रविवार, 19 फ़रवरी 2017

नंदनवन तामिळ कथा लक्ष्मी कण्णन

                     नंदनवन
                                                    (अनुवाद ) लीना मेदंदळे.
     
           तान्हं पाखरू अगदीच चक्राऊन गेलं !
              इतर तिमजल्या घरांमधे बैठा बंगला  असल्याची खूण बरोबर दिसत होती . पण घरासमोर या वासून एक सुनंसुनं रया गेलेल अंगण पसरून पडल होत तिथे कधी काळी वृक्ष, झुडुपं, वेली, मांडव, फुल, फळ, पानं, गवत, काही म्हणता काही उगवल असल्याच्या खुणा नव्हत्या . आपण उडायला शिकल्यानंतर लगेच काही  आकाशगामी पक्ष्यांनी सांगितलेल्या आजोबांच्या कहाण्या खोटयाच होत्या का? पण आपल्याला उगीच कोण कशाला खोटं सांगेल? छे:, पक्षी अस कधीच करत नाहीत.
        घराभोवती चक्कर टाकावी म्हणून पाखरू उडून मा़जदारी आलं तो कायं ? मधेच आपण डुलकी घेऊन स्वप्न नगरीत तर आलो नाही ना?  बाप रे बाप! पुढच्या अंगणाच्या अगदी उलट हे दृश्य ! आंगणभर पसरलेली हिरवळ , वा-यावर डुलणारी झाड, सुगंधाने भरून गेलेले वातावरण! अहाहा~ , डोळे तृप्त झाले त्या  हिरव्याशार दृश्याने ! सुरक्षित विसाव्याला अनंत जागा होत्या! 
             आणि पाणी? अशा जागी पाणी असेलच की नाही? नजर  फिरवण्याआधीच पक्ष्यांचा गोंगाट कानावर पडला . सभोवार पाहिल! अरे, इथे तर पल्टणीच्या पल्टणी आहेत. की पाखरांच्या .त्यातल्या काहींना तर आपण शहराच्या गर्दीत पण पाहिलेल आहे. कस फसलो होतो आपण घरांच समोरच आंगण बघून! पाणी कुठाय्? अरे हो, तिकडे एक मोठी पसरट कुंडी पाण्याने भरून ठेवलेली दिसत्येय की पाणी कस चमचम चमकतय काही चिमण्या , दोन कावळे ,एक पिवळा कॅनरी ,दोन सुतारपक्षी आणि अजून कुणीकुणी चोची बुडवून पाणी पितायेत् .आणि मधेच पाण्यांत बुडी मारून आंघोळी पण चालल्याहेत!
             फुर्रकन उडून तान्हं पाखरू तसराळ्याच्या काठांवर येऊन बसल. इतर चिमण्यांनी थोड सरकून  त्याला  जागा करून दिली कावळ्यांना बघून पाखरू थोड  भीत भीतच बसल होत. ते पाहून कावळे पाणी पिण आटोपून  चटकन निघून गेले.
             इकडे कसा आलास बाळा? एका साळुंखीने विचारलं.
             इकडून उडत चाललो होतो तहान लागली होती. घरासमोरच आंगण बघून वाटल शीः काय हे आंगण या शुष्क जागेत कुठे पाणी मिळायला ? पण मागच्या बाजूला आलो तर हे आश्चर्य ! इतकी सुंदर बाग ?
             हो! सगळ्यांनाच आश्चर्य वाटत .मी पण अगदी पहिल्यांदा इकडे आलो ना,  तर अशीच फसले होते. पण ही जागा मस्त आहे आम्ही आता कित्येक दिवसांपासून इथेच रहातो. ये आपण दाणे टिपू या.
           अरे इथे किती दाणे आहेत टिपायला! तान्ह्या पाखराचे डोळे आनंदाने लकलकले . त्याने पटापटा काही दाणे टिपून घेतले!
          दुस-या चिमण्या हसायला लागल्या .या एवढुश्या दाण्यांना किती दाणे म्हणतोस? तू उशीरा आलास. उद्या सक्काळी सक्काळी ये आणि बघ किती दाणे किती असतात ते, तेंव्हा आपले आजोबा किनई, मुठीमुठींनी दाणे फेकतात आपल्यासाठी ! बघ म्हणजे कळेल.
           कोण आजोबा ? तान्ह्या पाखराने विचारले . ''ते बघ, बागेत खुर्ची टाकून पुस्तक वाचत पडलेत ना, तेच.''
           पाखराने आपली मान वळावून वळावून आजोबांकडे पाहिल आणि भिऊन मागे सरकला .त्याचा नवीन मित्र चिमणा हसला.
         अरे बुद्धु घाबरू नकोस! या आजोबांच्यामुळेच आपण पक्षी इतके दिवस इथे घर करून रहातोय पोटबर चारा , कोवळे लुसलुशीत गवताचे कोंब, फळ, पाणी आणि आराम करायला सुरक्षित घरट सगळ काही आहे इथे. इथे आम्ही झाडांवर आणि हिरव्या गवतावर बागडतो, वाटेल तेंव्हा उडून जातो, मग परत झोपायला येतो. या आजोबांनीच लावली आहेत सगळी झाड नेहमी ते बागेतच बसतात. फक्त दुपारी जेवायला आत जातात किंवा रात्री झोपायला.
         मग आता बर दुपारी आंत घरांत का नाही जात? पाखराने विचारले . आणि हळूहळू उडया मारत आजोबांच्या जवळ सरकून त्यांना नीट बघीतल. आजोबा पुस्तक वाचण्यांत गढून गेले होते. डोक्यावर रेशमी , मऊ , पांढरे झालेले केस . तोंडावर अपार शांति! पण मधेच दुःखाची हलकीशी सावली धुक्यासारखी त्यांच्या जवळपास वावरत्येय् कां? स्वच्छ धुतलेल्या धोतर  शर्टाच्या आत एक शिडशिडीत , पण कमावलेल सदृढ शरीर! मग कांय हेच या बागेसाठी एवढी कठोर मेहनत करतात? आश्चर्य ! पाखराने पुनः एकदा बागेकडे नजर टाकली. झुडुप, वेली , वृक्ष, कितीतरी प्रकार , गुलाब, जाई जुई, चमेली, पॅन्सी, चेह-याहून मोठ्या आकाराची डेलियाची फुल, जास्वंद, चाफा...... देव जाणे किती त्या जाती! एवढं सगळ करणा-या कुशळ माळी आजोबांनी पुढल्या अंगणाकडे जराही लक्ष देऊ नये ?  कां? कां?
           फाटकन मागच दार उघडल आणि एक स्थुल बाई बाहेर डोकावली पुढे होऊन आजोबांना निरखणार पाखरू दचकून मागे पळाल आणि इतर पक्ष्यांच्या घोळक्यांत जाऊन बसल. सगळेच पक्षी श्वास रोखून तिच्या बोलण्याची वाट पहात होते.
           "ऐकताय का अप्पा? तुमच्याशीच बोलत्येय. जेवायची वेळ झाली.कितीदा निरो द्यावेत माणसाने? इतर कामांत आता आणखी हे एक कामं! " आजोबांनी मागे वळून तिच्याकडे पाहिल "मला जेवायच नाही."
         "कां? तीन दिवसांपासून हेच ऐकतोय आम्हीं, जेवण नको, नाश्ता नको, थोड ताकही नको. कशासाठी चाललय हे सगळ? तुमच्या मुलाने पण हात जोडले .मी पण रोज आग्रह करत्येय. पण तुमचा कुठला हट्ट आहे कुणास ठाऊक!
          "............."
    "कुणावर कशाचा राग काढताय? अशी कांय चूक झाली आमच्याकडून ?"
          ''..................'' .
       "मोठी सून म्हणून हात पाय जोडून मीच तुमच्या विनवण्या करायला यायच आणि तुम्ही नाकं मुरडायची. मीच बेअक्कल आता मंगलाललाच पाठवते .ती तर आहे ना तुमची गोड बोली लाडकी सून ? मंगला ए मंगला पाय आपटत ती जाडी बाई घरांत परत गेली.
        पक्षी फुर्ट फुर्ट उड्या मारत आजोबांच्या जवळ सरकले त्यांनी पुनः पुस्तकात डोक घातल होत.
      "आ़जोबा, अस न जेवताखाता किती दिवस राहणार ? एक साळुंखी म्हणाली अरे, अरे, त्यांना गोळी मारा . माणसाची बुद्धीच ती किती? रस्त्याकडेच्या घाणीसारखी . त्यांना तुमच पैसा अडका, जमीन ,नांगर ,दाग-दागिने ! तुम्हीं नको आहात. तुमच्या स्वतःच्या घरात सुद्धा तुम्हाला जागा नाही द्यायची त्यांना . पण ते गाले खड्यांना तुम्ही त्यांचा का त्रास करून घेता ? 

       नंदनवन
      देवाने तुम्हाला उतक सुदृढ शरीर दिलय, त्याला जपा. खा, प्या , आरामात झोपा'', साळुंखीने टिवीचीं टि्वीचीं  करत सल्ला दिला आजोबांनी तिच्याकडे पाहून स्मित केल आणि पुनः पुस्तक वाचू लागले.
           ''ती खरे तेच सांगत्येय्.'' एक चिमणी ओरडली .''तुम्ही स्वतःची नीट काळजी घेतलीच पाहीजे.घरावर तुमचा हक्क आहे. या सुंदर बागेचे तुम्ही राजे आहात. बस, आजोबा, राजासारखच खा ,प्या ,आरामात रहा. प्लीज! '' प्लीज प्लीज, जेवण करून घ्या ! एक कावळा ओरडला.
           "आमच्यासाठी, तुमच्यासाठी!" एक सुतारपक्षी म्हणाला.
                   "आमच्यासाठी, तुमच्यासाठी !"
                           "आमच्यासाठी, तुमच्यासाठी!
     पुस्तकातून नजर काढून आजोबांनी वर बघितल, आणि हसले. मग तोंडावर बोट ठेऊन म्हणाले- श्शू ~~। पण पक्ष्यांनी त्यांच्या इशा-याकडे ------दुर्लक्ष केल. त्यांच चीं, चीं, वटवट, आणि पंखांची फ़डफड चालुच राहिली.
         "अस जेवण खाण सोडल तर आजोबांच कस होणार? तान्ह्या पाखराने विचारल. " तेच तर , तुमच्या तीन्ही मुलांना तुमची कांही  माया- ममता नाही. स्वार्थी आहेत तिघं नालायक आणि तिन्ही सुना पण अगदी असभ्य आहेत. त्यांच्या साठी तुम्हींका स्वतःच शरीर झिजवायच?"
        "कां झिजवायचं?"
  "का झिजवायच? सगळ्या पक्ष्यांनी एकत्र कोलाहल केला.
        "देवाने तुम्हाला सगळ्या ऐश्वर्याने संपन्न केले आहे देवपुजेसाठी लागणारी ही, जास्वंदी, मोगरा, कन्हेर, तिकडे सेनचाफा, पारिजाताचे वृक्ष, रेशमी दुर्वांनी भरलेल- हे उपवन! तुम्ही नसाल तर हे सगळ उजाड होऊन जाईल.
        झाडांनी हे ऐकंल आणि त्यांचा वरचा श्वास वर, खालचा खालीच राहिला!
       "हे उपवन नाही आजोबा, आम्ही पण देशोधडीला लागू." एक पिवळा कानरी बोलला. "तुम्ही सकाळी दाणे नाही घातले तर मी कांय करणार? आता तर आईने तू मोठा झालास अस म्हणून माझा चारा आणणसोडून दिलय."
         मी पण याच बागेत मुक्तपणे उडायला आणि माझे माझे दाणे टिपायला शिकलोय . एक छोटा होला म्हणाला मी कुठे जाणार?
         "मी कुठे जाणार म्हणजे कांय? "एका कावळ्याने झाडावरून खाली येत  म्हटले .हा  कांय तुझ्या एकट्याचाच प्रश्न आहे?- आम्हाला कस विसरलास त्याने होल्याकडे बघून विचारले .
      आजोबा आमचे सर्वांचे आजोबा आहेत. एक रॉबिन पण बोगनवेलियाच्या जाळीतून बाहेर येत म्हणाला.
        कांव कांव , आजोबा प्लीज जेवून घ्या. अजून काही कावळे आले.
            "कांव ,कांव, प्लीज, प्लीज."
          "कांव, कांव"
         "प्लीज, प्लीज "
      " हुश! " दोन्ही हात वर करून धावत येऊन मंगला कावळ्यांना हाकलू लागली. छोटे पक्षी आधीच फूर्रकन पसार झाले. आता हे राखणीचे नवीन काम वाढवून  पाहुणे जेवायला येत आहेत, आजोबांच्या मित्रांचा मुलगाच मेयर झाला आहे. आणि हा कावळ्यांचा उच्छाद . " हला मेल्यांनो " मग कवळे पण तिच्या पासून दूर सरकले.
         " अप्पा~~" गोड आवाजात सुरेलपणा आणून तिने हाक मारली. " चला ना आत जेवायला! गेले तीन दिवस उपास केलाय् तुम्हीं." तिने विनवल.
          अरे, ही किती गोड बोलते. बघ त्या आधीच्या जाड्या बाई सारख नाही हिच  . तान्ह्या पाखराने  तारेच्या कंपाउंडवर बसत शेजारच्या चिमणीला म्हटल.
       हाँ, हाँ, तिच कांय? लग्नाआधी ती चांगली अभिनेत्री म्हणून गाजलेली आहे.  झाडावर बसलेल्या एका कावळ्यानेमाहिती पुरवली. " लोकांसमोर गोड- गोड बोलते. पण रात्री आपल्या नव-याजवळ  आजोबांविरूद्ध कांय कांय कट शिजवत असते." पिवळ्या कानरीने तान्ह्या पाखराला खाजगीतली माहीती पुरवली.
         "हो , हो ! " कावळा म्हणाला, हिचा नवरा तो मधला मुलगा आहे ना, त्याच्या बरोबर ऐकू येतात. मग माझीच झोपच  उडून जाते, इतकी ही कारस्थानी बाई आहे !"
        कां , असे काय प्लान असतात यांचे? तान्ह्या पाखराने विचारल.
        " त्यांच कारस्थान तुला कस कळणार!  लहान आहेस तू अजून . कावळ्याने फांदिला चोच घासून -बोलण पुढे चालू ठेवल- इतक मोठ घर , मोठ -मोठ्या खोल्या, हॉल, आंगण , समोरचा ओटा, मागची ही बाग,....... सगळ्याचे तीन वाटे करून द्यायला आजोबांना सांगा अस हीच  आपल्या पतीला पढवत  होती.
               अच्छा?  मग ? कोकिळेने विचारल. तो म्हणाला " काय करू ? दादा ऐकत नाही. म्हणतो, मी मोठा आहे, म्हणून मला कांही तरी जास्त हिस्सा मिळाला पाहिजे . म्हणजे समोरच आंगण , हॉल , एक बेडरूम आणि मागची  ही बाग..... "
     नंदनवन
   ''ओय्, होय्! सुतारपक्षी ओरडला- तोंड पहा आरशात! बागं हवी म्हणे बाग! कधी एक दिवस तरी इथल्या  मातीचा स्पर्श त्यांच्या  हातांना झालाय?  झाडांना पाणी टाकलय? माझ्यासाठी  दाणे टाकलेत? ''
           "बरोबर! " कावळा म्हणाला.
      मग पुढे इतर पक्षांनी विचारणा केली . "मगअर्ध्या रात्री भांडणाचा जोर वाढतच गेला .त्या गोंगाटाने माझी  घरटयातली पिल्ल पण जागी झाली . कावळा म्हणाला.
        "पुढे कांय झांल? थांबू नकोस, थांबू नकोस! इतर पक्षी आता उतावीळ  झाले होते.
    "ही मंगला, तिचा नवरा यांचं धाकटा भाऊ आणि त्याच्या बायकोशी भांडण चालल होत. धाकटा  म्हणत होता अशी कशी वाटणी  की एकाला समोरच आंगण, पुढची खोली  आणि दुस-याला मात्र मागची  बाजू! पण मी  आणि माझी बायको दोघेही सुशिक्षित  आहोत . आम्हाला नाही फसवू शकणार तुम्ही . मी तर म्हणतो हे घर विकून टाका आणि येणारे पैसे सारखे वाटून घ्या .पण दादा ऐकेल तर ना! " तेंव्हा हा दुसरा नालायक म्हणाला नाही कस ऐकणार ? होऊन जाऊ देत दोन -दोन हात तेवढंयात कुणीतरी  दिवा मालवला. मग अंधारात त्यांची  खुसफुस चालूच होती. कावळा म्हणाला.
          "कांय अन्याय! " चिंव चिव , ट्वां ट्वां करत सगळे पक्षी म्हणाले. "सगळ्यांनी आजोबांना घराबाहेर काढलय् "बेशरम, नरपक्षी कुठचे. ''तान्ह्या पाखराने वरच्या टिपेत आवाज चढवत म्हटले.
            हुश्, हुश्, कांय हा भारी गोंगाट ! आजोबांनी धिटावून ठेवलय या चिमण्यांना ! म्हणत तिसरी मधवी येऊन त्यांना हाकलू लागली.
            " डॅडी! " "ती आजोबांना डॅडी म्हणते इतरांसारख अप्पा नाही म्हणत" काळ्या छातीच्या रॉबिनने नव्या पाखराला माहीती सांगितली.
     "डॅडी, चला जेवण करून घ्या आता. खूप राग काढला तुम्ही आमच्यावर, आता आत चला प्लीज " ती म्हणाली.
      तुम्हीं जेवण करून घ्या. आजोबांनी  मान वर न काढताच सांगितल.
             "ते कस शक्य आहे? तुमच्या शिवाय आज जेवणार नाही. इम्पॉसिबल. भूक पण लागल्येय डॅडी, चला आता! "
 मला भूक नाहीये बेटी आजोबा म्हणाले . "अस नका म्हणू डॅडी."
           अशाने तब्येत ढासळेल. चला डॅडी माधवीने आवाजात मार्दव आणून  म्हटले . अरे, पहा तरी हिच बोलण जशी  आजोबांच्या एका आज्ञेतच आहे. चला डॅडी . चला डॅडी, कोकीळा तिची नक्कल करत कुहुकू लागली.
          पण खरच मला भूक नाही बेटी " आजोबा पुनः म्हणाले.
        "तुम्हीं गेले तीन दिवस जेवला नाहीत . आमच्याकडून कांही चूक झाली असेल , तर माफ करा डॅडी! "
     "माफ करा, हों, हो, कांव कांव "
     "माफ करा, हो ,हो, कांव कांव "
    "माफ करा, हो, हो, कांव, कांव, कांव "
 ऐ ,  हाट्, गेट आऊट , काय काव-काव लावलीय! छीः , आफतच आहे.
       हळूच जवळ आलेले पक्षी पुनः उडाले . कुणी  कंपांऊंडाच्या तारांवर ,कुणी  मागच्या गेटावर ,दूर गवतात, तर कुणी  झाडांच्या फंदीत! ते आपसात बोलू लागले.
         डॅडी , असा लहान मुलांसारखा हट्ट धरू नका. आम्हाला जेवणं आटोपून  बाहेर जायचय्.
        "तुम्हीं सगळ्यांनी आजोबांना बाहेरच काढलय त्यांच्यासाठी एकही खोली न ठेऊन " गुलाबाने  लांब निःश्वास टाकला.
         "हो, तुम्हीच काढलय् "
      "बाहेर काढलय."
      "बाहेर काढलय."
          त्या अज्ञानी मुला- सुनांना सांगून सांगून जास्वंदी , लिली  पारिजात, दमून गेले . मुर्ख माणंस! आपल बोलण यांना कळतकस नाही?
          " आता आजोबांसाठी ही बागच घर आहे धरती त्यांचा विस्तरा, आकाश त्यांचे छत आता ते घरांत जाणार नाहीत  डेलिया बोलली.
          "जाणार नाहीत " डेलिया भोवती रूंजी घालणा-या मधमाश्या  म्हणाल्या.
         " जाणार नाहीत.'
       "जाणार नाहीत " पक्ष्यांनी पुनः कोलाहल सूरू केला.
       त्यांच्या विविध भाषा , उसासे, कांहीच न समजलेली मंगला आणि माधवी पाय आपटत घरात निघून गेल्या .
         आजोबांनी पुस्तक मिटून त्यांच्या पाठमो-या आकृती पाहिल्या ,मग बागेतील झाड, मधमाश्या, पक्षी  सगळ्यांकडे पाहून रहस्य सांगत असल्यासारख त्यांनी डावा डोळा मारून खूण केली .
         सगळे पक्षी पुनः पुंडकत उडत आजोबांच्या जवळ गोळा झाले . पुनः कलकलाट वाढला.
        पुनः मागचा दरवाजा उघडला. आता आजोबांचा मधला मुलगा कर्तिकेयन आणि धाकटा मादिवेलन बाहेर आले. 
          अप्पा , हे कांय चालवलय् तुम्ही? मदिवेलनने विचारल.
         "हा प्रश्न मीच विचारायला हवा  आजोबा म्हणाले. मला भूक नाही .जेवण नको एवढच मी म्हटल त्याचा एवढा बाऊ का केलाय?"
       "पण तुम्ही जेवली नाहीत तर आम्ही  एकटेच कसे जेवणार ? कर्तिकेयन म्हणाला.
         "हो, ना, फक्त दादाच  अस वागू शकतो . "मदिवेलन  म्हणाला.
         माधवी, मंगला वहिनी आणि मोठी वहिनी सगळ्या तुमच्या समोर हात जोडून गेल्या तरी तुम्ही हट्ट सोडत नाही दिवसभर बाहेर बसून राहिले तर तो कांय बर  दिसेल? चला घरांत चला मदिवेलन त्यांना म्हणाला.
               "हेच घर आहे. "
               " हेच घर नन्दनवन आहे "
     `"इथेच रहाणार -"
        पक्ष्यांनी ओरडा केला हुश, काय ही कटकट असं म्हणत कर्तिकेयनने खांद्यावरील पंचा उगारत पक्ष्याना हाकलायचा प्रयत्न  केला. पण थोडेच पक्षी उडाले बाकी तिथेच बसून बोलत राहिले
   " आमचे आजोबा"
             " इथेच रहायचे "
           " इथेच रहायचे " पक्ष्यांनी  कलकलाट वाढवला.
    च्छा, हे तर हलतही नाहीत. कसे धीट झालेत साले एक जाडसर काठी त्यांच्याकडे  फेकत मदिवेलन म्हणाला .
              अप्पांनी लाडावून ठेवलय् सकाळी उठून पोत पोत धान्य त्यांना खाटला  घालतात या वयांत आता त्यांना दुसर कांही  काम उरल नाही . कार्तिकेयन बोलला . दाणे खातात म्हणूनच एक फौज ची  फौज बनून येऊन  बसलेत  नातंगोत सांभाळायला मदिवेलन म्हणाला. आजोबा आराम खुर्ची सोडून उठले . आजोबा, जाऊन थोडा  आराम करा कोकीळीने गोड आवाजात कूजन केले.
          " उद्या सकाळी भेटू " मधमाशी म्हणाली
            "सकाळी भेटू"
             "सकाळी भेटू " म्हणत मधमाशांनी त्यांच्या भोवती फेर घरला.
         चला अप्पा म्हणत दोन्ही मुलांनी सुचकेचा श्वासटाकला आणि घराकडे  वळले . त्यांच्या मागे जाता जाता आजोबा थबकले पक्ष्यांकडे वळून  म्हणाले " या पोरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका उद्या सकाळी जास्त दाणे टाकीन. सगळ्यांनी पोटभर खा!  "  पक्षी आनंदाने नाचू -गाऊ लागले .
              तुम्ही काय म्हणालात ? कार्तिकेयने मागे वळून विचारले
                      " कुठे कांय ?"
          "आत्ता कांही तरी बोललात तुम्ही !
             " कोण मी ? अस म्हणत आजोबा हसले त्यांच्या डोळ्यांतला खख्याळपणा पाहून दोघ मुलं कोडयांत पडली.
          सर्व पक्षी खो- खो करून हसले कार्तिकेयन वेड्या सारखा त्यांच्याकडे पहात राहिला. आजोबा पुन्हा त्यांच्याकडे पाहून हसले आणि  आत निघून गेले.
         सकाळी चिमण्यांचा एक थवा आला तेव्हा तान्हं पाखरू समोरच्या गेटावर बसून आवेशात  उ़डया मारत होत मधूनच चींची  करून चिवचिवत  होत.
      अरे, आज तर तू अगदी सकाळी आमच्या आधीच दाणे टिपायला येऊन बसलास . एका चिमणीने विचारल तस बाकीच्या चिमण्या हसल्या .
      चला, घरामसोर बसून कांय फायदा  ? तिकडे मागच्या  अंगणातच येतील आजोबा. त्या म्हणाल्या . नाही, नाही, तान्हं पाखरू ओरडल आज आजोबा आलेच नाहीत.
         "आलेच नाहीत? अस होणारच नाही". एक अनुभवी चिमणी म्हणाली .
          "पण काय झाल? आणि आज घरासमोर एवढी गर्दी कां आहे? कोण आहेत एवढे लोक? नातलग आणि मित्रमंडळी वाटतात .
         " पण त्यांच्यात कुठे उत्साह दिसत नाही! सगळे गुपचुप वावरताहेत.
         चला, चला मागच्या अंगणात जाऊ पेरूवरच्या कावळ्यांना माहित असत घरांत कांय चाललय् ते.
         मागच्या अंगणात दोन सुतारपक्षी , पाच सहा कावळे आणि इतर बरेच पक्षी  चर्चा करत होते. मागच दार आज बंद होत . काही पक्षी  उडून पुनः

नंदनवन
     पक्षी उडून पुनः पुढच्या  अंगणात आले.
     गर्दीत दोन म्हता-या  बायका होत्या . त्यांच्यातली एक म्हणत होती  "हाय, हाय, तुमचा म्हतारा काय ग
     एकंट टाकून गेला तुम्हा पोरांना ! "
    दुसरी पण असाच कांहीतरी आक्रोश करत होती .
     "हाय, आजोबा गेले वाटत " एका  चिमणीने तोंड छोट करून विचारल  तस  बाकी पक्ष्यांच्या पोटात  धस्स झाल .
          सगळे पक्षी  पंख फडफडवत , चारी दिशांकडून गोळा होऊ  लागले. गर्दीतल्या  दोन-तीन जणांनी त्यांना हाश हुश करून उडवायचा प्रयत्न केला .पण  उडून एक दोन  घिरट्या घालून ते पुनः तिथेच येऊन बसले.
            समोरच्या उघडया दारातून चार माणसांनी तिरडीवर बांधलेल आजोबांच शव  अंगणात आणून ठेवल .आजोबा जणू  झोपेतच  होते. त्यांच्या चेह-यावर हास्य आणि  शांति होती.  गळ्यांत फुलांच्या माळा होत्या .  लोकांनी अजून कांही माळा अर्पण केल्या . मग शवाच्या सभोवती फुल रचण्यात आली. हाय, मुलींना पोरंक करून गेले."
               कोकिळा म्हणाली "पोरक करून गेले." "गेले "?  सगळे पक्षी हाहाःकार करू लागले. तरी मला वाटत होत  आजोबांनी जेवण का टाकल?" रॉबिनस्न रडू आवरेना.
        समोरच्या अंगणात सगळे पक्षी  गोळा  झाले .कुठे  तीळभर जागा राहिली नाही. शांत  झोपल्याप्रमाणे आजोबांच निर्जीव शरीर समोर होत. किंकर्तव्य विमूढ पक्षी तसेच  बसून राहिले. आत दोन म्हता-या अजून आक्रोश  करीत  होत्या . "लहान होता रे  आमच्याहून . आम्हाला पण कां नाही बरोबर घेऊन गेला?"
           आतून इतरही बरेच आवाज येत होते. दारापर्यत आलेले पुरोहित पुन्हा आतल्या  खोलीकडे वळून  म्हणाले चला बाबांनो लौकर उशीर होतोय . अजून  अंतिम संस्काराच काम सुरू करायचय आहे.
           "करणार नाही "आतून एक जोरदार आवाज आला.
          छी, छी, मोठा मुलगाच संस्कार करणार नाही म्हणतो? पुरोहिताने नापसंदी  दर्शवली .
       हो, एवढ्या पुरताच मी मोठा मुलगा म्हणायचो? मोठ्याचा हक्क असून सुद्धा धाकटे  भाऊ  हिश्यायसाठी माझ्यावर  दबाब आणतात हे शोभत कां ? भाऊ ओरडला.
             
                         नंदनवन
   '' तूच भांडणापर्यंत ताणलस.  कार्तिकेयनचा  चढा आवाज हवेवरून  बाहेरच्या अंगणात आला.
    ''नाहीतर कांय? तू का नाही  बरोबरी च्या वाटण्यांना तयार होत? मदिवेलन ने मोठ्याने मोठ्या भावाला विचारल.
           एवढी शिरजोरी ?  म्हणत मोठ्या भावाने उगारलेला हात इतर  दोघांनी वरच्यावर पकडला.
           इतर मंडळींनी छी  थू केल.  ही कांय वेळ आहे असली भांडण घेऊन बसायची ? लाज  वाटली पाहिजे . चला आता अंतिम  विधींचा  आरंभ करू या आणि श्रद्धा सन्मानाने  अप्पांना निरोप देऊ या. नातेवाईकांनी  समजावून  पाहिल पण भांडण वाढतच गेल . जमलेली  मंडळी  कुणी  मोठ्या  भावाकडून  तरी कुणी धाकट्या  भावांची  बाजू  घेऊन दुभंगली दोघी  म्हता-या आत्या  मेल्यांनो , शरम करा थोडी . इतके  मोठे  झाले तरी म्हता-या बापाला निरोप देतांना अपशकुनच  करताय!  जा, लौकर सर्व  विधी संपवा म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल.
           बरं झाल यांचे तंटे वाढायच्या आत  अप्पांचे  डोळे मिटले . त्यांचे कांही  मित्र  म्हणाले .
           मुख्य  पुरोहिताने  क्रुद्ध चेह-याने  तिघा  भावांकडे  पहात म्हटल आता तुम्हीं  येताय की आम्हीं  पुरोहीत मिळून  संस्कार  उरकू ? अशा आप्पलपोट्या , नालायक, मुलांकडून अग्नि देण्यांत बाधा आली तर  शास्त्रांत  त्यावरही  उपाय सांगितलेला  आहे . लक्षात ठेवा. तुमच्या शिवायही विधी पूर्ण करण्याचे ब्राह्मणांना अधिकार  आहेत!  पुरोहिताची ही  गर्जना ऐकून तिघ  भाऊ  एकत्र  आले आणि  त्यांच्यावरच  तुटून  पडले.  पुन्हा जोरदार बाचाबाची  होऊ लागली. नातेवाईक   आणि  मित्र  परिस्थिती सावरायचा प्रयत्न करू लागले.
       समोरच्या अंगणात चकचकीत उन्हांत निर्जीव आजोबा  शांत  झोपून राहिले  होते त्यांच्याकडे  घरांतल्या  कुणाच लक्ष नव्हत  एक एक  करून  कावळे, मैना,  पोपट , असे  पक्षी  गोळा  होतच होते, तिरडी  भोवती  येऊन  थांबत  होते.
           "जमेल का आपल्याला" कोकिळेने  विचारल. 
           "का नाही जमणार? सगळ्यांनी मनापासून  ठरवल तर नक्की  जमेल  कावळा  मोठेपणाने बोलला.
          "पण आपल्याला पाहून माणस बाहेर आली  आणि अडवायचा प्रयत्न केला तर ? पिवळ्या कानरीने विचारले. अरे आपल्या  चोचीने  ओरबाडून नाही  टाकणार त्यांना? सुतार पक्षाने एका दगडावप आपली चोच घासत  म्हटले .
        त्यांची काळजी नको. आम्ही  करू आणी त्यांना घाबरून  टाकू  चिमण्या  म्हणाल्या.
            "ठरल तर मग. चला पकडा."
            "चला आजोबा, उडून जाऊ चला."
           "अं ..... थोडे जड आहेत खरे ."
  "तालासुरांत गाण गात उचलत म्हणजे जड नाही वाटणार ."
            "ते जड नाहीत -है या "
           "आपण उचलू शकतो- है या"
             "त्वरा करा- है या"
           "वर उचला -है या"
       "उडून चला- है या"
       " निघाले आजोबा- है या"
       " सांभाळा आजोबा- है या "
      "आमचे आजोबा- है या " .....
            शी, शी धिक्कार आहे. नरकांत सुद्धा मेल्यांना जागा मिळायची नाही.  एवढ्या मोठ्या बैदिक  पंडिताच घर पण, वैदिक विधी -विधानांची  जराही  मुरव्वर्त नाही. जनाची नाही तर निदान मनाची तरी .... ! चला मंडळी   आपणच आपल पुरोहित कर्तव्य  पूर्ण  केल पाहिजे . म्हणत  मुख्य  पुरोहित आपल्या  सहका-यांसह  बाहेर  आले -"हो, आपण कां यांच्या पापात भागी व्हायच ? "
        ए , कोण आहे रे तिकडे ?  ते गरजले त्याबरोबर दोन  नोकर धावत आले
           "महाराज? "
         "कांय तमाशा आहे? माझ्या परवानगी शिवाय  कुणी  महापंडीताच शव हलवल ? इथले नोकर पण किती हलकट आहेत. ! "ते ओरडले.
          "माहीत नाही महाराज "
    "कांय? माहीत नाही ? कुठे आहे शव? तुम्ही सर्व इथेच तर होतां! "
          "पण आम्हाला  कांहीच नाही  ठाऊक  नाही महाराज."
         कांय गडबड लावलीय? जा, पळा, कुठे असेल ते  शव  पटकन आणून  ठेवा इकडे , जा जा, ...'"
               कुठेच नाही महाराज !
      कांय नाही ?
      महापंडिताच शव!
     "अरे मुर्खा ! कांय बकतोस ? शव कुठे  जाईल ? पुनः एकदा  धावाधाव, शोधाशोध झाली घरांच्या आत, मागच्या  अंगणात, घराच्या चारी बाजूला।
         आजोबा कुठेच नव्हते आणि एकही चिमणी वा पक्षी कुठे दिसत नव्हते .
 -लीना मेहंदळे.
(मूळ तामिळ कथा लक्ष्मी कण्णन)   
------------------------------------------------------------------------- 

गुरुवार, 16 फ़रवरी 2017

ती एक राणी -- अंतर्नाद

     ती एक राणी

इन्दु पत्ते पिसत होती. एखाद्या सराईत खेळाडूप्रमाणे ! तिच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा जुगांर खेळण्यासाठी ! पण इतरांनी तिच्या आयुष्याचा जुगारच नव्हता का खेळला ?
     इन्दु आणी सुरेशच्या नकळत बाजूच्या खोलीतून त्यांच संभाषण ऐकत उभ्या असलेल्या माईसाहेबांच्या डोळ्यांत आज पहिल्या प्रथम इंन्दुसाठी पाणी होते आणि या जुगारात आपला मुलगा हरावा अन् सून जिंकावी या साठी त्यांच मन व्याकुळल होत.
     माईसाहेबांच माहेर श्रीमंताच. त्यांच्या वडिलांचा मोठा व्यापार होता. त्यांचे जबर्दस्त प्रतिस्पर्धी शहरात जम बसवू पहात होते, तेंव्हा प्रतिस्पर्ध्याच्या तरूण व होतकरू मुनीमालाच आबांनी वश करून घेतले होते. अण्णासाहेबांच आणी माईंच लग्न झाल. लाडक्या लेकीला आबांनी भरभरून हुंडा दिला. शिवाय जावयाला व्यापार सुरू करण्यासाठी भांडवल त्यांचा स्वतःचा व्यापार धान्याचा होता पण जावयाने बिल्डिंग मटीरीयलचा व्यापार सुरू केला. पहाता पहाता अण्णासाहेबांनी आपल्या धंद्याची अफाट वाढ केली.
     या सुखी संसारात भर घातली ती सुरेशच्या आगमनाने. मुलाच्या जन्मामुळे सासरी व माहेरी माईसाहेबांचा दबदबा वाढला होता. सुरेश अतिशय थाटामाटात आणि लाडांत वाढू लागला. अण्णासाहेबांचे आईवडील सुखवस्तू होते. दारिद्य्राची म्हणून म्हणतात ती झळ त्यांना बसली नव्हती तरीही लग्नानंतर पाहिलेली सासरची श्रीमंती आणि आता स्वतःच्या कर्तबगारीने तशीच श्रीमंती मिळवलेल्याल अण्णासाहेबांची सक्त ताकीद होतीः की सुरेशला मागेल ती प्रतेक वस्तू मिळालीच पाहीजे. "तो माझा मुलगा आहे-- नकार ऐकून घेण्यासाठी जन्माला आलेला नाही" असे ते गर्वाने सांगत.
     शाळेपर्यंत सुरेश हा एक चैनीत वाढलेला अभ्यासात फारस मन न रमणारा मुलगा होता. तरूण वयांत आल्यावर त्याच्या भोवती हर तऱ्हेचे बदसल्लागार जमले. शरीरप्रकृती दणकर इतरांविषयी कमालीची तुच्छता पैसा फेकून वाटेल ते मिळवू शकण्याचा अहंकार ! सुरेश हळू हळू जुगाराकडे ओढला गेला. अण्णासाहेब आणि माईसाहेबांच्या हे लक्षांत आल तेव्हा फार उशीर झाला होता. त्यातच एकाएकी अण्णासाहेब स्वतःच सुरेशच्या जाळ्यांत ओढले गेले.
     खरं तर सुरेशने जाळं लावलेल नव्हतच. आपल्या सहली, दारू आणि जुगाराचा नाद पुरवण्यासाठी पैसे माईंकडून मिळतात पण मुळतः ते अण्णासाहेबांच्या व्यापारातले असतात एवढे भान ठेवून सुरेश त्या दोघांशी अदबीने वागत असे. हे ही कारण असेल की त्याच्या इतर दुर्गुणांबात कोणी कांही बोलले तर अण्णासाहेब ते पूर्ण खर मानीत नसंत. एकदा एकाएकी सिमेंटचे भाव कोसळून त्यांना व्यापारात मोठी खोट आली. खेळत्या भांडवलाची चणचण भासून व्यापाराचा सर्व डोलाराच गडगडणार की कांय संपूर्णपणे बुडणार नव्हते. इरदार, इस्टेटी विकून टाकून, देणी फेडून त्यांच्याकडे एखाद्या छोट्या घरांत त्यांच्या बालपणी रहात होते तेवढ्या सुस्थितीने जगण्याइतपत शिल्लक. निश्चित रहात होती. अशावेळी अवचितच सुरेशने त्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता. रहातं घर विकण्याऐवजी ते जुगारात लावायची एक संधी त्याला हवी होती त्यातून अण्णासाहेबांचे देणे फिटणार होते, हरला असता तर मात्र त्यांची सर्व संपत्ती बुडून त्यांना हलाखीची वेळ येणार होती. त्या पेचाच्या प्रसंगी अण्णासाहेबांना पैशाता मोह सुटला नाही. आयुष्यांत नेहमी सचोरीचाच व्यापार करणाऱ्या त्या कर्तृत्ववान माणसाने मुलाचा प्रस्ताव कबूल केला. सुरेशचे दैव बलावत्तर होते. तो जुगार जिंकला आणि अण्णासाहेबांचे घरदार, सर्व शाबूत राहू धंद्याची घडी पुनः बसली. मात्र त्या धंद्याला अण्णासाहेबाच्या सद्वर्तनाची जी बैठक लाभली होती ती संपलीआता सुरेश मुनीना उघडपणे धंद्यातील हिशोब विच्यारू लागला होता आणि त्याला हवे असतील त्या प्रमाणे पैसे उचलत होता.
       माईसाहेब व अण्णासाहेबांच्या दृष्टीने सुरेश ताळ्यावर यावा याचा एकच उपच्यार आता शिल्लक उरला होता त्याचे लग्न करून देणे. अण्णासाहेबांनी मुद्यामहून आपल्या तोलामोलाचे स्थळ न पाहता गरीबाघरची हा लेक आपली सून करून घेतली होती. सुरेशने देखील फारसे आढेवेढे घेतले नव्हते. मात्र इंदूला त्याने पहिल्या रात्रीच सांगून टाकले होते की त्याच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणी होत्या त्यांचा अपमान होईल असे इंदुने वागता कामा नये. सुरेश बरोबर त्यांच्या सहली, ड्रिंक पार्ट्या, जुगाराचे अड्डे इत्यादी चालत रहाणार ! जगण्याची मौज त्यातच आहे. काही मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात. सुरेशलादेखील त्यांचा सहवास प्रिय आहे. त्यामुळे त्याच्या कांही रात्री त्यांच्याबरोबर जाणार ! इंदूने या सर्वांबाबत तक्रारीचा एक शब्दही काढीयचा नाही !
       मात्र एक गोष्ट त्याने पहिल्या रात्रीच कबूल केली होती. त्यच्या आतापर्यंतच्या सर्व मैत्रिणी पेक्षा इंदु निश्चितच सुंदर होती. तिची जर ड्रिंक्स घेण्याला व पत्यांच्या खेळांत पार्टनरशिप करायला हरकत नसेल तर अशा कित्येक पार्ट्यांमधे "यू बुईल रूल दी शो !" संकोची पण बुद्धिमान इंदुने खालमानेनेच प्रतिप्रश्न टाकला होता "मी हे सर्व केले तर इतर मैत्रिणीबरोबरच्या रंगीत रात्री थांबतील कां ? सुरेशला राग आला होता. त्याला उलट प्रश्न ऐकण्याची  सवय नव्हती. त्याचे नाही हे उत्तर ऐकल्यावर उरलेली रात्र इंदुला असस्थ झाले होते. या माणसाबरोबर आपले भवितव्य कांय याचा थोडक्यात अंदाज तिला येऊन चुकला.
       दुसऱ्या दिवशी सकाळीच नोकराने वर्दी दिली की माईसाहेबांनी तिला बोलावले आहे. भीतभीतच ती त्यांच्यासमोर आली आणि वाकून नमस्कार केला. माईची नजर तिला खालून वरपर्यंत तपासत होती.त्यांच्या नजरेत जबर होती, ती आणि आवाजात हुकुमत. इंदुला त्यांनी त्यांच्या रात्रभरातील सर्व बोलणी सांगायला लावली. हा अपमान काल सुरेशने केलेल्या अपमानापेक्षाही जास्त होता. तिच्या प्रश्नाबद्दल व सुरेशच्या उत्तरावरील तिच्या प्रतिक्रियेबद्दल माईसाहेबांनी तीव्र नापंसंती दाखवीली. स्वतःच्या सौदर्याचा उपयोग करून तू सुरेशला दिवसरात्र अ
डकवून ठेवल पाहिजेस अशी अपेक्षआही बोलून दाखवली.
       तिथून पुढे हा परिपाठच झाला. माईसाहेब रोज सकाळी तिला बोलवून घेत व रात्रभरातील गोष्टी सांगायला लावीत. सुरेश आता उशीरा घरी येऊ लागला. येताना तो पिऊन तरी असायचा. इंदुच्या पावित्र्याची तो खिल्ली उडवायचा. पण इंदुचा स्वाभिमान याबाबतीत तिला साथ देत होता. तिच्या इच्छेअनिच्छेचा विचार न करता तिने ड्रिंक्स घ्यावी असा आग्रह सुरेशने कां करावा ? बरं वेळ त्या मोबदल्यांत त्याने त्याच्या मैत्रिणी सोडण्याचे कबूल केले असते तर त्याच्या ऑफरला कांही मार्क देता आले असते. पण त्याच्या मैत्रिणी तो सोडणार नाही, पार्ट्या आणि पत्यांचे अड्डे पण सोडणार नाही, आपण मात्र फक्त त्याची सोबत करायला व त्याची बाहुली म्हणून मिरवायला जायच ? त्या मिरवण्यांत कांही स्वाभिमान नाही ! खरं तर त्याच्या इतर मैत्रिणींसारखीच ती पण थोडी जास्त सुंदर, कदाचित जास्त स्मार्ट पण होऊ शकेल. पण फक्त तिची बाह्य सुंदरता आणी ती देखील सुरेशची संपत्ति म्हणून त्याला मिरवण्यापुरतीच एवढीच तिची लायकी होती कां ?
        खरं तर तिची लायकी होती कांय होती ? गरीबाघरच्या सहा भावंडापैकी एक ! हुषार होती म्हणून शिकू शकली शिक्षकमंडळी वर्गणी करून तिची फी भरत म्हणूनत ! त्या चांगुलपणानेही तिची कुतरओढ होई. माईसाहेबांनी मागणी घातली तेंव्हा इतर भावंडाचे पुढचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊनच तिने स्वतःचे बलिदान स्विकारले होते. पण त्या स्वीकारातही थोडीशी आशा कुठेतरी होती. सुरेशला आपलासा करून घेण्याची ! त्याच्या पौरूषाला आव्हान देण्याची ! लग्नानंतर त्याच्या स्वभआव कळूनही तिला वाटे की आपल्या प्रेमापुढे तो सर्व दुर्गुण सोडेल आपण त्याला सोडायला लावू. पण तिच्या वाट्याला येणाऱ्या सर्वच रात्रींना तो त्याच्या मैत्रिणींचे किस्से सांगू लागला तशी तिची आशा मावळत गेली. चिडून तिने एकदा त्याला विच्यारले होते -- त्यांच्यापैकीच कुणाशी लग्न का नाही केले `?" "छे , मला हवी तशी त्यांच्यापैकी कोणीच नाही."
      "पण अशी कुणी असेलच तुमच्या दृष्टीने लायक, तर तिच्या दृष्टीने तुम्हीं लायक असाल कां ?" या प्रश्नावर मात्र सुरेशने तिच्यावर सरळ हातच टाकला- "माझी लायकी काढतेस ?" त्यानंतर ती दोघं एकमेकांना टाळू लागली होती. इंदुचे कितीतरी प्रश्न तिच्या मनांत राहून गेले. सुरेशला हवी तशी जर त्याची कोणी मैत्रीण नव्हती तर त्यांच्या बरोबर तो रात्र-रात्र कां घालवत होता ? इंदु तरी कुठे होती त्याला हवी तशी ? मग तिच्याशी तरी लग्न कां केल ? तिने त्याच्या पार्ट्यांमधे साथ दिली असली तरी तो आपल्या मैत्रीणींना सोडणार नव्हता म्हणजे पार्ट्यांना साथ देणारी बायको नको होती. मग त्यला नेमकी कशी बायको हवी होती ?
      या लग्नामुळे इंदु माहेराला पण पारखी झाली होती. लग्नाआधीच माईसाहेबांनी नानांना तिच्या वडिलांना बोलवून घेऊन स्पष्ट सांगितल होत - तुमच्या मुलीच्या रूपागुणाकडे पाहूनच तिला सून करून घेतोय. लग्नाचा सारा खर्च आमचा शिवाय तुमच्या घरासाठीही पैशाची व्यवस्थित सोय करू ! तुमच्या इतर सर्व मुलांच जन्माच कल्याण होईल. मात्र एक अट लग्नानंतर माहेरची माणसं इंदुला भेटायला येता कामा नयेत. आमच्या घराला ते शोभणार नाही !" आपल्या गरीबी कडे  पाहून काळजावर दगड ठेवत नानांनी हा व्यवहार मान्य केला होता. लग्नाआधी त्यांनीच भरल्या डोळ्यांनी हे सर्व तिला ऐकवल होत.
       आधीच्या काळांत माईसाहेबांकडून इंदुसाठी भारी साड्या, दागीने येत असत ! रात्री तो साज चढवून तिने युरेशला रिझवावे अशी त्यांची सूचना असे. पण त्याचा उपयोग होत नाहीसे पाहून त्यांनी इंदुला वेगळा सल्ला दिला तिने त्याच्या मनांत करूणा निर्माण करावी ! तिने आजारपणाचं, त्रासाचं, कष्टांच नाटक कराव आणी सुरेशची सहानुभूती मिळवावी. याला मात्र इंदुने सपशेल नकार दिला. तिने सुरेशच्या करूणेची भीक कां म्हणून मागावी ? खरं तर माईसाहेबांचच चुकल होतं. त्यांचा मुलगा कसा आहे त्यांना माहीत होत. मग तिचा बळी कां घेतला ? पण सालस मनाच्या इंदुला अस कधीच वाटल नाही की हा प्रश्न विचारून माईसाहेबांना दुखवाव !
        इंदु बधत नाही हे पाहून आता माईसाहेबांनी स्वतःच तिला त्रास द्यायला सुरूवात केली. तिच्याकडून घरांतली कामे करून घेणे, तिला जुने पाने नेसायला देणे, तिला खायला पुरेसे न देणे इत्यादी सर्व प्रयत्न त्यांनी केले. तिने दुःखी कष्टी व्हावे मग करूणेच्या भरांत का होईना सुरेशने तिच्याबद्दल प्रेम व आपुलकी दाखवावी असा त्यांचा हेतू होता. पण इंदुनेही जणू चंग बांधला होता - सुरेशसमोर कष्टी न दिसण्याचा ! त्यामुळे माईसाहेबांचा राग आणि जळफळआर वाढू लागला. इंदुला त्या मनापासून त्रास देऊ लागल्या. तिचा दुखास करू लागल्या !
       इंदु बघायची की अधून मधून सुरेश नीट वागायचा. घरी येतांना नीट शुद्धिवर असायचा घरांत आईवडिलांबरोबर व नोकरा चाकरांबरोबर नीट वागायचा. तिला राळायचा पण दुखास दाखवत नसे. असे पाच सात दिवस जायचे. मग पुनः त्याचे दोन तीन दिवस घरी न येणे, पिऊन येणे असे सुरू व्हायचे ते चांगले दोन तीन महिने ! हळू हळू तिला कळून चुकले की त्याला मोठ्या रकमेची गरज असेल, जी रक्कम माईसाहेब किंवा मॅनेजर स्वतःच्या अखत्यरीत देऊ शकत नाहीत, अण्णासाहेबांच्या कानावर घालावे लागते, अशा वेळी सुरेश आपले वर्तन बदलत असे. त्याच्या अशा वागण्यानंतर मग माईसाहेबांच्या रदबदलीने अण्णासाहेब त्याला पैसे द्यायला तयार होत असत.
         अशा .... तिच्याकडे लक्षपुर्वक दिवशी सुरेशही बघत होता. इंदुला होणारा छळ, माईसाहेबांचे टोमणे ! इतक असूनही त्यांच्या घरी येणआऱ्या नातेवाईक किंवा पाहुण्यांसमोर तिने घराचं व्यंग उघड केल नव्हत. आताश अण्णासाहेबांना ब्लड प्रेशरचा त्रास वाढू लागला होता अशावेळी त्यांच्या औषधपाण्याची काळजी ती घेत होती. सुरेशच्या वागण्यामुळे त्यांनी बसवलेली व्यपाराची घडी मोडत आली होती. त्यांची घसरगुंडी सुरूच होतीत्यांची घसरगुंडी सुरूच होती. मागचं संकट एकदाच कोंसळल होत - सिमेंटच्या रूपात. थोड्याशा पूर्व कल्पनेने अशी कित्येक संकटं त्यांनी वेळेतच सावरली होती. पण सुरेशच्या मागण्या म्हणजे त्यांच्या व्यापाराला व त्यांच्या उमेदीलाही लागलेली गळती होती. एकीकडे धनाचा क्षय होत होता तर दुसरीकडे सुरेशच्या वागण्यावर उपाय सुचत नव्हता.
         असेच एकदा मॅनेजर घरी आले. महत्वाच्या मुद्यावर अण्णासाहेबांशी चर्चा करायची गरज होती. पण नुकतीच त्यांना झोप लागली असून त्यांना उठवू नये अस इंदुच मत होत. मॅनेजरने निरोप ठेवला. मुद्दा अण्णासाहेबांना नीट कळवायचा म्हणजे इंदुलाही तो नीट समजवून द्यायला हवा संध्याकाळी ते निर्णय विचारायला परत आले तो अण्णासाहेबांची प्रकृति खालावलेली होती. मात्र इंदुने त्या परिस्थितीबाबत आपल मत बनवल होत व तेच मॅनेजरला सांगितल. तिचा निर्णय योग्यच होता व मॅनेजरचेही तेच मत होते. हा अण्णासाहेबांचा जुना व विश्वासू मॅनेजर अत्यंत प्रामाणिक ! या वृद्धांच्या डोळ्यातून कांही सुटले नव्हते. अण्णासाहेबांची खंगत चाललेली प्रकृती त्यांची जबाबदारी पेलायला लायक नसलेला त्यांचा मुलगा, घरातल्या सुनेची - आबाळ आणी अपमान ! पण आज इंदुच हे नवीन रूप त्याला भावल होत ! तिला व्यापाराची उपजत जान असावी ! देव एका बाजूने कमी देतो तर दुसरीकडे ती उणीव पूर्ण करत असतो. हळूहळू मॅनेजर अडल्यापडल्या वेळी इंदुचाच सल्ला घेऊ लागले. मधून मधून इंदु त्याचाच सल्ला घेई तर कधी कधी ते व इंदु मिळुन अण्णासाहेबांचा सल्ला घेत. इंदु या कामात झपाट्याने पारंगत झाली. मॅनेजरला व पेढीवरील सर्व नोकर वर्गाला दुरूप आला. सुरेशची पैशांची उचल अजून चालूच होती, त्याला मात्र इंदुने कधी अटकाव केला नव्हता.
        पण शेवटी तेही कराव लागलच. त्याला लागणारे पन्नास हजार एकरकमी देण्यास मॅनेजरने नकार दिला व ही गोष्ट इंदुच्या कानावर घातली. सुरेशला अडवल नसत तर व्यापारांत जो फटका बसणार होता त्याचा त्रास अण्णासाहेबांना होणार होता. शिवाय त्यांच्या व इंदुच्या प्रयत्नांमुळे व्यापारातली घसरण थोडी थोडी थांबली होती - ती सुरेशला पैसे देऊन टाकल्याने पुनः वाढणार होती. शेवटी इंदुने खंबीर पणाने निर्णय घेऊन टाकला. आज नाही तर कधीच नाही. तिचा, तिच्या संसाराचा जो कांही सोक्ष मोक्ष लागायचा असेल तो या वेळीच ठरू घालतच नाही, फक्त वारसाचा हक्क सांगून पैसा उचलतो, त्याचा मान मोठा आपण जी घराची प्रतिष्ठा, घराचा व्यापार आणी अण्णासाहेबांची प्रकृति जपण्याकरता जिवाच रान करतो त्या आपला मान --- हे आज या घराने ठरवलेच पाहिजे. शिवाय सून म्हणूनही तिचा कांही मान आहे. आपन सुरेशची पत्नी म्हणून तर आहेच आहे ! यावेळी सुरेशने अंगावर हात टाकायचा प्रयत्न केलाच तर आपण त्यांचा हात नक्की अडवायचा असाही इंदुने निर्धार केला.
      त्या रात्री सुरेश लौकरच घरी परतला आजही पिऊन नशेतच होता.  पण भांडण्या इतपत शुद्ध कायम ठेवली होती. अण्णासाहेबांच्या बेडरूमच्या बाहेरच इंदुने व डॉक्टरांच्या तापऱ्याने त्याला अडवले "जे कांही बोलायच असेल ते आपल्या रूम मधे चल आणी बोल. गोंधळ घालून अण्णासाहेबांचा त्रास वाढवायला परवानगी नाही!"
       त्याक्षणी सहानुभूती सुरेशला नव्हे तर अण्णासाहेबांना मिळणार होती.  सुरेश मुकाट्याने आपल्या खोलीकडे आला. पाठोपाठ इंदु ! आल्या आल्या त्याने इंदुला दंडाने धरले ! `"तू किंवा मी, कोणीतरी आत्ताचया आत्ता या घरातून निघायला पाहीजे ! अण्णासाहेबांना हा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल तू मला त्यांच्या खोलीत जाण्यासाठी अडवू नकोस. एकदा तुझं ऐकल ! आता तुला बजावून जातोय !"
       "जरा थांबा !" इंदुने झटंकन टेबलावरील पत्यांचा कॅट उचलला. "तुमच आयुष्य जुगारमय झालय आणि त्या नादांत तुम्ही आज बायकोला हाकलून द्यायला निघाले आहात ! जुगाराच्या पायी घराची अवस्था तुम्हाला दिसत नाही. तर मग तुम्हाला या कॅटचीच शप्पत  माझ्या बरोबर एक डाव खेळा. त्यांत आपण दोघं आपले सर्वस्व पणाला लावू. ज्याच नशीब बलवत्तर असेल तो जिंकेल.
       बोला, आहे का हा दावा मंजूर ? एक सच्चा जुगारी समोर आलेला चॅलेंज नाकारत नाही आणी आपल वचनही मोडत नाही! तुम्हाला आपल्या जुगाराची वृत्तीचा फार अभिमान आहे ! तर मग पन्नास हजारच कांय, अण्णासाहेबांची ही अफाट संपत्ति तुम्ही जिकूंन घ्या!"
        "ही नाटकं कशासाठी ? तुला पत्ते धड ओळखता तरी येतात कां ?
         तो माझा प्रश्न आहे. तुमचा नाही. असं समजा की आज अचावक पत्यांची एक लढ तुमच्याशी लढण्याची इच्छा आहे ! आठवत तुम्हाला ? लग्नाच्या पहिल्या दिवशीच मी तुमच्या पार्ट्यांची क्वीन होईल अस म्हणाला होतात तुम्ही ! ती मी होणार नाही ! पण तुम्ही किंग होणार की नाही ते ठरवण्यासाठी एक खेळी खेळण्याचा चान्स मला द्या ! एकदाच !
        होः होः करून सुरेश हसला ! " वाट पत्ते, एकदा जुगार जिंकून अण्णासाहेबांचा व्यापार सांभाळून घेतला होता ! आता तो व्यापार जिंकून घेतो ! शेजारच्या खोलीत माईसाहेब देवाची विनवणी करत होत्या. गेले चार-पात महिने इंदुला त्रास देण्याचा त्यांचा सोस वाढलेला होता !
अपुर्ण ११