शनिवार, 10 नवंबर 2007

भेकड मराठी कथा अंतर्नाद जाने 2010 टंकित


 अंतर्नाद जाने 2010 मधे प्रकाशित

भेकड

तो जंगलात रहात होता.

जंगलाचे नियमच वेगळे असतात.  कुणी कुणावर दबाव टाकत नाही कि जोर जबर्दस्ती नाही.  कुठेही कितीही वेळ भटका, वाटेल तेंव्हा घरी परता ! जंगल इतकं मोठ असत, तरी पण इथे रस्त्यांची ओळख करून घेणं खूप सोप असत.  आणि कधी मुख्य रस्त्यावरून भटकत दूर गेलो तरी पर्वा नाही.  घरी लौकर परतायची घाई नाही आणि घरापासून दूर रहाण्यांत फार धोकेही नाहीत !  निदान त्याच्यासाठी तरी नाहीतच !   तो शक्तिमान होता ! 

    पण शहराचे नियम वेगळे होते. त्याने ऐकलं होतं की शहरी लोकांनी शहरांना खूप गजबजून टाकल होतं आणि कठिण करून टाकलं होतं.  एक रस्ता चुकून दुस-या रस्त्यावर गेल  तर कळणारच नाही की आता परत कसं जायच.  जंगलांनी त्याला खूप कांही शिकवल होतं.  त्यातली अगदी प्रारंभिक शिकवण होती की आलेला रस्ता ओळखून त्यावरूनच कस परत जायच.  पण ज्यांनी शहरांचे थोडे फार नियम पाहिलेत ने सांगत असतात की शहरी लोकांचे रस्ते इतके गुंतागुंतीचे आहेत की जंगलातली कोणतीही शिकवण इथे उपयोगाची नाही.  त्यापेक्षा शहाणपणाची गोष्ट म्हणजे जो जंगलात स्थिर-स्थावर झाला आहे त्याने शहराकड़े ढुंकूनही पाहू  नये.

    याच जंगलात त्याच्या पाच पिढ्या राहिलेल्या आहेत.  त्याच्या आजोबांच्या आजोबांनी देखील शहरांबद्दल हेच ऐकलं असणार आणि ठरवून टाकल असणार की कधीही शहरांत जायचच नाही.  मग त्याच्या पणजोबांनी, मग आजोबांनी आणि बापानी देखील हेच ठरवून ठेवल असणार. पिढयान्‌ पिढया हीच शिकवण दिली गेली की शहरांपासून दूर रहा अन् सांभाळून रहा - जंगल हेच तुमचं घर आहे. 

    जंगलातच त्याच्या सर्व गरजा भागत असत.  जंगलात रहाणा-यांच्या गरजा असून असून किती असणार ?  त्यांना शॉपिंग मॉलची गरज नाही - पबची नाही -  इंटरनेटची पण नाही.  त्यांना बियर बारही नकोत आणि बार डान्सर्सही नकोत.  त्यांना मोटारी, मोबाइल किंवा सिनेमा पण नकोत.  खाणं आणि पाणी - बस्स.  तेच सर्वात गरजेच.  आणि हो, डोक्यावर एक छप्पर पण हवं.  पण जंगलात ते   पण सोयिस्कर मिळून जातं. 

    पण एक संकट येऊन ठाकलं होतं आणि ते शहरी माणसाच्या लालची स्वभावामुळे येणार होतं.  हल्ली शहरं अंदाधुंद वाढत चालली होती.  त्यांना प्रत्येक दिवशी हवी होती नवी घरं, नवे रस्ते, नव्या इमारती, नवे शॉपिंग मॉल्स, पार्किंग लॉट्स, हॉटेल्स ।  त्यासाठी पाहिजे जमीन.  शहरी लोकांच्या डोळ्यांत जमीनी भरत असत. मोकळया जागा, पार्क, खेळाची मैदानं, शाळांची पटांगणं, कम्यूनिटी सेंटर्स, आणि जंगल ! 

    कधीमधी शहरात जाउन येणारे सांगत की कशी शहरातल्या झाडांची कत्तल चाललेली होती.  बागा नष्ट होत होत्या.  शहरी लोकं त्या जागांवर उंच उंच टावर्स उठवण्यांत मग्न होते. ही तर चोरी होती. आणि सीनाजोरी अशी की त्याच पद्घतीने जंगलांवर देखील आक्रमण होत होते.  जंगलांच्या हक्काची गोष्ट कोण करणार? आधी शहरांत गेल्यावर तिथेही टेकडया दिसत- उंच, डेरेदार, जुने वृक्ष दिसत. जंगलातून कोणी गेलं तर घटकाभर विसावा घेण्याच्या त्या जागा असत. जंगलसारख कांही तरी वातावरण तर असायच.  पण आता तर शहरी लोकांनी त्यांच्या टेकडया पण कापून काढण्याचा सपाटा लावला होता. जंगलातून कोणी तिकडे गेलं तर आपलेपण वाटावं अस कांहीच शिल्लकं ठेवल नव्हतं. 

    या उलट जंगलावर मात्र त्यांचे आक्रमण धडाक्याने चालू होते.  जंगलाच्या आंत पक्के रस्ते, टूरिस्ट रिझोर्ट, या नावांखाली जंगलाच्या जमीनी शहरवाले बळकावीत होते.  जंगलातील आदिवासीच कांय, पण पशु पक्ष्यांच्या घरांच्या आणि, प्रजजनाच्या जागा देखील प्रदूषित आणि असुरक्षित होत चालल्या होत्या.  त्यांना कोण अडवणार ?  सगळे कायदे त्यांच्या बाजूने आणि कायदे तयार करणारे देखील त्यांच्याच बाजूने.

    शक्तिमानला या बाबी फारशा कळत नसत आणि त्याबद्दल फारशी चिंता पण नव्हती.  पण जंगलात रहाणा-यांच्यात चिंता व्यक्त होत असे.  त्या गप्पांमधे शक्तिमान भाग घेत नसे.  थोडफार ऐकल तर ऐकल.  ते पण त्याच्या डोक्यांत फार काळ रहात नसे. थोडस ऐकलं, सांगणा-याच्या चेह-यावरची काळजी वाचली. थोड़ा काळ मनात ठेवली- बस्स !  आपल्याला जर जायचच नाही शहराकडे तर या गोष्टींमधे डोकं कां शिणवा ?  त्याला लागणारं खाणं आणि पाणी जंगलात मुबलक आहे.  मनमुराद भटकायला जंगलाचा विस्तारही खूप आहे.  त्याच्याकडे शक्ति आहे.  मग त्याला काय कुणाची भीती आणि कांय कशाची चिंता!  

    पण अलीकडे कांही काळापासून शक्तिमानच्या मनांतही खळबळ होऊ लागली होती.  आपल्या चार-पाच पुतण्या - भाच्यांच्या दुर्दैवाच्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचल्या होत्या.  अगदी पहिल्या वेळचा किस्सा ऐकून तो फारच हळहळला होता.

    त्याचा लांबचा भाऊ - जंगलात भटकायला म्हणून गेला आणि अचानक शहराकडे वळला.  पण त्याचा तरी दोष म्हणावा कां ?  जंगलातील एक जागा - जिथे कधी काळी तो फिरायला किंवा खाण्याच्या शोधात जात असे - मधे तीन चार महिने तो तिकडे फिरकला नव्हता.  आणि जेंव्हा गेला . . . . त्याच परिचित जंगल संपल होतं.  त्या जागी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या होत्या.  वळणा-वळणांचे रस्ते झाले होते - ओळखू येईल असं कांहीही शिल्लक राहिल नव्हतं - ना वृक्षराजी, ना गवत ! हां, एक छोटसं लॉन होत - त्यात फक्त थोडी हिरवळ दिसत होती .  भाई तिथेच बसून विचार करू लागला. पण जंगलाकडे परत कसं जावं ते समजेच ना !  लोकांचे डोळे चुकवून तो एका घराच्या उघडया खिडकीतून आत शिरला.  आणि हीच त्याची मोठी चूक ठरली .

    भाऊच्या मरणाचं वर्णन देखील शक्तिमान ने तुकडया-तुकडयात ऐकलं होत- थोडं याच्या तोंडून - थोडं त्याच्या तोंडून.  आणि प्रत्येक वेळा त्याच्या हृदयाला पीळ पडले होते.  शहरी माणसं एवढी क्रूर असतात ? एवढी क्रूर वागतात ?  कित्येक दिवस  शक्तिमान याच विचारात बुडला होता.  भाऊने कसे सहन केले असेल एवढे क्रौर्य ?  किती भ्यायला असेल ?  किती किंकाळया मारल्या असतील ? किती - पळायचा प्रयत्न केला असेल ?  कां - कां ?  निव्वळ त्याला शहरातून जंगलात परत येण्याचा रस्ता सापडूं शकत नव्हता म्हणून ? 

शक्तिमान ने जे कांही ऐकल त्यावरून हे तर निश्चितच होत की भाऊला जर रस्ता कळला असता तर तो परत आला  असता.  खिडकीतून उडी मारून ज्या खोलीत तो शिरला तिथे त्याला दर क्षणाला दचकायला झाल होतं.  खोलीच्या बाहेरचा ओरडा त्याच्यापर्यंत पोचत होता आणि पळत जाणा-या पावलांचा आवाज पण कळत होता.  लोक त्याच खोलीच्या आसपास पळापळी करत होते - जणू त्यांना माहीत होतं की खोलीत कोणीतरी अनोळखी शिरलेला आहे .  भाऊने खूप प्रयत्न केले की उडी मारून खिडकीपर्यंत पोचावं आणि तिथून पुन्हा बाहेर पडाचया प्रयत्न करावा.  पण त्याच्या उडया खिडकीपर्यंत पोचत नव्हत्या.  कितीवेळा तरी तो खाली पडला.  प्रत्येक धप्प आवाजागणिक बाहेरचा ओरडा वाढायचा.  कसवसं शेवरी एकदा तो खिडकीपर्यंत पोचला आणि तिथून बाहेर पळाला - एका अनोळखी रस्त्यावर.

    भाऊ पळण्यांत तरबेज होता.  पळत तो एका बाजूला जायचा -  शहरवासियांच्या एका जमावाला चुकवाचया!  पण तेवढयांत दुसरा जमाव, दुसरी टोळी त्याचा रस्ता अडवायची.  तो दात-ओठ खाऊन पळायसाठी शक्ति गोळा कराचया आणि लोकांना वाटाचया हा कुणावर तरी झेप घेणार.  लोक थोडे मागे सरकत .  त्याला पळण्यासाठी कुठेतरी फट मिळायची.  तरी पण शेवटी तो नि:शस्त्र होता.  लोकांकडे लाठया-काठया होत्या.  फेकून मारण्यासाठी दगड होते.  कितीदा तरी त्याला घेरून त्याच्यावर लाठ्या बरसल्या.  भाऊ पळत राहिला,  दु:खाने ओरडत राहिला, आणि भीत राहिला.  शेवटी चार तास झाले.  आता त्याच्यांत पाय उचलायचेही त्राण राहिले नव्हते.  त्याला स्पष्ट कळून चुकलं की आता ही सगळी माणसं मिळून त्याला पकडणार.  ठीक आहे, पकडू देत.  त्याला पकडून कैद केल आणि जंगलाच्या रस्त्यावर सोडून दिलं तर बरच  झालं.  इतका वेळ तो उगीचच पळत होता.  आता एकदा जंगलात जायला मिळाल की पुन्हा इकडे फिरकायच सुद्घा नाही ! 

पण नाही झालं तसं.  इतकी माणसं जी गोळा झाली होती -  त्यापैकी प्रत्येकाला त्याच्यावर एकदा तरी काठी मारायचीच होती.  तेवढयांत तिथे एक बंदूकधारी पण आला.  त्याने गोळया झाडल्या - तीन गोळया एक एक करून छातीत उतरल्या.  भाऊने  थोडया वेळातच प्राण सोडले.

इतर भाऊबंदांचे, जंगलवासियांचे किस्से सुद्धा कांही फार वेगळे नव्हते.   शक्तिमानच्या लक्षांत येऊ लागलं होत, की त्याच्याकडे देखील या समस्येवर कांही उपाय नव्हता.  त्याच्या लहानपणी जेवढं जंगल होतं, त्यापेक्षा गेल्या पंधरा वर्षांत ने कितीतरी पट कमी झाल होत.  याची फरियाद तरी कुणाकडे करायची?  कुणाकडे ऍप्लीकेशन नेऊन द्यायाचा ?  कुणाला नियम करायला सांगायचं की आम्ही जंगलवासी जर चुकून माकून तुमच्या शहरांत शिरलो तर आम्हाला मारू नका -- त्याऐवजी पुन्हां आणून जंगलात सोडा.  त्याचे जेवढे भाऊबंद किंवा अनोळखी जंगलवासी मारले गेले त्या सर्वांची कहाणी हीच होती अन् सर्वांची फिर्याद एकच होती व सर्वांची विनंति पण.  आम्हाला जगू द्या.  मारू नका. आमची जंगल हिसकावून घेऊ नका.  पण नाही - तस घडत नव्हतं - घडणार नव्हतं.  जंगलं छोटी होत चालली होती.  जंगलवासी चुकतच होते - भटकून शहरांत घुसत होते - परतीचा रस्ता  सापडण्याचा प्रश्नच नव्हता!  शहरवासियांना ऐकून घ्यायला वेळ नव्हता. शहरांत लपायच्या जागा नव्हत्या.  आणि शहरवासियांशी दोस्ती करणे तर शक्यच नाही.  ते कधीच कुणा जंगलवासियाला आपल्या समाजाचा भाग होऊ देणार नाहीत.  जंगलवासी कुठे त्यांच्याइतके स्मार्ट आणि बंदूरकधारी आहेत ? 

हा कसला न्याय म्हणायचा की शहरवासी हव तेंव्हा  जंगलात येऊ शकतात पण जर जंगलवासी शक्तिमान तिकडे गेला तर त्याला प्राण गमवावे लागतील.  असा कायदा होऊ शकत नाही कां की जंगलं तोडायची नाहीत -त्यांना वाढू द्यायचं - निदान त्यांच्या असलेल्या जागा तरी लाटायच्या नाहीत.   आणि सगळयांत मुख्य म्हणजे त्या जंगलाच्या आश्रयाने असणा-या शक्तिमान सारख्यांना निर्भंय राहू द्यायचं !  पण या प्रश्नांची उत्तरं नव्हती.

जंगलात पाण्याचे दोन स्रोत होते.  एक हरिपद तलाव आणि दुसरं 
झ-याच्या पाण्याने बनलेलं कुंड ।  शक्तिमान सध्या कुंडाच्या इलाख्यात वस्ती करून राहिला होता.  आई सांगाचयी, पूर्वी त्या झ-याला  बारा महीने पाणी असायचं.  पण चार पाच वर्षांपूर्वी जंगलातला एक मोठा पहाडच कापून काढला होता.  आधी त्या पहाडावरची मोठी झाडं कापून ट्रकवर लादली जात होती तेंव्हा शक्तिमानची आई आणि तिच्यासारखे अजून कित्येक काही न समजून येऊन बघत राहिले होते.  मग एक दिवस  मोठाले क्रशर्स आले.  पहाड कापायला सुरुवात झाली.  तिथती दगड-माती ट्रकातून भरभरून जाऊ लागली.  वर रहाणारे कित्येक जंगलवासी रडत - भेकत खाली वस्तीला आले.  तेंव्हापासून झ-याची धार देखील पातळ होऊ लागली.  आता तर तो चार-आठ महीनेच वहातो - अजून शेजारच्या डोंगरावर शहरी माणसाचा डोळा पडला नाही म्हणून. पण एक दिवस तो डोंगरही कापायला घेतील.  मग तर पुढल्या पंधरा वीस वर्षात हा झरा आणि हे कुण्ड दोघांचं अस्तित्व  संपून जाईल.  शक्तिमानने विचार केला की पुढल्या कांही दिवसातच आपण आपलं रहातं ठिकाण हलवाव आणि हरिपद तलावाशेजारी वस्तीला जाव हे बरं । 

पण तलावाकडे आल्यावर शक्तिमानचा आपल्या डोळयांवर विश्वास बसेना !  तलावाच्या कडेची सर्व झाड तोडली होती.  आता तिथे एक उंच भिंत बांधून काढली होती. शक्तिमान ने चारी बाजूंना फिरून बघितल. एकूण पाच लहान - मोठे दरवाजे होते.  भक्कम लोखंडी दरवाजे - त्यांच्या  वर टोकदार भाले बसवले होते - म्हणजे कुणी त्यांच्यावर चढून आत जाऊ  नये. घ्या !  शहरी लोकांनी पाण्याचा तलावच बंदिस्त केला तर जंगलवासींनी पाण्यासाठी जाचय कुठे ? 

बरच फिरून शक्तिमानला एक जागा सापडली, जिथे भिंतीला चिकटून अर्जुनाचा मोठा वृक्ष होता.  त्याने झाडावर चढून थोडी हिम्मत केली तर तो भिंतीवर उडी टाकू शकला असता आणि तिथून आत तलावाच्या पाण्याजवळ !
---------------------------- 
व्हीसींना तातडीचे फोन घणघणू लागले.  "तातडीने या सर !  तुमची योजना यशस्वी झाली।" रूबाबात व्हीसी जायला निघाले.  त्यांची युनिव्हर्सिटी सुमारे दोनशे - एकरात वसवली होती.  पण तिथले तीन तलाव त्यांना पाण्याला अपुरे वाटले होते.  त्यांच्या सीमेला लागून जिथे जंगलाची हद्द सुरू होत होती तिथूत दीड किलोमीटर वरच हरिपद तलाव होता.  ते क्षेत्र जर युनिव्हर्सिटीला  मिळालं  तर हरिपद तलावाचे पाणी किती कामी येईल !  असी सदळी तर्कशुद्घ मांडणी करून आणि युनिव्हर्सिटी मधील दोन हजार विद्यार्थ्यांचा हवाला देऊन व्हीसींनी सरकारला पटवलं की जंगलाचा तो भाग देखील नव्व्याण्णव  वर्षांच्या भाडेपट्ट्याने युनिव्हर्सिटीला मिळावा.  सरकार कडून मंजूरीच पत्र आला तस त्यांचे अभिंनंदन करणारे कित्येक संदेश आले. लोकांनी माहिती पुरवली -- सर, त्या तलावावर पाणी पिण्यासाठी संपूर्ण जंगलातील प्राणी येतात .  आदिवासी वस्तीतली माणसं पण, जंगली  प्राणी पण आणि कधी कधी वाघ पण !

वाघाचे नांच ऐकताच व्हीसींचे डोके लकाकले होते.  कधी काळी त्यांचे पणजोबा चांगले शिकारी होते.  एक वाघ, तीन रानडुकरं, आणि काही हरिणं त्यांनी मारली होती.  आता पणतू ती पूर्वजांची गरिमा वाढयाला उत्सुक होता ..  ते स्वत: कांही बंदूक चालवूत शिकार करू शकणार नव्हते ।  पण  त्यांचा एक फिल्मी दोस्त होता. त्याला  त्याचा षौक पुरा करायची संधी देऊन दोस्ती दृढ करायची हीच वेळ होती.

व्हीसींच्या प्लान प्रमाणे भग हरिपद तलावा  भोवती भिंत बांधण्यात आली.  त्यांच फिल्मी दोस्त पण इकडे येऊन राहिला होता आणि वाघाच्या शिकारी साठी उतावीळ झाला होता . 

तलावावर पाणि पिव्यासाठी वाध आल्याची सूचना मिळनाच व्हीसी आणि त्यांचा दोस्त रवाना झाले.  जीप मधे बसून तलावापर्यंत आले.  एव्हाना तिथे बरीच गर्दी जमली होती.  काठया घेऊन बरेच विद्यार्थी एका गेटाजवळ थांबलेले होते .  प्लान बनला - गेट उघडून सर्वांनी आत जायचे.  ओरडा करून वाघला भिववायचे --  तो पळापळी करेल - मग फिल्मी दोस्त त्याच्यावर आरामात बंदूक झाडू शकेल.

शक्तिमानला लक्षांत आला की भिंतीवरून उडी मारून तो चूक करून बसला होता.  उलटी उडी मारून तो उंच भिंतीवर चढू शकणार नव्हता आणि भिंतीच्या अलीकडे, आंतमधे असा एकही वृक्षही नहता ज्यावर तो चढून तिथून भिंतीपर्यंत पोचू शकेल.  बुद्बिमान शहरी माणसांनी जंगलाच्या वाघाला बरोबर घेरलं होतं.  गेट उघडून झुंडीने विद्यार्थी आत आले आणि काठया परजत, ओरडा करत त्याला हुसकवू लागले.  शक्तिमान पळत राहिला, भीत राहिला.  शेवटी फिल्मी दोस्ताने बंदुकीच्या गोळया झाडून त्याचे शरीर पिंजून टाकले.  एक शेवटची मोठी डरकाळी, एक अर्धवट उडी, आणि शक्तिमान आपली भिती बरोबर घेऊन चिरविश्रांतिसाठी निपचित पडला.

एकच जल्लोष सुरू झाला.  त्यामधेच नगाडयाच्या घोषांत जणू पिपाणी असे दोन छोटे आवाज आले.  व्हीसींनी आश्चर्याने पहिले.  एक त्यांची मुलगीच होती तेरा वर्षांची - सातवीत शिकणारी - तिच्या हातात शाळेच पुस्तक पण होतं ! 

    "पापा, तुम्हीं वाघलो कां ठार मारलं? आमच्या पुस्तकात म्हटलय की पर्यावरण वाचवणे ही आपली जवाबदारी आहे.  वन्य प्राण्यांना मारून पर्यावरण वाचत नाही.  उद्या या वाघांची पूर्ण प्रजाति नष्ट होऊन जाईल - मग इतर प्राण्यांच्या  प्रजाति - आणि मग मनुष्य पण वाचणार नाही.  पापा, सांगाना, त्या दमलेल्या, तहानलेल्या आणि भ्यालेल्या वाघाला मारून आपण कांय बहादुरी केली ?  आपण भेकडच ठरलो ना ?  भ्यालेला होता तो. बंदुकीने त्याच्यावर गोळया झाडण्याऐवजी त्याच्यावर बेशुद्घीचे इंजेक्शन देणारे  बाण पण बंदुकीने फेकता आले असते.  मग आपण त्याला जंगलांत पाठवू शकलो असतो.  आपण तर इतके सगळे होतो.  तो भ्यालेला होता आणि आपण भेकड होतो- होय ना? पापा, सांगा ना - कां आपण मारलं त्याला ?  कांय मिळवलं ?

व्हीसींजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. 
----------------------------------------------------