारल जाउ शकतो -तसाच तो तेंव्हा होता त्याच्या शिक्षण दिवसाच्या आधी.
त्याला आपल साक्षरता -दिवस आठवला त्या आठवणी किती सुखावह होत्या मुळात तो 


बालपणाचा काळ होता . वयाच्या आठव्या वर्षी मुल खुप वेगळी असतात त्यांना कशाच काही वाटत नाही . आदल्या दिवसापर्यत ती निरक्षर असतात आणि एका दिवसात एका झटक्यात ती साक्षर होतात रात्र संपुन झपकन सूर्य उगवावा तशी
शिवाय त्या दिवसानंतर लगेचच काही होणार नसत . तुम्ही अठरा वर्षाचे आणि नोकरीस मात्र नसता तुम्हाला नेमुन घ्यायला एजंटांची धावपळ नसते तुम्हाला पुढे येणा-या ऑलिंम्पिक दिवसांची तयारी करायची नसते . तुम्हाला सरळ घरी यायच असत पुढच्या दहा वर्षासाठी एक नवीन कैशल्य मिळवुन .
त्याला त्याचा साक्षरता दिवस ब-यापैकी आठवत होता सप्टेंबरची कुठलीशी पावसाळी सकाळ !(त्याला नर्सरीत शिकलेली कविता आठवली एक सप्टेंबर साक्षरता दिवस -एक नोंव्हेंबर शिक्षण दिवस -एक मे ऑलिम्पिक दिवस ) त्याचे आई वडिल जास्त उत्साही जिसत होते ,त्याचे वडील रजिस्टर्ड प्लंबर होते आणि आपल्याला पृथ्विवरच रहाव लागल याच त्याना वैषम्य होत तस पाहील्यानंतर अजुनही ब्रम्हांडातील सगळया ग्रहांवर मिळुन जेवढी होळवस्ती बसली होती त्यापेक्षा जास्त पृथवीची 

लोकसंख्या होती .प्रत्येकाला आयुष्यातला काही काळ पृथ्विवर काढावाच लागत होता ,तरी दुस-या ग्रहांवर जायला न मिळण याच शल्य टोचत असणारच
सर्व ग्रहांच्या लोकांचा आढावा घेतला तर अजुनही सर्व अजुनही शेतकरी पृथ्वीवरच रहात होते तसेच बरेचसे खाण कामगार आणि इतर तंत्रज्ञ पण फक्त खुप वरिष्ठ दर्जाचे आणि स्पेशलायझेशन असलेले नागरीकच इतर ग्रहांवर जाऊ शकत असत . पृथ्वीवरच्या दहा अब्ज लोकसंख्येपैकी दरवर्षी फक्त दहा ते वीस लाख मुल -मुली बाहेरच्या ग्रहांवर जाऊ शकत होती.
तरी पण प्रत्येक आई बापाची इच्छा असे की निदान आपल्या मुलाबाळांनी तरी परग्रहावर जाव जॉर्जचे आई वडील याला अपवाद कसे असतील जॉर्ज इतरांपेक्षा खुप हुशार तल्लक बुद्धीचा आहे हे कुणालाही कळु शकत होत त्यात ते त्यांच एकुलत एक अपत्य होत त्याला परग्रहांवर जायला मिळाल नाही तर त्यांना पुढच्या पिढीपर्यंत वाट बघावी लागली असती








त्या दिवसानंतर मित्रमंडळीत चर्चेचे विषय बदलतील थोडस स्वतःच्या व्यवसायाबद्दल आणि वरचस बायका -मुलांबद्दल ,झालाच तर आपण रहात असलेल्या ग्रहाच्या पोलो-टीमबद्दल अगदी ओलिम्पिक दिवसाच्या अनुभवाबद्दल सुद्धा . पण अठरा वर्षाच्या आधी मात्र सगळयांचा बोलण्याचा विषय एकच- शिक्षण दिवस आणि त्या दिवशी काय काय घडू शकेल.

तुला कशात जायचय ओठ रेफ्रिजरेशन मध्ये ? पण तुला चान्स मिळेल का आता तर कोटा पण कमी झालाय . किंवा हायपरमेकॅनिक्स वर चर्चा -किंवा